

शेतकऱ्यांसाठी वर्षाच्या सुरुवातीला दिलासादायक बातमी आहे. बळीराज्याला ज्या मदतीची प्रतीक्षा होती, ती आता लवकरच पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केवळ सरकारी योजना न राहता आज देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्वांचे लक्ष 22व्या हप्त्याकडे लागले आहे.
सरकारी नियमानुसार पीएम किसान योजनेचा लाभ वर्षातून तीन वेळा दिला जातो. एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीत प्रत्येकी 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. मागील हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये देण्यात आला होता. त्यामुळे पुढील म्हणजेच 22वा हप्ता डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत मिळणे अपेक्षित आहे. मागील वेळापत्रक आणि प्रशासकीय तयारी पाहता हा हप्ता मार्च 2026 किंवा एप्रिल 2026 च्या सुरुवातीला जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
यासोबतच शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येऊ शकते. देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावेळी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करू शकतात, अशी चर्चा आहे. सध्या पीएम किसान योजनेत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
मात्र वाढती महागाई, बियाणे, खते, औषधे आणि इतर शेती खर्च पाहता ही रक्कम अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे सन्मान निधीची रक्कम वाढवावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन मदतीची रक्कम वाढवू शकते, असे अंदाज बांधले जात आहेत. जर तसे झाले, तर शेतकरी कुटुंबांना खऱ्या अर्थाने दुहेरी आनंद मिळणार आहे.
दरम्यान, हप्ता अडकू नये यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक वेळा असे दिसून येते की हप्ता जाहीर होऊनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असणे. सरकारने स्पष्ट केले आहे की ई-केवायसी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांनाच पुढील हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
जर तुम्ही अजून ई-केवायसी पूर्ण केली नसेल, तर ती तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल अॅपद्वारे ही प्रक्रिया घरबसल्या करता येते. आधार कार्डशी मोबाईल नंबर जोडलेला असल्यास ओटीपीच्या माध्यमातून काही मिनिटांत ई-केवायसी पूर्ण होते. pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी पर्याय निवडावा, आधार क्रमांक टाकावा आणि आलेला ओटीपी भरावा. हे केल्यानंतर तुमचा पुढील हप्ता सुरक्षित राहील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.