Ajay Mishra and Amit Shah
Ajay Mishra and Amit Shah 
विश्लेषण

केंद्रीय मंत्र्यांची विकेट? अमित शहांच्या दरबारी तातडीने हजेरी

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्याने 3 ऑक्टोबरला आठ जणांना चिरडले होते. यात चार शेतकऱ्यांचा (Farmers) समावेश होता. मिश्रा यांचा मुलगा आशिष यातील एक गाडी चालवत होता, असा दावा करण्यात आला आहे. यामुळे अडचणीत आलेल्या अजय मिश्रा यांना आज तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पाचारण केले. यामुळे त्यांना राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय मिश्रा हे अमित शहांच्या मंत्रालयाचेच राज्यमंत्री आहेत. आज ते शहांच्या भेटीसाठी दाखल झाले. मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. लखीमपूर खीरी प्रकरणामुळे भाजप बॅकफूटवर गेला आहे. पुढील वर्षाच्या सुरवातीला उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. या घटनेचा मोठा परिणाम आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून डॅमेज कंट्रोल मोहीम सुरू झाली आहे. या अंतर्गत मिश्रा यांना राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते. आजच्या अमित शहांची भेट ही त्यासाठीच होती.

माझा मुलगा घटनास्थळी असल्याचा एक पुरावा दाखवा, मी लगेच मंत्रिपदाचा राजीनामा देतो, अशी भूमिका अजय मिश्रा यांनी घेतली आहे. ते म्हणाले होते की, घटनेतील गाडी माझी आहे परंतु, मी अथवा माझा मुलगा घटनास्थळी नव्हतो याचा पुरावा आमच्याकडे आहे. आम्ही कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत. हा कट आखणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग दिला जात आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. घटना घडली त्यावेळी मी उपस्थित नव्हतो. परंतु, मी तेथील व्हिडीओ पाहिले आहेत. भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला होता. माझ्या मुलाविरुद्ध केलेले सर्व आरोप निराधार आहेत. तो तिथे उपस्थित नव्हता. तो तिथे हजर असता तर आज तो जिवंत नसता.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत.

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT