
राजकीय आयुष्यात सामान्य कार्यकर्ता ते परिवहनमंत्री असा प्रवास गाठताना फिटनेसकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. म्हणूनच वयाची साठी ओलांडली असली, तरी त्याच स्फूर्तीने काम करण्याची ऊर्जा सतत मिळत आहे.
खरेतर माझा जीवनप्रवास तसा खडतरच राहिला आहे. पण या सर्व व्यापातही अगदी महाविद्यालयीन जीवनापासून स्वतःला एक शिस्त लावून घेतली आहे. आयुष्यात मोठा पल्ला गाठण्याचे स्वप्न तारुण्यापासूनच होते. त्या काळी काहीतरी करण्याची धडपड करत असताना आपण तंदुरुस्त कसे राहू, याकडे कटाक्षाने लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यासाठी स्वत:ला शिस्त लावली. महाराष्ट्राचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आपल्या फिटनेसविषयी सांगत होते...
'चलती का नाम गाडी’ असे म्हटले जाते. आपल्याला ईश्वराने मानवरुपी जीवन दिले आहे. हा देह म्हणजे एकप्रकारे एक इंजिन आहे. हे इंजिन कुरकूर न करता चालू ठेवायचे असेल तर त्याला योग्य आहार आणि व्यायामाचे इंधन हे हवेच. माझ्या राजकीय आयुष्यात सामान्य कार्यकर्ता ते मंत्री असा प्रवास गाठताना फिटनेसकडे मी कधीही दुर्लक्ष केले नाही. म्हणूच वयाची साठी ओलांडली असली तरी त्याच स्फूर्तीने काम करण्याची उर्जा मला सतत मिळत आहे.
खरेतर माझा जीवन प्रवास तसा खडतरच राहिला आहे. पण या व्यापातही अगदी महाविद्यालयीन जीवनापासून मी स्वत:ला एक शिस्त लावून घेतली आहे. ही शिस्त गेल्या ३५ वर्षांपासून मी अंमलात आणत आहे. त्याचाच उपयोग आज राजकीय जीवनातही होत आहे. म्हणजे वेळी-अवेळी जेवण असले, दौरे असले किंवा कितीही कामाचा व्याप असला तरी शिस्त मोडता कामा नये याकडे लक्ष असते. रात्री किती उशिरा झोपलो तरी, सकाळी सात वाजता उठून एक तास व्यायाम करत असतो. ही सवय मी आजही कायम ठेवली असून यात एक दिवसही खंड पडून देत नाही.
परदेशात गेल्यानंतर ज्या ठिकाणी जिम करणे शक्य असेल तिथे जिममध्ये घाम गाळतो. जिथे जिम किंवा व्यायामाचे कोणतेच साधन, उपलब्धता नसेल तिथे निसर्गाच्या सानिध्यात एक तास भर चालणे असा व्यायाम करतो. भरपूर प्राणवायू आणि हिरवागार परिसर यामुळे मन प्रसन्न झाल्यासारखे वाटते. त्यामुळे दिवसभर न थकता काम करण्यास स्फूर्ती मिळत असते.
व्यायामासोबतच सकस आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. राजकीय जीवनात असल्यामुळे दुपारचे जेवण किती वाजता होईल याचे तारतम्य नसते. त्यामुळे सकाळची न्याहरी पोट भरून करतो. यामध्ये पौष्टिक तसेच सकस आहार कसा असेल यावर भर असतो. सोबत फळे, सुका मेवा असतो. ठाण्यात माझा हॉटेल व्यवसाय आहे. लोकांना चविष्ट खाऊ घालणे मला आवडते. पण मी मात्र घरचेच जेवण जेवतो. म्हणजे मी कुठेही असलो तरी, माझ्यासोबत पत्नी परिषा सरनाईक यांनी घरी बनवलेल्या जेवणाचा डबा कायम सोबत असतो.
आपल्या भारतीय परंपरेमध्ये सूर्यास्तानंतर भोजन करायचे नाही. वास्तविक यामागे विज्ञान आहे. सूर्यास्तानंतर पचनसंस्था मंदावते. मसालेदार पदार्थ शरीरात सुस्ती आणि आळस निर्माण करतात. त्यामुळे मीसुद्धा रात्री सातनंतर जेवण करत नाही. किंबहूना जेवणच टाळतो. त्याऐवजी संध्याकाळी सहा ते सात या वेळेत पोहे, उपमा असे हलके फुलके आहार घेतो. जास्त भूक अथवा थकवा जाणवत असेल तर, काकडी, गजर, बीट यांचे सलाद खातो. त्यामुळे सकाळी पुन्हा ताजेतवाणे उठता येते.
सामाजिक व राजकीय जीवनात धावपळ, ताणतणाव येत असतो. त्यातूनच माझी दोनदा ॲँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे आरोग्य सदृढ राहावे, यासाठी मी माझ्या व्यायामामध्ये व दैनंदिन जीवनात कधीच आळसपणा करत नाही. उलट ॲँजिओप्लास्टीनंतर स्वतःकडे अधिक लक्ष देणे सुरू केले आहे. ताण जाणवू नये यासाठी ध्यानधारणा, योगासने करतो. प्राणायाम करतो.
नगरसेवक ते परिवहन मंत्री हा पल्ला गाठताना आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक विकासकामे करण्याची संधी मिळाली. विकास म्हणजे चांगले रस्ते, पाणी, मोठमोठे प्रकल्प नाही. तर आरोग्याची काळजी घेणारे लोकाभिमुख कामे म्हणजे खरा विकास मी समजतो. म्हणूनच विकासाची उड्डाणे घेताना नागरिकांचे आयोग्य सुदृढ कसे राहील, याकडे लक्ष देतो. मग गायमुखच्या चौपाटीवर नागरिकांना चालण्यासाठी, जॉगिंग करण्यासाठी दिलेला स्वतंत्र पट्टा असो वा उद्यानांमध्ये सुरू असलेले ओपन जिम असो. त्याचा फायदा अधिकाधिक लोकांपर्यंत झाला पाहिजे असे आपले मानणे आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.