SushilKumar Shinde, Praniti Shinde  Sarkarnama
विश्लेषण

Sushilkumar Shinde : 'हिंदू दहशतवाद' हा शब्द वापरणाऱ्या शिंदेंसाठी भाजप पायघड्या घालणार का...?

Sachin Waghmare

Political News : दहा वर्षांपूर्वी जयपूर येथे काँग्रेसचे चिंतन शिबिर झाले. या शिबिरात भाषण करताना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपला चांगलेच टार्गेट केले होते. यावेळी त्यांनी भाजप आणि संघपरिवाराच्या शिबिरांमध्ये दहशतवादाचे धडे दिले जातात. देशात भगव्या व हिंदू दहशतवादास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप उत्तेजन देत आहे, अशा शब्दांत टीका केली होती. शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर भाजपने शिंदे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. त्यावेळी माफीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर शिंदे यांनी माफी मागितली होती. या सुमारे दहा वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याची आठवण करून देण्याचे कारणही तसेच आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुशीलकुमार शिंदे यांनी मला एका नेत्याकडून भाजपप्रवेशाची ऑफर आली असल्याचा गौप्यस्फोट केला, तर सुशीलकुमार शिंदे हे सुसंस्कृत नेते आहेत, असे सांगत भाजपकडून त्यांच्या प्रवेशासाठी पायघड्या अंथरल्या जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षप्रवेशाचा प्रस्ताव पाठविल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता पुन्हा दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपप्रवेशाचा प्रस्ताव आला असल्याचा गौप्यस्फोट करून काँग्रेसमधून कदापि बाहेर पडणार नाही, असा शिंदे यांनी निर्वाळा दिला असला तरी राजकारणात काहीही घडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीपूर्वीच अशा प्रकारचे वक्तव्य करण्याच्या त्यांच्या हेतूबाबत शंका उपस्थित होत आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते केंद्रीय गृहमंत्री होते. यावेळी जानेवारी 2013 मध्ये जयपूर येथे काँग्रेसच्या चिंतन शिबिर झाले. या शिबिरात भाषण करताना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपला लक्ष्य केले होते. यावेळी त्यांनी भाजप आणि संघपरिवाराच्या शिबिरांमध्ये दहशतवादाचे धडे दिले जातात. देशात भगव्या व हिंदू दहशतवादास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून चालना दिली जाते. त्याशिवाय भाजप आणि संघाच्या शिबिरांमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.

या त्यांच्या वक्तव्यानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला होता. भाजपने शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यासाठी जागोजागी आंदोलन करून शिंदे यांची कोंडी केली होती. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमधील गृहमंत्र्यांनी ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्द वापरल्याने भारताचा दहशतवादविरोधी लढा कमकुवत झाला असल्याची टीका राजनाथ सिंह यांनी लोकसभेत केली होती. त्याला उत्तर देताना शिंदे यांनी हा शब्दप्रयोग आपण संसदेमध्ये केला नसल्याचे स्पष्ट करीत जयपूर येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द वापरला असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भाजप व काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे वक्तव्य मागे न घेतल्यास, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपने दिला होता. तेव्हा काँग्रेसनेही शिंदेंच्या वक्तव्यापासून स्वतःला बाजूला केले होते. त्यामुळे एकाकी पडलेल्या शिंदेंनी घूमजाव करीत आपले वक्तव्य मागे घेतले होते. शिंदे यांना तसे म्हणायचे नव्हते, पण त्यांची जीभ घसरली, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगत यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. शिंदे यांनी या वक्तव्यावरून पलटी मारली होती. त्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते.

या सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याचा त्यानंतरही भाजपने चांगलेच भांडवल केले होते. संधी मिळताच त्यांनी काँग्रेसची कोंडी केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातल्या पहिल्याच प्रचारसभेत ‘हिंदू दहशतवादा’वरून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘हिंदू दहशतवाद ही जुनी गोष्ट झाली आहे. त्यानंतर भाजप सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याने ते आता जुने विषय बाहेर काढत आहेत,' असे शिंदे यांनी या टीकेवर उत्तर दिले होते.

दुसरीकडे संघ आणि भाजपवर एवढी जोरदार टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुण्यात ऑगस्ट २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार दिला जात असताना त्यास विरोध दर्शवला नाही. ट्रस्टचे विश्वस्त असूनही, त्यांनी या पुरस्कारास मान्यता दर्शवली.

त्यानंतर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chnadrakant Patil) यांनी प्रतिक्रिया देताना सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे काही कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय सुसंस्कृत म्हणून प्रसिद्ध आहेत, असा उल्लेख केला. अशी सुसंस्कृत फॅमिली, अशा सुसंस्कृत प्रणिती शिंदे (praneti shinde) भाजप पक्षात आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. पण अशी कुठलीही ऑफर भाजपने दिली नाही किंवा तशी कुठलीही इच्छा त्यांनी व्यक्त केलेली नाही, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे येत्या काळात भाजपवर भगव्या व हिंदू दहशतवादी अशा शब्दांत टीका करणाऱ्या सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde) यांना येत्या काळात माफ करून भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार का ? यावरून भाजपच्या गोटात मतभेद असले तरी त्यांना अशा प्रकारची ऑफर कोण दिली असेल, याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे अशा प्रकारचा गंभीर आरोप करून त्याच पक्षात प्रवेश करणे सुशीलकुमार शिंदे यांच्या नैतिकतेला शोभणारे आहे का ? याची चर्चा जोरात सुरू आहे.

(Edited by Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT