Amit Shah Sarkarnama
विश्लेषण

Amit Shah: 'गळती' रोखण्याचं चॅलेंज अन् 'फोडाफोडी'चा सल्ला; अमित शाहांची नेमकी 'स्ट्रॅटेजी' काय?

Rahul Gadkar

Kolhapur News : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. मागील दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या घसरणीला यंदा महाविकास आघाडीमुळे ब्रेक लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे अनेकजण आकर्षित झाले आहेत. युतीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी अन् काँग्रेससोबत गेला.

भाजपने शिवसेना- राष्ट्रवादी फोडून राज्यात सत्ता स्थापन केली. पण लोकसभा निवडणुकीत दोन पक्ष फोडल्याचा फटका भाजपला बसला. फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यात धक्का बसत असताना केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुन्हा एकदा कोल्हापुरात येऊन विरोधी पक्ष फोडण्याचा सल्ला दिला.

गेल्या 2014 पासून तिमाही, सहामाही परीक्षेत पास झालेला भाजप २०१९ च्या वार्षिक परीक्षेत नापास झाल्याचे चित्र आहे. एक ही भाजपची जागा निवडून आली नाही . मात्र लोकसभेपर्यंत अनेक जण भाजपात होते. या विधानसभेला उमेदवारीवरून झालेली नाराजी ही भाजपला गळतीकडे घेऊन गेली आहे. त्यामुळे भाजपमधलीच गळती रोखण्याचे आव्हान पक्षापुढे आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नुकताच कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यात महासैनिक दरबार हॉल येथे पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा मेळावा भाजपसाठी महत्त्वाचा मानला जातो. विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनीती काय असावी? हे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी स्पष्ट करत असताना विरोधी पक्षांना फोडण्याचा सल्ला पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

वास्तविक पाहता गेली दहा वर्षे केंद्रात भाजपची सत्ता आहे. राज्यात सात वर्षे सत्ता आहे. मात्र, तरीही भाजप जनमानसांत आपली छबी निर्माण करू शकला नाही. विकासकामांचा चेहरा भाजपकडे नाही, असे अमित शाह यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. कारण लोकसभा निवडणुकीत पराभवाची भीती आणि कुणकुण लागल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला.

ज्या काँग्रेसला भाजप संपवण्यासाठी निघाली होती. तीच काँग्रेस लोकसभा निवडणुकीत मातब्बर ठरली. असे असताना पुन्हा एकदा अमित शाह यांनी दिलेला फोडाफोडीचा सल्ला पुन्हा एकदा भाजपला घसरणीवर नेऊन ठेवणार आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे.

उमेदवारीचा पेच

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात भाजप झपाट्याने वाढला. तालुका तालुक्यात भाजपमध्ये इनकमिंग झाली. कागलमधून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, आणि राधानगरीतून राहुल देसाई यांचे आगमन भाजपमध्ये झाले. मात्र, ज्या भाजपने भ्रष्टाचार बाहेर काढण्याच्या नादात ज्यांच्यावर आरोप केले. त्यांनाच लोकसभा निवडणुकीत सोबत घेतले.

आता विधानसभा निवडणुकीला सोबत घेऊनच लढणार आहेत. त्यामुळे इन्कमिंग झालेल्या घाटगे आणि देसाई यांच्यासमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला. आणि दहा वर्षांतच त्यांनी भाजपला रामराम ठोकला. 2014 चा अपवाद वगळता 2019 च्या निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नाही. 2014 ला केवळ दोन आमदार या जिल्ह्याने भाजपला दिले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अस्तित्व असूनही भाजप या मतदारसंघात सिद्ध झाला नाही. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फोडाफोडीचा मुद्दा समोर करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यात विरोधक यशस्वी झाले.

भाजप कार्यकर्त्यांची कोंडी...

भाजपच्या फोडाफोडी राजकारणामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या कार्यकर्त्यांतील अस्वस्थता वाढली आहे? ती अस्वस्था रोखण्यासाठी भाजपकडे ठाम भूमिका नाही. त्यामुळेच घाटगे आणि देसाई यांनी पक्षाला रामराम केला हे चित्र आहे.

2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले. जीवाचे रान करून रणांगणात उतरले. तेच भाजपचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत मागे दिसले. याचे कारण म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणामुळे मतदारसंघात झालेली भाजपच्या कार्यकर्त्यांची कोंडी.

'कानामागून आली आणि तिखट झाली...'

भाजपने फोडाफोडीच्या राजकारणात बसलेला पक्षाला फटका यापासून धडा घेणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी फोडाफोडीच्या राजकारणामुळे इतर पक्षातील आपल्या पक्षात आलेल्या नेत्यांमुळे कार्यकर्त्यांची अधिक कोंडी निर्माण होणार आहे.

आतापर्यंतच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये भाजपने नंबर वन होण्याचे ध्येय ठेवले आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आल्यानंतर भाजपसोबत 'काना मागून आली आणि तिखट झाली' असे घडले आहे. त्यामुळे अशा राजकारणामुळे कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह निर्माण होण्याऐवजी त्यांच्यात अधिक नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT