Maharashtra Politics: ''सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने आला तर वेल अँड गुड,नाहीतर…''; 'या' नेत्याचं मोठं विधान
Satara News : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. लवकरच या प्रकरणावर न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता आहे. याचदरम्यान,ठाकरे गट व शिंदे गटाकडून निकालाबाबत आत्मविश्वासपूर्वक दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र, आता शिंदे गटाचे नेते व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत खळबळजनक विधान केलं आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार( Abdul Sattar) हे साताऱ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दयांवर भाष्य केलं.राज्यातील सत्तासंघर्षावर मोठं विधान करताना सत्तार म्हणाले, राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल कसा येईल माहीत नाही. अंतिम सुनावणी झाली आहे. कोर्ट जी ऑर्डर देईल ती सर्वांना मान्य करावी लागेल. आमच्या बाजूने आला तर वेल अँड गुड. नाही आला तर तोही निकाल मान्य करावा लागेल असं अब्दुल सत्तार म्हणाले.
जरंडेश्वर कारखाना प्रकरणात ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं नाव वगळल्याने त्यांना क्लिनचीट दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागल्या आहेत. यावर खुद्द अजित पवारांनी देखील क्लिनचीटचे वृत्त फेटाळून लावले होते. यावर भाष्य करताना सत्तार म्हणाले, ईडी ही स्वायत्त संस्था आहे. ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहे असल्याचं सांगितलं.
आदित्य ठाकरे नव्या पुड्या सोडून...
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिंदेंबाबतच्या गौप्यस्फोटावर सत्तार यांनी जोरदार हल्लाबोल केला. सत्तार म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी असं बोलायला नको होतं. वरिष्ठ कोणी बोललं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण आदित्य खूप लहान आहेत. त्यांचं जेवढं वय आहे, तेवढी शिंदे यांची राजकीय कारकीर्द आहे. पण सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आता त्यांना शहाणपणा सूचत आहे. नव्या पुड्या सोडून संभ्रम निर्माण केला जात आहे अशी खरमरीत टीकाही सत्तार यांनी आदित्य ठाकरेंवर केली.
येत्या 10 दिवसांत मदतीबाबत अंतिम निर्णय..
सरकारने शेतकऱ्यांना याआधीही मदत केली आहे. आताही शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. म्हणूनच तंतोतंत माहिती घेणं सुरु आहे. सतत पावसाने नुकसान होत आहे. पावसाच्या रुपात ही चौथी आपत्ती आहे. नुकसान झालेला शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही. सध्या 83 टक्के पंचनामे झाले आहेत, उरलेले सुद्धा लवकरच होईल, असं सांगतानाच येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं सत्तार यांनी सांगितलं.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.