Election Commission vs Rahul Gandhi : तुम्हीच तारीख अन् वेळ सांगा..! निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आधी चॅलेंज, आता पुरावेच दिले...
Maharashtra Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने आरोप केले जात आहे. प्रामुख्याने लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या कालावधीत वाढलेल्या मतदानावर त्यांच्याकडून आक्षेप घेतला जात आहे. मंगळवारी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात मतचोरी झाल्याचा आरोप केला. त्याला फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. आता निवडणूक आयोगाकडूनही सर्वच जिल्ह्यांतील तक्रारींबाबत माहिती देण्यात आली आहे.
राहुल गांधी यांचा जून महिन्याच्या सुरूवातीलाच अनेक वृत्तपत्रांमधून महाराष्ट्रातील निवडणुकीतील कथित घोळाबाबत लेख प्रसिध्द झाला होता. यामध्ये त्यांनी एकूण मतदान, काही मतदारसंघातील मतदान, मतदारसंख्या, वाढलेले मतदान आदी आकडेवारी देत मतदारयाद्यांमध्ये घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला होता.
राहुल यांच्या या आरोपांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने 12 जून रोजी त्यांना पत्र पाठवून याबाबत वैयक्तिक भेटण्यासाठी आमंत्रित केले होते. तुम्ही तारीख आणि वेळ सांगा, असेही आयोगाने या पत्रात म्हटले होते. पण अद्याप राहुल यांच्याकडून निवडणूक आयोगाला याबाबत काही प्रतिसाद मिळाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आयोगाकडून राहुल यांना चर्चेला बोलावण्यात आल्यानंतरही त्यांच्याकडून आरोप सुरूच आहेत. आज त्यांनी फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यांत आठ टक्के मतदार वाढल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी एका वृत्ताचा दाखला दिला आहे. त्यावर फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या विविध उमेदवारांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदारांची आकडेवारी सांगत पलटवार केला.
राहुल यांनी थेट फडणवीसांना लक्ष्य केल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानेही मतदारयाद्यांबाबतची माहिती सोशल मीडियातून दिली आहे. आयोगाने म्हटले आहे की, मतदारयाद्या सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांना देण्यात आल्या होत्या. निवडणुकीआधी 2024 च्या दुसऱ्या विशेष मोहिमेमध्येही तात्पुरत्या आणि अंतिम मतदारयाद्या सर्व 288 मतदारसंघात काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या होत्या.
तात्पुरत्या व अंतिम मतदारयाद्या तयार करण्याच्या कालावधीमध्ये 19 लाख 27 हजार ५०८ हरकती व दावे प्राप्त झाले होते. कायद्यानुसार मतदार याद्यांमध्ये नाव समाविष्ट करणे किंवा काढून टाकण्याबाबत अपील करता येते. अशी केवळ 89 दावे दाखल झाले होते, अशी महत्वपूर्ण माहिती आयोगाने दिली आहे. एवढेच नाही तर आयोगाने प्रत्येक जिल्हानिहाय काँग्रेसला दिलेल्या याद्या, त्यावर आलेल्या हरकती व दाव्यांची माहितीही दिली आहे.
काँग्रेसला कोणत्या जिल्ह्यात कोणत्या दिवशी तात्पुरती व अंतिम यादी देण्यात आली, एकूण किती हरकती आल्या तर अंतिम यादीनंतर त्याविरोधात किती दावे दाखल करण्यात आले, याचा खुलासा आयोगाने केला आहे. त्यानुसार सर्वाधिक 79 दावे सातारा जिल्ह्यात दाखल झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.