UP Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी आणि अखिलेश यादव (Rahul Gandhi and Akhilesh Yadav) या जोडीला उत्तर प्रदेशमध्ये पसंती मिळताना दिसत आहे. प्रयागराजमध्ये आयोजित सभेला गर्दी बेकाबू झाल्याने या दोघांना सभा रद्द करावी लागली. यानंतर या दोघांनी तिथेच बसून काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आघाडी देशासाठी काय करणार यावर भाष्य केलं. अग्निवीर योजना बंद कचऱ्याच्या डब्यात टाकून देत जुन्यापद्धतीने लष्करी सेवेत युवकांना सहभागी करून घेणार असल्याचं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं.
सहाव्या आणि सातव्या टप्प्यात उत्तर भारतात लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) होत आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस आघाडीने तिथे प्रचाराचा जोर लावला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) या जोडीला युवकांची पसंती मिळत आहे. या दोघे एकत्रितपणे प्रचारसभेत सहभागी होताना दिसतायत. प्रयागराज येथे आयोजित या नेत्यांच्या सभेत तुफान गर्दी झाली होती. गर्दी एवढी बेकाबू झाली की, पोलिसांना देखील गर्दीवर नियंत्रण करता आले नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गर्दीच्या चेंगराचेंगरीत अनेक युवक जखमी झाले. गर्दीला काबू करण्यासाठी हे दोघे पुढे झाले. तरी देखील गर्दी शांत झाली नाही. शेवटी दोघांनी व्यासपीठावर बसून, देशासाठी काय करणार आहे, याची माहिती दिली. याबाबतचे अनेक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी युवकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सरकार येताच कोणत्याही परिस्थितीत अग्निवीर योजना (Agniveer Yojana) बंद करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. त्यामुळे राहुल यांनी थेट पंतप्रधान मोदींनाच त्यांच्या योजना रद्द करणार असल्याचा इशारा यावेळी दिल्याचं पाहायला मिळालं.
तसेच लष्करात पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ युवकांची जवान म्हणून भरती करणार. पूर्वीप्रमाणे पेन्शन योजना आणि इतर लाभ देणार, असंही राहुल गांधींनी सांगितलं. अग्निवीर ही योजना बकवास आहे, ती कचऱ्याच्या डब्यात फेकून देणार, गरिब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार, अंगणवाडी सेविकांच्या पगारात दुपटीने वाढ करणार यासह मनरेगा योजनेतील मजुरीत वाढ करणार, अशी अनेक आश्वासने राहुल यांनी यावेळी दिली.
अखिलेश यादव यांनी त्यांचे वडील मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांनी उत्तर प्रदेशासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. मुलायमसिंह यादव पैलवान आहेत. त्यांची नाळ या मातीबरोबर जोडलेली आहे. येथील लोकांवर त्यांनी भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे यावेळी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशमधून 79 जागा मिळतील, असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला.
(Edited By Jagdish Patil)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.