
Rajya Sabha Session : वक्फ सुधारित विधेयक गुरूवारी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. त्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरून भाजप व मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. मीडियासमोर ठाकरे फाडफाड बोलल्यानंतर खासदार संजय राऊत काही वेळातच राज्यसभेत कडाडले.
वक्फला विरोध करताना राऊत म्हणाले, कालपासून दोन्ही सभागृहात गरीब मुस्लिमांची अचानक खूप चिंता केली जात आहे. एवढी चिंता का होत आहे? बॅरिस्टर जीनांनीही एवढी चिंता कधी केली नव्हती. त्यांचा आत्मा तुमच्यात घुसल्यासारखे वाटले. आम्हाला आधी वाटत होते की, आम्ही सर्व मिळून हिंदू राष्ट्र बनवत होतो. पण आता हे पाहून असे वाटतेय की तुम्ही हिंदू पाकिस्तान बनवत आहात.
वक्फ विधेयक हे लोकांचे लक्ष विचलित करण्याची रणनीती आहे. ट्रम्प यांनी कालच 26 टक्के टेरिफ लावला. याचदिवशी हे बिल आणण्यात आले. टेरिफमुळे आपल्या देशावर काय प्रभाव पडणार, यावर चर्चा व्हायला हवी होती. पण त्यावरील लक्ष हटवण्यात आले आणि हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर लक्ष आणण्यात आले. जेव्हाही महागाई, रोजगार असे मुद्दे असतात, तेव्हा हिंदू-मुस्लिम मुद्दे आणले जातात, अशी टीका राऊतांनी केली.
तुम्हीच आहात जे मुस्लिमांना चोर बोलतात. मुस्लिम तुमची जमीन, मंगळसुत्र, गाय-बैल नेतील. महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या दुकानातून मटन घेऊ नका, मुस्लिम देशद्रोही आहेत, बटेंगे तो कटेंगे, असे बोलतात. आणि आता हेच मुस्लिमांच्या संपत्तीचे रखवालदार बनले आहेत. तुम्ही आम्हाला काही शिकवू नका. तुम्ही आत्ताच हिंदूत्वाचे मुल्ला बनले आहात. आमचाच जन्मच हिंदूत्वासाठी झाला आहे, असा हल्ला राऊतांनी चढवला.
काल गृहमंत्र्यांनी म्हटले की, 2025 च्या आधीच्या मशिदी, दर्ग्यांना हात लावणार नाही. पण रिक्त जमिनी विकून गरीब मुस्लिम महिला, मुलांच्या कल्याण्यासाठी वापरणार. ज्याची भीती होती, तेच झाले. अखेर तुम्ही खरेदी-विक्रीच्या मुळे उद्देशावर आला. तुम्ही जमीन विकूनच टाकणार. जे धारावीचे झाले, तेच होणार. अयोध्येत 13 हजार एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे. तुम्ही हिंदूंच्या जमिनीचे संरक्षण करू शकत नाही, असे राऊत म्हणाले.
तुमचे संपूर्ण लक्ष 2 लाख कोटींच्या जमिनीवर आहे. विकणारेही हेच आणि खरेदीही हेच करणार. जवळपास 40 हजार कश्मिरी पंडितांना घर मिळाले नाही, ते परत आलेले नाही. तुम्ही त्यांची चिंता करा. लडाखमध्ये चीन घुसून जमिनीवर कब्जा केला आहे. त्याची चिंता करा. या बिलामागे तुमचा उद्देश स्वच्छ नाही. हे बिल आपल्या समाजाच्या आणि देशाच्या हिताचे नाही. देशात तुम्ही पुन्हा तणाव निर्माण करू इच्छित आहात. हे धंदे बंद करा, असे म्हणत राऊतांनी भाषण संपवले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.