Waqf Amendment Bill Sarkarnama
विश्लेषण

Waqf Amendment Bill: मुस्लिम समाजाच्या उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा वाढल्या, ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: मोदी सरकारने लोकसभेत नुकत्याच सादर केलेल्या वक्फ बोर्ड अधिनियम -१९९५ या विधेयकाबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे मुंबईतल्या मुस्लिम मतदारांचे लक्ष लागले आहे. ज्या वेळी हे विधेयक मतदानासाठी येईल त्यावेळी ठाकरे गटाच्या खासदारांनी या विधेयकाला विरोध करावा, अशी या समाजातल्या मतदारांची अपेक्षा आहे.

याबाबत बोलताना विधीज्ञ व सामाजिक कार्यकर्ते झुबेर आझमी म्हणाले, "ठाकरे गटाच्या संसदीय मंडळाचे सदस्य अरविंद सावंत यांच्याशी मी बोललो. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की, ते या विधेयकाचा विरोध करतील. मी त्यांना म्हटले आहे की पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे.

भूमिका न मांडल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या पक्षाबाबत नाराजी पसरली आहे. ठाकरे गटाकडून याबाबत अधिकृत वक्तव्य येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. अरविंद सावंत हे ज्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत त्या मतदारसंघात मुस्लिम मतदार २५ टक्के आहेत व सावंत येथून ५०,००० मतांनी जिंकले आहेत."

नुकतच मोदी सरकार ३.० ने ‘वक्फ बोर्ड अधिनियम – १९९५’ या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेत सादर केलं. यासंदर्भात आधी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ४० सुधारणांवर चर्चा करून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या सुधारित विधेयकाला अनेक विरोधी पक्षांनी व काही संघटनांनी विरोध केला आहे. इंडिया आघाडीतील पक्ष या सुधारित विधेयकाच्या विरोधात आहेत. या विधेयकाबाबत ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

संसदेबाहेर विधेयकास विरोध केल्याने हिंदुत्ववादी संघटना व पक्ष ठाकरे गटाविरोधात आक्रमक झाल्या होत्या. शिवसेनेनं गेल्या अनेक दशकांपासून हिंदुत्वाचं राजकारण केलं आहे. त्यामुळे वक्फबाबतच्या सुधारित विधेयकाला विरोध दर्शवणाऱ्या ठाकरे गटावर हिंदुत्ववादी संघटना टीकेचे शरसंधान करत आहेत.

दुसऱ्या बाजूला, गेल्या पाच वर्षांपासून ठाकरे गट काँग्रेसबरोबर आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुस्लिम मतदारांनी भरभरून मतदानही केलं. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाविकास आघाडीबरोबर निवडणुकीच्या मैदानात उतरला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मुस्लिम मतदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळेच आता वक्फ विधेयकाबाबत मुस्लिम नेत्यांच्या ठाकरे गटाकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत.

त्यातच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पहिल्याच संयुक्त मेळाव्यात याबाबत आपली भूमिका मांडली होती. सेक्युलर संविधान असा उल्लेख करणाऱ्या पंतप्रधान मोदींवर त्यांनी निशाणा साधला होता. आपापसात आगी लावण्यासाठी तुम्ही हे विधेयक आणलेत, असा आरोप ठाकरेंनी केला होता. हिंमत होती तर बहुमत तुमच्याकडे असूनही तुम्ही हे विधेयक मंजूर का नाही करुन दाखवलं, असा सवालही ठाकरे यांनी विचारला होता.

"आमचा पक्ष विरोधकांच्या इंडिया आघाडीचा एक भाग आहे. विधेयक मांडलं तेव्हा खासदारांनी उपस्थित राहणं अत्यावश्यक नव्हतं. कारण विधेयक मंजूर झालेलं नाही. वक्फ बोर्डाच्या कामकाजावर चर्चा व्हायला हवी, असं आम्हाला वाटतं. जमीन घोटाळे ही एक मोठी समस्या असली तरी ते केवळ वक्फ बोर्डापुरतं मर्यादित नाही. या घोटाळ्यांच्या समस्येवर व्यापक चर्चा होणं आवश्यक आहे,'' अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच मांडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT