Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Budget Session : तुम्हीही शिंदेंच्या गटात जावा अन॒ त्यांच्या यादीतून तुमच्या कारखान्यांचा नंबर लावा : अजितदादा विधानसभेत असं का म्हणाले?

Vijaykumar Dudhale

मुंबई : राज्यातील नऊ साखर कारखान्यांना १०३१ कोटी रुपये कर्ज देण्यात येणार आहे. त्यांसदर्भातील टिपणी राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून (एनसीडीसी) आलेली आहे. हे नऊ कारखाने हे भाजपचे आहेत. एवढं एकतर्फी करून कसं चालेल, एवढा दुजाभाव करू नका. इतरही साखर कारखान्यांना नियमानुसार कर्ज द्यावं, अशी मागणी करतानच ‘मला तर कधी कधी विचार येतोय, त्या कारखानदारांना सांगावं की काय, तुम्हीही तात्पुरतं एकनाथ शिंदेंकडे जावा आणि त्यांच्या यादीतून नंबर लावा,’ अशी मिश्किल टिप्पणीही विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. (You should join Shinde group and put the number of your sugar factories from their list : Ajit Pawar)

राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना कर्ज प्रकरणाची टिपणी अजित पवार यांनी वाचून दाखवली. ते म्हणाले की, साखर कारखान्यांमुळे महाराष्ट्रात आर्थिक सुबत्ता आली आहे. या पत्रात नऊ साखर कारखान्यांना १०३१ कोटी रुपये द्यायचे आहेत, असे दिसते.

या यादीत गणेश सहकारी साखर कारखाना, पद्यश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखाना (दोन्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित), शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी (आमदार अभिमान्यू पवार), रामेश्वर सहकारी साखर कारखाना (केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे), कर्मवारी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, नीरा भीमा सहकारी साखर कारखाना (दोन्ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील), शंकर सहकारी साखर कारखाना (आमदार रणजितसिंह मोहिते पाटील), वैद्यनाथ साखर कारखाना (पंंकजा मुंडे), भीमा सहकारी साखर कारखाना (खासदार धनंजय महाडिक) फक्त भाजप नेत्यांच्याच कारखान्यांचा समावेश आहे, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले की, जे पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीत होते, तोपर्यंत त्यांचे कारखाने तिकडे नव्हते. आता ते भाजपमध्ये गेले की चांगले झाले. गोमूत्र शिंपडल्यानंतर जसं पवित्र होतं, तसा प्रकार भाजपमध्ये गेल्यानंतर होतो. मी हे देवेंद्र फडणवीस यांनाही दाखवले. कारण, नाही म्हटलं तरी एकनाथ शिंदे यांचा सहकारी साखर कारखान्यांशी संबंध जरा कमी येतो. पण, विनय कोरे तुमचा येतो, तुम्हालाही माहिती आहे.

भारतीय जनता पक्षाचे नऊ कारखाने घेतले तर किमान तीन ते चार तरी विरोधी पक्षाशी संबंधित घेतले पाहिजेत ना. एवढं एकतर्फी असतं का हो. (विरोधी बाकावरून कुणीतरी कोरे यांनाही दिले नाहीत, अशी कमेंट केली, त्यावर अजित पवार यांनी त्यांना अगोदरच दिले आहेत, महाराज. तुम्हाला माहिती नाही. त्यांना १०० कोटी रुपये दिले आहेत. पण त्यांनी तरी काय वैयक्तीक घेतले नाहीत, वारणा परिसरातील शेतकऱ्यांसाठीच ते घेतले आहेत, असे स्पष्ट केले) या नऊ कारखान्यांना सर्वच लोकांचा ऊस जातो. मात्र, एवढं एकतर्फी करून कसं चालेलं. एवढं दुजाभाव करू नका, अशी विनंतीही अजित पवारांनी केली.

सरकारकडे आलेले आहेत. पण, ते सत्ताधारी पक्षाशी संबंधित नाहीत, म्हणून त्यांना न देणे चुकीचे आहे. मला विचार करावा लागतोय की, त्या कारखान्यांना सांगावं की काय, तुम्हीही तात्पुरतं मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जावा आणि त्यांच्या यादीतून तुमचा नंबर लावा. हे बरोबर नाही. तेवढ्यात मुख्यमंत्र्यांकडून ‘आमची यादी नाही,’ अशी कमेंट आली. त्यावर हजरजबाबी पवारांनी ‘तुमची यादी नाही. कारण अजून तुम्हाला साखर कारखानदार मिळालेच नाहीत,’ अशी कमेंट केली. (त्यावर अख्खं सभागृह हास्यकल्लोळात बुडाले)

काही गोष्टी चुकीच्या झाल्या असतील, पण पाच-दहा टक्क्यांसाठी नव्वद टक्क्यांना शिक्षा का, असा सवालही त्यांनी केला. त्यावर भास्कर जाधव यांनीही संधी साधली. साखर कारखान्यांमुळे शंभर टक्के मराठी माणसाला न्याय मिळाला आहे. या कारखान्यांमुळे मराठी शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता आलेली आहे, हे लक्षात घ्या तुम्ही, असे त्यांनी सरकारला सुनावले) या प्रकरणी सरकारने लक्ष घालावे, अशी मागणीही अजित पवार यांनी या वेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT