

BJP to introduce delimitation bill: मागील वेळी लोकसभेत मंजूर न होऊ शकलेले लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून पुन्हा मांडण्याच्या हालचाली मोदी सरकारच्या वतीने सुरू झाल्या आहेत.
या विधेयकाचे लोकसभेत २२ आणि राज्यसभेत आठ खासदार असलेल्या द्रमुकने समर्थन करण्याची चर्चा असून मोदी सरकारने काँग्रेसशीही संपर्क साधल्याची माहिती आहे, या विषयीचे वृत्त 'सकाळ'ने दिले आहे.
पावसाळी अधिवेशन येत्या १३ ऑगस्ट रोजी संपणार असून हे विधेयक मंजूर करण्यासाठी पुन्हा १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची सरकारची तयारी असल्याचे समजते.
२०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणीकरणे सोयीचे व्हावे म्हणून लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचे घटनादुरुस्ती विधेयक नव्याने मांडण्याची तयारी सरकारने चालविली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास लोकसभेच्या जागा ५४३ वरुन ८५० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
लोकसभेत आजच्या घडीला मोदी सरकारच्या बाजूने ३३२ खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदारही विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने सरकारने दोन तृतीयांश बहुमत गाठल्यात जमा आहे.
या पार्श्वभूमीवर आज संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू (Kiren Rijiju) यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत या विधेयकाविषयी चर्चा केल्याची माहिती काँग्रेसच्याच गोटातून देण्यात आली.
संसदेचा पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तलली जात असताना किरेन रिजिजू यांनी ही शक्यता फेटाळली आहे. ते म्हणाले, विधेयकासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची कोणतीही योजना नाही.