
Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला विक्रमी यश मिळाले. भाजपचे 132 आमदार निवडून आले. तर महायुतीचे एकत्रित 232 आमदार विजयी झाले. या यशाने भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या असून मोठे यश संपादन केल्याने महायुतीचे कॉन्फिडन्स चांगलेच वाढले आहे. त्यांनतर अवघ्या चार महिन्यातच विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार आहे. विधान परिषदेतील या पाच जागांसाठी जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. त्यामध्ये भाजपचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्यातच भाजपच्या वाट्याला आलेल्या तीन जागांबाबत मोठी अपडेट पुढे येत आहे.
विधानपरिषदेतील भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमशा पाडवी हे विधानसभेवर निवडून गेल्याने यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडील एकाच जागेसाठी जवळपास 100 जण इच्छुक असल्याचे समजते. तर शिंदेंच्या शिवसेनेकडील एका जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.
दुसरीकडे भाजपच्या (Bjp) वाट्याला येत असलेल्या तीन जागासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे प्रदेश भाजपकडून इच्छुकांची नावे दिल्ली दरबारी पाठविण्यात आली आहेत. जवळपास राज्यातील इच्छुक असलेल्यापैकी छाननी करून 20 जणांच्या नावाची यादी दिल्लीतील हायकमांडकडे पाठवली आहे. या 20 पैकी तीन जणांच्या नावाची घोषणा दिल्लीतूनच केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने या तीन जागेसाठी सर्वाधिक इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी अनेकांना जागा मित्र पक्षाला सुटल्याने निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी लागली तर काही जणांना बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांकडून विधानपरिषदेवर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या सर्व इच्छुकांची नाराजी ओढवून न घेण्यासाठी प्रदेश भाजपकडून ही शक्कल लढविण्यात आली असल्याचे समजते. आम्ही नावे दिल्लीला पाठवून दिली होती. त्याठिकाणी निर्णय झाला, असे सांगत हात झटकणे सोपे जाणार आहे.
प्रदेश भाजपकडून 20 जणांच्या नावाची यादी दोन दिवसापूर्वीच दिल्ली दरबारी पाठविण्यात आली आहे. त्यापैकी तीन नावाची घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. सोमवारी 17 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दोनच दिवसांत नावाची घोषणा दिल्लीतून केली जाणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुकांचे या घोषणेकडे लक्ष लागले आहे.
13 महिन्याच्या मुदतीमुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांना मिळणार संधी
भाजपच्या वाट्याला येत असलेल्या तीनही आमदारकीची मुदत 13 महिन्यांची आहे. कमी कालवधी मिळत असल्याने तीन पैकी दोन जागांवर भाजपमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी मिळू शकते तर एका जागेवर अनुभवी व अभ्यासू नेत्याला संधी दिली जाऊ शकते. अशा प्रकारे समतोल राखण्याचा प्रयत्न भाजप हायकमांडचा असणार आहे.
महायुतीकडे इच्छुकांचा ओढा
सध्या विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे 132 आमदार निवडून आले. तर महायुतीचे एकत्रित 232 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीचेच उमेदवार सहज विजयी होतील, असा अंदाज आहे. त्यामुळेच महायुतीकडील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे इच्छुकांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे आता येत्या काळात या जागेवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.