Beed News : बीडमध्ये ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडला. या निमित्ताने पुन्हा एकदा आरक्षणावरून मराठा-ओबीसी समाजातील वाद चव्हाटयावर आला आहे. या मेळाव्यात ओबीसी समाजाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या आरक्षणावर डोळा असणाऱ्या नेत्यावर घणाघाती हल्लाबोल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बचाव करताना त्यांनी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर तोफ डागली. तसंच फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्लॅनच सर्वांसमोर उघड केला. त्याचवेळी दुसरीकडे मनोज जरांगे यांच्यावर आक्रमकपणे टीका करत त्यांना टार्गेट करताना ओबीसी समाजाची बाजू प्रखरपणे मांडली. येत्या काळात ओबीसी आरक्षण बचावासाठी दुहेरी लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ओबीसी समाजाच्या बीड येथील महाएल्गार मेळाव्यात ओबीसी समाजाच्या आरक्षण वाचविण्यासाठी लक्ष्मण हाके, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ यांनी रणशिंग फुंकले आहे. या मेळाव्यातून त्यांनी 2 सप्टेंबरचा राज्य सरकारचा कुणबीबाबतचा जीआर रद्द करण्याची मागणी केली आहे.
यावेळी मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांच्यावरही भुजबळ तुटून पडले होते. विखे आला आणि राज्यात विखार पसरवला अशास्वरूपाची जहरी टीका केली. मनोज जरांगे-पाटील यांच्याशी वारंवार भेटीगाठी घेणाऱ्या विखेंना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप (BJP) असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. बरे गेला तर गेला पण जीआर काढून गेला. त्यानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यास सुरुवात झाली. त्यानुसार एकाच दिवसांत त्यांना कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली. आम्हाला तर आठ ते दहा महिने लागले दाखले काढायला मग यांनाच कसे एका दिवसांत दाखले देत आहात? याबाबत मी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना याबाबत विचारले. त्यासोबतच भुजबळांनी भाजपला इशारा दिला की, हे जर थांबवले नाही ना तर ओबीसी हा तुमचा डीएनए कधी सरकेल सांगता येणार नाही. त्यामुळे येत्या काळात यावरून पुन्हा एकदा राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा हा आरक्षणाचा मुद्दा तापणार आहे.
विखेंनी जीआर काढून जरांगेंच्या हातात दिला, त्यात पात्र मराठा व्यक्तींना कुणबी म्हणून दाखला देण्यात यावा, असे म्हटले होते. पण एका तासात पात्र हा शब्द काढण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूरमध्ये असताना विखेंनी परस्पर जीआरमधून हा शब्द कसा काय काढला? अशा शब्दांत भुजबळ यांनी विखे यांना धारेवर धरले आहे. तसंच मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की, ही मंडळी तुमच्या वाईटावर आलेली आहेत. तुम्हाला अडचणी निर्माण करणारे आहेत. त्यांचे टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस आहेत, असा इशारा देत मुख्यमंत्री फडणवीस यांना सावध करण्याचाही प्रयत्न केला.
भुजबळ पुढे म्हणाले, या भाजपच्या सगळ्या नेत्यांना मी सांगतो की, आज तुम्हाला ओबीसींच्या ताकदीवर 135 आमदार मिळाले आहेत. त्या ओबीसींवर जर अन्याय कराल तर आता ओबीसी दुधखुळे राहिलेले नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा काढला पाहिजे, असा इशारच यावेळी भुजबळांनी दिला. त्यामुळे येत्या काळात भाजपला ओबीसी समाज दुरावणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
या मेळाव्यात भुजबळ यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटलांवर केलेली आक्रमक टीका ही ओबीसी समाजाच्या मंचावरून केली असल्याने, हा भुजबळ यांच्या आक्रमक ओबीसी भूमिकेचा एक भाग मानला जात आहे. भुजबळांच्या या जहरी टीकेमुळे महायुतीतील भाजप-राष्ट्रवादीअंतर्गत तणाव येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता असून, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते अधिक आक्रमक झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.