
बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेल्या येडियुरप्पांवर भाजपने (BJP) अद्याप कोणतीही जबाबदारी टाकलेली नाही. यामुळे नाराज असलेल्या येडियुरप्पांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतच त्यांनी हे बोल सुनावले आहेत.
भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बंगळूरमध्ये झाले. या बैठकीला येडियुरप्पा यांनी मागर्दर्शन केले. मोदी लाटेमुळे लोकसभा निवडणुकीत यश मिळण्यास मदत होईल परंतु, राज्यातील निवडणुकात नाही, असे त्यांनी सुनावले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रात चांगले काम करीत आहेत. ते पुढील निवडणुकीनंतर पुन्हा पंतप्रधान बनतील. परंतु, राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस जागी झाली आहे. विरोधी पक्ष आता पुढील रणनीती आखू लागले आहेत. आपण आणखी कठोर मेहनत करण्याची आवश्यकता आहे. पक्षाने आता बूथ पातळीवरुनच लक्ष घालायला हवे. असे केले तरच आपण काँग्रेसला धडा शिकवण्यात यशस्वी होऊ. हनेगळ आणि सिंदगी या पोटनिवडणुका जिंकणे सोपे नाही. ही आपल्यासाठी अग्निपरीक्षा आहे. आपण विकासाच्या मुद्द्यावरच भर द्यायला हवा.
येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर दोन महिन्यांत पक्षाने त्यांच्यावर कोणतीच संघटनात्मक जबाबदारी टाकलेली नाही. यामुळे येडियुरप्पा हे नाराज आहेत. येडियुरप्पांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहता ते भाजपला पुन्हा अडचणीत आणू शकतात. त्यांनी 2013 मध्ये भाजप सोडून स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. त्यावेळी काँग्रेसला विजय मिळाला होता. येडियुरप्पांनी त्यावेळी मोजक्या जागा मिळाल्या तरी भाजपचा पराभव करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
राज्यात 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांनी स्वतंत्रपणे राज्याच्या यात्रेची घोषणा केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या दौऱ्यात येडियुरप्पा हे भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतील. यामुळे पक्ष नेतृत्व धास्तावले आहे. नेतृत्वाने केलेल्या विनंतीनंतर केवळ प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांनाच यात्रेत सहभागी करुन घेण्यास येडियुरप्पांनी होकार दर्शवला आहे.
येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.