Lok Sabha Election Result : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकालानंतर थेट सरकारमधून मोकळे होण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अपेक्षावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांनी 'लाल फुली' मारली आहे. 'निवडणुकीत कमी पडल्याचे साऱ्यांना दुःख आहे. पुढच्या निवडणुकीत ताकदीने लढण्यासाठी फडणवीसांची गरज आहे. त्यासाठी त्यांनी सरकारमध्ये राहूनच मजबूत करण्याची आशा बावनकुळेंनी मांडली.
सरकारमधून मोकळे होण्याचा निर्णया मागे घेण्यावर फडणवीसांसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी साऱ्यांची असल्याचे सांगनू बावनकुळेंनी फडणवीस हे एकटे जबाबदार नाहीत, असे सूचित केले.
राज्यातील कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. येत्या १५ दिवसात कामाचा रोडमॅप तयार करणार आहोत. त्यामध्ये मतदान वाढविण्यासाठी भर देण्यात येईल. राज्यातील मूलभूत प्रश्न सोडविण्यावर येत्या काळात भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोअर कमिटीचे सर्व सदस्य मिळून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या बाहेर पडून काम करू नये, या मताचे आहोत. सरकारमध्ये राहून त्यांनी संघटनेचे काम करावे. येत्या काळात ऊर्जेने काम करण्यासाठी त्यांनी सरकारमधून बाहेर पडू नये.
केंद्राशी बोलून याबाबत ते निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आम्ही कोअर ग्रुप त्यांची समजूत काढेल. त्यामुळे फडणवीस व आम्ही येत्या काळात एकत्रित काम करणार, असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.