कॅप्टन पुन्हा काँग्रेसला देणार धक्का! अमित शहांच्या भेटीला दिल्लीत

माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे आज दिल्लीत पुन्हा अमित शहांची भेट घेत आहेत.
Amit Shah and Amarinder Singh
Amit Shah and Amarinder Singh File Photo

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालसह पंजाब, आसाम या राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (Border Security Force) अधिकार क्षेत्र वाढवले आहे. यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची खेळी असल्याची चर्चा आहे. बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढवल्याने काँग्रेसची सत्ता असलेला निम्मा पंजाब (Punjab) अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारच्या ताब्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) हे आज दिल्लीत पुन्हा अमित शहांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन यांचा हा तिसरा दिल्ली दौरा आहे. त्यामुळे या भेटीकडे लक्ष लागले आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन एकाच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढवले होते. या निर्णयाचे स्वागत करण्यात कॅप्टन अमरिंदरसिंग आघाडीवर होते. पंजाबमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. यातच अमित शहांनी ही खेळी खेळून निवडणुकीआधीच निम्मा पंजाब केंद्र सरकारच्या ताब्यात घेतला आहे.

राज्यात या निर्णयावरून वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी कॅप्टन यांची भेट घेतली होती. यानंतर कॅप्टन आता पुन्हा आज दिल्लीत अमित शहांची भेट घेत आहेत. कॅप्टन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरची त्यांची ही तिसरी भेट आहे. यात बैठकीत कॅप्टन हे नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ते भाजपसोबत हातमिळवणी करुन जागा वाटपाबाबत चर्चा करतील, असेही बोलले जात आहे.

Amit Shah and Amarinder Singh
अण्णाद्रमुक ताब्यात घेण्यासाठी शशिकलांनी टाकलं पहिलं जोरदार पाऊल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षांत सीमा सुरक्षा, जम्मू व काश्मीर आदी मुद्यांवर महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बीएसएफचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा निर्णयही महत्वाचा मानला जात आहे. बीएसएफला आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या राज्यांमध्ये आता सीमेपासून आतमध्ये 50 किलोमीटरपर्यंत अधिकार बहाल कऱण्यात आले आहेत. या भागात तपास करणे, संशयितांना अटक करणे, जप्ती करणे असे अधिकार मिळाले आहे. पंजाब, पश्चिम बंगाल व आसाममध्ये पूर्वी बीएसएफचे अधिकारक्षेत्र केवळ 15 किलोमीटर होते. आता सुधारित आदेशानुसार हे क्षेत्र 50 किलोमीटरपर्यंत वाढले आहे. त्यामुळे या क्षेत्रात बीएसएफला तपासणी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही.

Amit Shah and Amarinder Singh
जिवंत असलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना क्रीडामंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

बीएसएफला यापूर्वी पंजाबमध्ये केवळ 15 किलोमीटरपर्यंत अधिकारक्षेत्र होते. आता हे क्षेत्र 35 किलोमीटरने वाढवून ते 50 किलोमीटर करण्यात आले आहे. पंजाबचे क्षेत्रफळ सुमारे 50 हजार चौरस किलोमीटर आहे. आता बीएसएफच्या ताब्यात निम्मे राज्य म्हणजे 25 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग गेला आहे. याला काँग्रेसने विरोध केला असून, संघराज्य रचनेवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. यावरुन केंद्र सरकावर टीकेची झोड उठवली जात आहे. राज्यांच्या स्वायत्ततेवरच केंद्रातील भाजप सरकार घाला घालत आहे, अशीही टीका केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com