Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray News : शिवतीर्थावर पहिल्यांदाच बदललेला ठाकरेंचा सूर पचनी पडणार का?

Sachin Waghmare

Political News : जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… या विधानानं कोणत्याही सभेत आसमंत दणाणून सोडणारा आवाज उमटायचा. या पद्धतीने भाषणाची सुरुवात करून युवा मंडळींच्या मनात स्फुल्लिंग चेतवण्याचे काम दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षानुवर्षे केले. त्याशिवाय ठाकरेंनी 'जय भवानी, जय शिवाजी' हा जयघोष पहिल्यांदाच दिला. बाळासाहेबांनी दिलेला हा स्फूर्तीचा मंत्र शिवसैनिकांनी आपल्या हृदयात कायमचा कोरला. बाळासाहेब जेथे जातील तेथे 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष होत होता. 'जय भवानी, जय शिवाजी'असा जयघोष झाला की ती सभा शिवसेनेची म्हणून आजही लांबून न पाहता कोणीही ओळखत होते हा इतिहास आहे. हा इतिहास सांगण्याचे कारणही तसेच आहे.

रविवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा मुंबईत समारोप झाला. या वेळी शिवतीर्थावर झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाषणाची सुरुवात बदललेली पाहायला मिळाली.

उद्धव ठाकरे नेहमीच शिवतीर्थावरील सभेची सुरुवात 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव, भगिनींनो आणि मातांनो…' म्हणून करतात. मात्र, ही सुरुवात बदलत त्यांनी माननीय खर्गे साहेब, पवार साहेब, राहुल गांधीजी आणि व्यासपीठावर सर्वच मान्यवर आणि जमलेल्या 'माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी, माता आणि बंधू भगिनींनाे अशी भाषणाची सुरुवात केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. (Uddhav Thackeray News )

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घणाघाती भाषणाची सुरुवात नेहमीच्या आक्रमक शैलीत न करता संयम राखून व शांतपणे केली. त्यामुळे उद्धव ठाकरे मवाळ धोरण अवलंबतील असे वाटत असतानाच त्यानंतर मात्र भाषणातून आक्रमकपणे भाजपवर टीकास्त्र सोडत अक्षरशः बारा मिनिटांच्या भाषणातून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका करीत पिसे काढली.

या वेळी उद्धव ठाकरे यांनी राहुलजी तुम्ही आपल्या भारत जोडो यात्रेची सांगता मुंबईमध्ये करत आहात. पवारसाहेब सांगत होते, हीच ती मुंबई आहे, 1942 मध्ये महात्मा गांधींना इंग्रजांना चलो जावचा नारा दिला होता. आता तीच वेळ आली आहे. भाजप हा एक फुगा आहे, यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं. संपूर्ण देशात 2 खासदार होते, यांच्या फुग्यात हवा आम्ही भरली होती, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली, असा आरोपही केला.

उद्धव ठाकरे यांनी साडेचार वर्षांपूर्वीच भाजपची साथ सोडत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले. त्या काळात त्यांना इंडिया आघाडीशी जुळवून घेताना काही तडजोडी कराव्या लागल्या. शिवसेनेला मवाळ भूमिका घेत काही गोष्टी जुळवून घेत संसार करावा लागत आहे.

शिवसेनेला आघाडीत एकत्रित काम करीत असताना काही कसरती कराव्या लागत आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी थोडासा सूर बदललेला दिसत आहे. यापूर्वी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे जाणारे उद्धव ठाकरे आता थोडी नरमाईची भूमिका स्वीकारत आहेत. या उद्धव ठाकरेंनी बदलता सूर येत्या काळात शिवसैनिकांना पचनी पडणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यासोबतच विरोधकांकडून त्यांच्या या भाषणावर टीका केली जात असताना त्यांच्याकडून या टीकेला कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच सभेत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर टीका करताना हे 'लीडर' नाही तर 'डीलर' आहेत असा उल्लेख केला. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट मात्र 'जय महाराष्ट्र' असे म्हणत केल्याने त्यांनी मुंबईकरांची मने जिंकली. हा संपूर्ण कार्यक्रम काँग्रेसचा असला तरी त्यावर शिवसेनेचा पगडा कायम असल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईतील राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमावर पूर्णपणे शिवसेनेचे वर्चस्व जाणवत होते. शिवाजी पार्कवर राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांनी सोबतच एकत्रित एंट्री केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी एकत्रितपणे शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला एकत्रित अभिवादन केले. त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर एकत्रित दर्शन घेतले. त्यामुळे हे सर्व काही बदललेले चित्र दोन्ही पक्षाच्या समर्थकांना काहीसे पचनी पडणारे नसले तरी येणाऱ्या काळात जुळवून घेताना तडजोड स्वीकारावी लागणार आहे.

R

SCROLL FOR NEXT