

Ayodhya temple donation process: अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच या संपूर्ण प्रकरणात नवे खुलासे समोर येत आहेत. या मुद्द्यावर देशभरात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून विविध स्तरांवर चर्चा रंगली आहे.
काहीजण मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा दावा करत आहेत, तर काहींनी मंदिर प्रशासन आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, या सर्व प्रकरणाचे खरे चित्र तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मंदिरात भक्तांकडून दान म्हणून मिळालेल्या चांदीच्या वस्तूंविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राम मंदिरात अनेक भाविक विविध प्रकारच्या चांदीच्या वस्तू अर्पण करत होते.
या वस्तूंची संख्या वाढत गेल्याने त्यांचे व्यवस्थापन आणि सुरक्षित साठवणूक करणे कठीण होत होते. त्यामुळे मंदिर प्रशासनाने या चांदीच्या वस्तू वितळवून त्यांचे चांदीच्या विटांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता.
यासाठी सुमारे 1000 किलोग्राम चांदी हैदराबादला पाठवण्यात आली होती. हैदराबादमधील सरकारी सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेकडे चांदी वितळवण्याचे आणि त्याचे विटांमध्ये रूपांतर करण्याचे काम करण्यात येत होते. त्यामुळे अयोध्येत दान झालेली चांदी थेट हैदराबादला का पाठवली जात होती, याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची काही प्रमाणात उत्तरे मिळाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदीच्या वस्तू हैदराबादला पाठवणे, त्यांची तपासणी करणे, शुद्धता पडताळणे आणि त्यांचे विटांमध्ये रूपांतर करून पुन्हा परत आणणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च होत होता. वाहतूक खर्चासोबतच तांत्रिक प्रक्रियांसाठीही मोठी रक्कम खर्च करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मंदिरातील दान व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि जबाबदार करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. विशेषतः दागिने आणि मौल्यवान वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र आणि उत्तरदायी व्यवस्था उभारण्याचे प्रस्ताव यापूर्वीही मांडण्यात आले होते. आता ट्रस्टच्या आगामी बैठकीत हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.