Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना कळली ग्रामीण महाराष्ट्राची नस; शेतकऱ्यांच्या प्रश्नाना हात घालत फुंकले रणशिंग

Amol Jaybhaye

Uddhav Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मालेगावमध्ये सभा झाली. यासभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदीचा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत शिंदे गट, भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. मात्र, त्यांनी सर्वाधिक वेळ हा शेतकऱ्यांना दिला. ग्रामीण महाराष्ट्रात राजकारण करताना, शेतकरी आणि शेतीचे प्रश्न हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मुंबईतील भाषा आणि राजकारणही चालणार नाही, येथे शेतकरी केंद्र बिंदू असला पाहिजे, तोच प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. कर्ज माफीपासून ते अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या नुकसानापर्यंत त्यांनी मुद्दे मांडले.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात आवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असल्यामुळे पंचनामे करण्यास वेळ झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास उशीर झाला. तोच मुद्दा उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत उचलला. कांद्याच्या भावावरुन मोठे आंदोलन झाले होते, तोही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी अधोरेखीत केला.

ग्रामीण महाराष्ट्रात राजकारण करायचे असेल तर भक्त हिंदुत्व किंवा टीका करुन उपयोग नाही. त्यासाठी शेकऱ्यांचे प्रश्न अधोरेखीत करावे लागतील. शेतकऱ्यांमध्ये एक आशावाद निर्माण करावा लागेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने मोठी शेतकरी कर्ज माफी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विषयी सहानुभूती आहे. तोच मुद्दा त्यांनी पुन्हा उपस्थित केला. यामुळे मुंबईचे राजकारण येथे चालणार नाही, हा मुद्दा उद्धव ठाकरेंच्या लक्षात आला असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण महाराष्ट्रात राजकारण करताना शेतीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ठाकरे यांनी तोच धाका पकडला.

सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या सरकारने कर्जमाफी योजना राबवली होती. त्याचा फायदा द्राक्षबागांना मिळाला नव्हता. पण, दोन लाखांपर्यंत कर्ज माफ केले होते. नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदानाची तरतूद अंदाजपत्रकात केली होती. पण आपले सरकार गेले. आम्ही पाचव्या वर्षापर्यंत दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करून शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे माझे स्वप्न होते. मात्र, गद्दारांना माती खाल्ली, असा टोलाही त्यांनी लगावला.

नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात आवाज उठवा, असे आवाहन कृष्णा नावाच्या शेतकऱ्याने पत्राद्वारे केले होते. मुख्यमंत्र्यांच्या शेतात दोन दोन हेलिपॅड. माझा शेतकरी मात्र रात्री शेतात जातो, त्याला दिवसा वीज मिळत नाही. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही. कृषीमंत्री कुठे दिसतात का? त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांना किती फटका बसला हे काळोखात जाऊन पाहतात. असे हे दिव्यदृष्ठी लाभलेले कृषीमंत्री म्हणून लाभले आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकार निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT