नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (ता. 8 फेब्रुवारी) राज्यसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील झालेल्या चर्चेला उत्तर देतांना पुन्हा एकदा काँग्रेसवर (Congress) टीका केली आहे. त्यांनी आपल्या भाषणात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर बोलताना आगामी गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा मुक्ती संग्रामावरुन माजी पंतप्रधान पंडीत नेहरुंच्या (Pandit Nehru) भूमिकेवरही टीका केली. त्याबरोबरच मंगेशकर कुटुंबीय हे गोव्याचेच असल्याने त्यांच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाना साधला. लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू पंडीत हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांची काँग्रेसने गळचेपी करण्याचा प्रयत्न केला,असा आरोपही मोदींनी आपल्या भाषणात केला आहे.
मोदी म्हणाले, लता मंगेशकरांच्या निधनाने देश दुःखी झाल आहे. मात्र, मंगेशकरांचे कुटुंब हे गोव्यातील होते. त्यांच्या परिवारासोबत कशाप्रकारे अन्याय करण्यात आला. हृदयनाथ यांच्या देशभक्तीवर काँग्रेसने संशय घेत त्यांच्यावर केलेली कारवाई ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक प्रकारचा घाला होता. हे जाणून घ्या. गोव्याचे सुपूत्र पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. असे हृदयनाथ यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. सावरकरांनी हृदयनाथ यांना सांगितले होते की, माझी कविता सादर करुन तुला जेलमध्ये जायचंय का तेव्हा हृदयनाथ यांनी त्यांच्या देशभक्तीपर कवितेचा चाल देत सादर केले होते. त्यानंतर त्यांना दहा दिवसांतच नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचा, दावा मोदींनी आपल्या भाषणात केला आहे.
काँग्रेसच्या काळातील अन्याय झाल्याची यादी मोठी आहे. मज्नू सुलतानपुरी यांना पंडित नेहरु यांच्यावर टीका केल्यामुळे एक वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली होती. धर्मपालजी यांनाही जेलमध्ये टाकण्यात आले होते. किशोर कुमार यांना इंदिराजींच्या समर्थनात न बोलल्यामुळे त्यांनाही काढून टाकण्यात आले होते, अशी काही दाखले देत मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, आगामी गोवा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी लता मंगेशकरांचा उल्लेख मुद्दाम केला असून लता मंगेशकरांच्या निधनावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. तर दुसरीकडे मोदींनीही व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मुंबईत अंत्यसंस्कास हजेरी लावली होती. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत मोदींनी केलेल्या भाषणात गोवा आणि मंगेशकर कुटुंबीय यांचे नाते लक्षात घेत काँग्रेसवर निशाणा साधल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचे 40 विधानसभा मतदारसंघाचे मतदान एकाच टप्प्यात येत्या 14 फेब्रुवारी रोजी गोव्यात पार पडणार आहे. गोवा हे छोटे राज्य असले, तरी या राज्यावर आपली सत्ता असणे हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मोदींच्या भाषणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.