सतीश पाटणकर
Rambhau Naik Started National Anthem in Parliament: भारताचे राष्ट्रगीत 'जन-गण-मन' आणि राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ (Vande Mataram) हे आपल्या देशाचा इतिहास आणि परंपरा दाखवतात. या गीतातून देशातील वेगवेगळ्या राज्यांची ओळख स्पष्ट होते. शिवाय देशातील नागरिकांना यातून एकतेचा संदेशही दिला जातो. शालेय जीवनापासून ही दोन गीत आपण ऐकत आणि गात आलो आहोत.
आता तर सिनेमाच्या थिएटरमध्येदेखील राष्ट्रगीत (National Anthem) वाजवलं जातं. शिवाय देशाच्या सर्वोच्च अशा संसदेतसुद्धा हे गीत वाजवलं जातं. परंतु हे गीत कधीकाळी संसदेत वाजवायचं की नाही? यावर मतभेद होते. परंतु हे गीत संसदेत वाजलचं पाहिजे यासाठी एका मराठी खासदाराने पुढाकार घेतला आणि तिथून संसदेत राष्ट्रगीत वाजवण्याची परंपरा सुरू झाली.
साल होतं 1947 आपला भारत देश या काळात इंग्रजांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र व्हायला सुरुवात झाली होती. 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री पहिल्यांदा संविधान सभेची (Constituent Assembly) बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपाला 'जन-गण-मन' गायले गेले. पण, पुढे ही प्रथा सुरू राहिली नाही. संसद अधिवेशनाच्या सुरुवातीला (Parliament Session) जसं 'जन-गण-मन' गायलं जावं तसंच समारोपाच्या वेळी वंदे मातरम हे गीत गायलं जावं, असा प्रस्ताव ठेवण्यात आला, परंतु यासाठी 1991 साल उजाडावं लागलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अनेक देशांच्या संसदेमध्ये त्यांच्या देशाचे राष्ट्रगीत म्हणण्याची प्रथा असून, संसद ही देशाची सर्वोच्च कार्यप्रणाली असते. मात्र, भारतात ही प्रथा नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले आणि भाजपच्या तिकिटावर खासदार झालेल्या रामभाऊ नाईक (Rambhau Naik) यांच्या लक्षात आलं. इतर देशांप्रमाणे आपल्या संसदेतही राष्ट्रगीत म्हटलं जावं, असं रामभाऊंना वाटलं. शिवाय त्यांनी तत्काळ लोकप्रतिनिधीच्या नात्याने तशी पावलं उचलली.
याबाबतचा प्रस्ताव संसदेत आणायचं त्यांनी ठरवलं आणि योग्य त्या संसदीय मार्गाचा अवलंब करूनच आपली ही कल्पना त्यांनी मांडली. प्रस्ताव जेव्हा संसदेत चर्चेला ठेवला गेला तेव्हा काही खासदारांकडून या प्रस्तावाला अनुमोदन मिळालं तर काहींनी विरोध केला. दरम्यान, जेव्हा या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली, तेव्हा 'जन-गण-मन' म्हटलं जावं की 'वंदे मातरम' म्हटलं जावं यावर चर्चा झाली. तसेच संसद सुरू होण्याच्या वेळी राष्ट्रगीत म्हटलं जावं की राष्ट्रीय गीत? यावर ही चर्चा येऊन पोहोचली.
विरोध करणाऱ्यांचं म्हणणं होत की, जर राष्ट्रगीत वाजवायला सुरुवात करायला हरकत नाही. मात्र, देशाच्या सर्वोच्च अशा संसदेत कोणत्याही प्रकारे या राष्ट्रगीताच्या सन्मानाला धक्का पोहोचता कामा नये. जसं की हे राष्ट्रगीत सुरू असताना लोकप्रतिनिधींनी स्तब्ध न उभं राहणं, चुळबूळ करणं वगैरे. त्यावर जे गीत वाजवलं जावं या पक्षात होते त्यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, असा प्रकार म्हणजे लोकप्रतिनिधींमध्ये देशाभिमान नसणे असाच अर्थ होऊ शकतो.
परंतु, लोकप्रतिनिधी हे सज्ञान असतात म्हणूनच ते देशाच्या सर्वोच्च सभागृहात येतात. त्यामुळे हे गीत वाजवलं जावं हा प्रस्ताव पारित करण्यात यावा. शेवटी बऱ्याच विचाराअंती हा प्रस्ताव पारित करण्यात आला आणि संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी जन-गण-मन म्हटलं जावं तर संसदेचे कामकाज संपल्यावर वंदे मातरम म्हटलं जावं यावर सर्वांचं एकमत झालं आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली ती आतापर्यंत कायम आहे.
(लेखक : मुख्यमंत्रांचे माजी माहिती अधिकारी आहेत )
(Edited By Jagdish Patil)
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.