
Goa News : संसदेच्या अधिवेशनानंतर गोवा राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी सुरु झालेली चर्चा नेतृत्व बदलाच्या चर्चेपर्यंत पोचल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी त्या चर्चेतील हवाच काढून टाकली. आमदार प्रवीण आर्लेकर यांना भाजप (BJP) पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलावलेच नाही, असे सांगून त्यांनी सर्वकाही आलबेल असल्यावर शिक्कामोर्तब केले.
काहीजणांनी कल्पनांचे पतंग राज्य सरकारच्या नेतृत्वबदलापर्यंत उडवला, याबाबत तानावडे यांनी मंगळवारी (ता.24) स्पष्ट शब्दांत राज्यात नेतृत्व बदलाचा कोणताही विषय कोणत्याही पातळीवर चर्चेत नाही, असे सांगितले आहे. त्यांच्या बोलण्याचा एकूण रोख कोणीतरी आपल्या राजकीय फायद्यासाठी माध्यमांत बातम्या पेरत आहे, असे भासवण्याकडे होता. ते म्हणाले, मंत्रिमंडळ फेरबदल होणार असे मी व मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी यापूर्वीच सांगितले आहे. याचा अर्थ मंत्रिमंडळ फेरबदल आताच होणार असे नाही.
भाजपचे वरिष्ठ नेते हे दिल्ली व बिहारमधील निवडणूक तयारीत आहेत. त्यांनी गोव्याविषयी कोणताही विषय चर्चेला घेतलेला नाही. मंत्रिमंडळ फेरबदल हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यांना या विषयावर पक्षश्रेष्ठी चर्चेसाठी बोलावतील, तेव्हा मुख्यमंत्री दिल्लीला जातील व चर्चा करतील.
प्रदेश पातळीवर सरकारचे प्रमुख या नात्याने ते माझ्याशी प्रदेशाध्यक्ष या नात्याने चर्चाही करतील. तशी चर्चा झालेली नाही. पक्षाची कोणत्याही मंत्र्याविषयी काही अनुकूल प्रतिकूल मते असू शकतात. ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवलीही आहेत. याचा अर्थ लगेच त्यावर अंमलबजावणी होणार असे नाही.
भाजप हा राष्ट्रीय पक्ष असल्याने निर्णय घेण्याच्या ठरावीक पद्धती आहे. राज्यात नेतृत्व करण्यासाठी आमदार नसलेल्या व्यक्तीला तीही विधानसभेचा निम्मा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आणण्याची पद्धत नाही. बहुतेकवेळा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करून आम्ही निवडणूक लढवतो. विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची पद्धत आहे.
नेतृत्व बदलाचा विषय हा विधानसभा निवडणुकीनंतर लगेच विचारात घेतला जातो. सध्या राज्यात नेतृत्व बदलाची पक्षाला गरज नाही. तशी परिस्थितीही उद्भवलेली नाही. सरकारच्या नेतृत्व बदलाच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. सरकार किंवा मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला पाहिजे. याविषयीच्या साऱ्या अफवा निराधार आहेत.
आमदार प्रवीण आर्लेकर यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीला बोलावल्याच्या चर्चाही तानावडे यांनी फेटाळून लावल्या. ते म्हणाले, आर्लेकर यांना दिल्लीला बोलावण्याचा प्रश्नच येत नाही. सरकार ठाम असून, नेतृत्व बदलाची कोणतीही गरज नाही. तानावडे यांच्या या स्पष्टीकरणामुळे सरकार, नेतृत्व आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेतील हवा निघून गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सरकार स्थिर असून जनतेच्या हितासाठी काम करत असल्याचा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.