
Bharat Jodo Yatra News: काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तब्बल 125 दिवसांत देशातील 13 राज्यांतून प्रवास करत जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे शुक्रवारी (दि.२०) सकाळी दाखल झाली आहे. हा भारत जोडो यात्रेचा हा अंतिम टप्पा असून पुढील ९ दिवस येथे मुक्काम असणार आहे.
मात्र, ज्यावेळी गांधी यांची यात्रा कठुआ येथे पोहचली तेव्हा प्रचंड पाऊस कोसळत होता. आणि गेल्या १२५ दिवसांपासून सुरु असलेल्या भारत यात्रेत पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी रेनकोट परिधान केलेला पाहायला मिळाला. नाहीतर भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी हे कायम टीशर्टवर दिसून आले होते. याची जबरदस्त चर्चा होत आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील सहभागी झाले होते. राहुल यांनी यात्रेदरम्यान स्वागतासाठी आलेल्या नागरिकांना अभिवादन केले. यावेळी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राहुल पठाणकोट सीमेवर दाखल झाले होते. यावेळी गांधी म्हणाले,या भूमीत पाऊल ठेवण्यापूर्वी मी तुमच्यासमोर नतमस्तक होत आहे. कारण इथल्या लोकांच्या वेदना आहेत, प्रत्येकजण दुखावला असून संकटात आहे याची मला जाणीव आहे. म्हणूनच मी तुमच्या वेदना वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे.
तुमचा धर्म, जात,काहीही असो, मग तुम्ही श्रीमंत असो की गरीब, तरुण असो वा वृद्ध, हा देश तुमचा आहे. आणि तुम्ही या देशाचे आहात असंही राहुल गांधी (Rahul Gandhi) यावेळी बोलताना सांगितले.
पूर्वज जम्मू-काश्मीरमधून उत्तर प्रदेशात गेले. मी त्याच ठिकाणी जात आहे. घरी परत आल्यासारखे वाटले. जेव्हा कोणी आपल्या मुळाशी जातो तेव्हा तो स्वतःबद्दल आणि देशाच्या लोकांबद्दल खूप काही शिकतो. पुढील 9 दिवस मी जम्मू-काश्मीरच्या लोकांकडून फक्त शिकेन, मी काहीही बोलणार नाही असंही गांधी यावेळी म्हणाले.
'टीशर्ट'वरील टीकेवर काय म्हणाले होते राहुल गांधी?
भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशात दाखल झाली असताना कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी कोणत्याही उबदार कपड्यांविना फक्त पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर चाललेले चित्र पाहायला मिळाले होते.याचमुळे राहुल गांधी यांना थंडी वाजत नाही का? कडाक्याच्या थंडीत फक्त पांढऱ्या टीशर्टवर ते कसे चालू शकतात? असे सवाल उपस्थित करत यावर मोठी चर्चा झाली होती.
यावर गांधी यांनी मी या यात्रेदरम्यान टीशर्टवर चालत आहे. मात्र माझ्यासोबत अनेक गरीब शेतकरी, कामगार यांची मुलंदेखील चालत आहेत. त्यांच्या अंगात फाटलेले कपडे आहे. मात्र माध्यमं या मुलांच्या अंगातील फाटलेल्या कपड्यांबाबत विचारत नाहीत. सध्याच्या कडाक्याच्या थंडीत शेतकरी, कामगारांची मुलं कोणत्याही स्वेटर, जॅकेटविना का चालत असावेत असा प्रश्न माध्यमांकडून विचारला जात नाही.
मात्र, माझा टीशर्ट हा मुख्य मुद्दा नाही. मात्र या देशातील मुलं, शेतकरी, कामगार ऊबदार कपड्यांविना आहेत हा मुख्य मुद्दा आहे असं प्रत्युत्तर टीशर्टवरुन झालेल्या विरोधकांच्या टीकेवर दिले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.