
सुमारे अडीच हजार पेक्षा अधिक शासकीय कर्मचारी महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजना आणल्या की काय होतं हेच यातून सिद्ध होतं. पण आतातरी सरकारने संबंधित योजनेतील गैरप्रकारांना आळा घालावा आणि निवडणुकीत ₹१५००चे ₹२१०० करण्याचं दिलेलं आपलं आश्वासन पूर्ण करावं, ही विनंती! असं आमदार रोहित पवारांनी म्हटलं आहे.
फडणीस सरकार हे आदिवासी विरोधी सरकार आहे. आदिवासी आमदार निधीसाठी पत्र घेऊन जातात परंतु आदिवासी आमदारांना हे सरकार पैसे देत नाही आहे. फडणवीस सरकारने रस्त्यांसाठी एकही रुपया निधी दिला नाही जर दिला असेल तर मी राजकारण सोडेल, असं के. सी. पाडवी यांनी म्हटलं आहे.
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती माध्यमांना दिली. या पावसात 38 घरांची पडझड, तर 1 हजार 826 घरांची अंशतः पडझड झाली आहे. 6 हजार 207 शेतकऱ्यांचे 1 हजार 900 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालं आहे, हे कदाचित वाढू देखील शकते, असं देसाई यांनी सांगितलं आहे. यात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 18 लहान जनावरे आणि 25 मोठी जनावरे, असे एकूण 8 ते 10 कोटी रुपयांचे प्रथम दर्शनी नुकसान दिसून येत असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे दीड दिवसात विशिष्ट हवेवर स्वार होऊन पुढे आलेले नेते आहेत. त्यांना प्रसिद्धीची इंगळी डसल्याने ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या नेतृत्वावर आरोप करत आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी टीका केली.
नवी मुंबईच्या पेठाली (ता. पनवेल ) गावातील सोनम अभिषेक केणी (वय 30) हिने आपल्या पाच वर्षांच्या मुलगी देवांशीसह आत्महत्या केली. सोनमने गळफास लावून जीवन संपवले, तर मुलीचा मृतदेह घरातच आढळला. ही आत्महत्या नसून सासरच्यांनी छळ करून खून केल्याचा आरोप सोनमच्या माहेरच्यांनी केला. घटनेला महिना उलटूनही मुख्य आरोपी अभिषेक आणि त्याची आई प्रभावती पसार असल्याने सोनमच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
भक्ती गुजराती आत्महत्या केस प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या असून, तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे, पोलिस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची भेट घेतली. भक्ती गुजराती या महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणात सासू-सासरे आणि पती तिघांना अटक करण्यात आली आहे. भक्ती गुजराती यांच्या कुटुंबियांकडून आत्महत्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
अमीर खान व शाहरुख खान यांना बघायला मोठी गर्दी होते. मात्र याच अमीर खान, शाहरूख खान यांचं देशप्रेम पहलगाम हल्ल्याच्या वेळी दिसलं, अशी उपरोधिक टीका भाजप मंत्री नीतेश राणे यांनी केली. मंत्री नीतेश राणे यांनी अहिल्यादेवींनी घडवलेला ज्वलंत इतिहास सांगताना अमीर खान, शाहरुख खानसारख्या लोकांसोबत सेल्फी काढण्यापेक्षा ढोपर टेकून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेसोबत सेल्फी घ्या, असा सल्ला मंत्री राणे यांनी दिला.
आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही आमची भूमिका आहे. या प्रकरणात ज्यांनी-ज्यांनी आरोपीला मदत केली त्यांच्यावर कारवाई झाली आहे. आपल्या सर्वांचा फोकस वैष्णवीला न्याय देणे आणि माहेरच्या लोकांसोबत उभे राहणे, मला खात्री आहे की, आरोपींना कठोरात शिक्षा होईल. पोलीस अत्यंत व्यवस्थितरित्या या गोष्टी तपास करत आहे. जा रोज गोष्टी घडतात, त्या आपल्यासमोर येत आहेत, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात नीलेश चव्हाण याला नेपाळ बाॅर्डर येथून अटक केली आहे. तो 21 मे रोजी पासून पसार होता. तेव्हापासून कर्जत, मुंबई, दिल्ली, गोरखपूर, सोनवली (उत्तर प्रदेश), बहिरवा (नेपाळ), काठमांडू, पुन्हा बहिरवा (नेपाळ), परत सोनवली, असा त्याने प्रवास केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली.
एकनाथ खडसे यांना ऑफर आली असती आणि त्यांनी ती स्वीकारली नसती असं कधी होणार नाही. ऑफर कोणाकडून कोणाला आली होती, याचा सोक्षमोक्ष लावण्याची गरज नाही. खडसेंचा सत्तेकडे जाण्याचा ओघ कायम असतो, त्यामुळे खडसेंनी अजितदादांकडे ऑफर दिली असेल, असा माझा अंदाज आहे. सत्तेमध्ये परत येण्याची एकनाथ खडसेंची इच्छा आहे. ते आले तर त्यांचे आम्ही स्वागत करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले.
आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कोणीही नाराज नाही. सर्वजण खूष आहेत. आमच्या पक्षात कुठेही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा नाही. अजितदादांच्या पक्षात असेल तर मला माहिती नाही. आमच्या पक्षात सर्व खूष आहेत. प्रसारमाध्यमांतील बातम्याबाबत शरद पवार हे बघतील. त्याबाबत स्वतः शरद पवार हे निर्णय घेतील.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचे नवीद मुश्रीफ यांची नियुक्ती झाल्याबद्दल ‘गोकुळ’मधील विरोधी गटाच्या संचालिका तथा भाजपच्या नेत्या शौमिका महाडिक आणि भाजपचे आमदार अमल महाडिक यांनीही नवीद मुश्रीफ यांचे अभिनंदन केले आहे. गोकुळमधील सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणाऱ्या शौमिका महाडिक यांनीही नवीद मुश्रीफ यांच्या अभिनंदनची पोस्ट ठेवल्याने कोल्हापूरमध्ये त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील महत्वाचा आरोपी नीलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्या मागावर सहा पोलिस पथकं होती. वैष्णवीचे बाळ त्याच्याकडे होते. वैष्णवीच्या आई वडिलांना धमकावल्याचा आरोप नीलेश चव्हाण याच्यावर आहे. त्याला आता नेपाळमधून पुण्यात आणण्यात येणार आहे.
मी सध्या महायुती, एनडीएसोबत नाही. विधानसभा निवडणुकीपासूनच मी एनडीएला सोडले आहे. एनडीएला सोडले म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला सोडले आहे. आम्ही आता एनडीएसोबत नसल्याने आघाडीबाबत कोणताही प्रॉब्लेम नाही. मी आता नवीन घरोबा करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचा पुढून किती प्रतिसाद येतोय, त्यावर पुढील गोष्टी ठरवल्या जातील, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी जनसुनावणी घेतली. कुटुंब व्यवस्था हा समाजाचा पाया आहे. कुटुंबासंदर्भात कोणतीही तक्रार आली, तर लगेच टोकाची भूमिका घेता येत नाही. न्यायप्रकिया कुटुंब एकत्र करण्यावर भर देते. जोडणं हे काम आहे, तोडणं नाही” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्यांच्या स्वत:च्या राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाल्या की, “पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो, राजीनामा मागणं ही विरोधकांची भूमिकाच असते”
ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी युद्धनौका INS विक्रांतला भेट दिली. राजनाथ सिंह यांनी यावेळी नौदलातील जवानांशी संवाद साधला.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.नाशिकच्या सिन्नरमध्ये पीक नुकसान पाहणीवेळी कोकाटे यांनी हे वक्तव्य केले आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? असे कोकाटे म्हणाले. ढेकळांचे पंचनामे करणार का? असा संतप्त सवाल कोकाटे यांनी केला.
महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची गोकुळच्या अध्यक्ष पदासाठी जवळपास अडीच तास खलबत्त झाली. आज संचालक मंडळाच्या मीटिंग समोर धक्कादायक नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीचाच अध्यक्ष करण्यासाठी अजित नरके, नाविद मुश्रीफ, अमरीशसिंह घाटगे आणि अमर पाटील यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एलओसीवरून बेपत्ता झालेल्या सुनीता जमगडे या नागपूरमधील महिलेचा अखेर शोध लागला आहे. या महिलेला पाकीस्तान प्रशासनाने भारतीय बीएसएफकडे सोपवलं आहे. त्यानंतर नागपूर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. त्यानंतर सुनीताला नागपूरला आणलं गेलं. पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा औपचारिकरित्या अटक केल्यानंतर तिला रात्री विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं असून तिला 2 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचं आणखी एक कारणामा उघडकीस आला आहे. तो म्हणजे या दोघांनी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी चक्क पोलिसांना खोटी माहिती दिल्याची बाब समोर आली आहे. या दोघांच्या पिस्तूल परवाण्याची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोणालाही करा, मात्र गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच झाला पाहिजे' असा आदेशच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे आता गोकुळच्या अध्यक्ष निवडीला नवं वळण मिळालं आहे. मुंबईतील बैठक झाल्यानंतर काल कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांच्यात बैठक झाली. त्यानंतर आज दुपारी गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे.
बनावट ओळखपत्राद्वारे पोलिस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक होण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी गृह विभागाकडून मुंबई पोलिसांना डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चार कोटींच्या निधीस गृह खात्याने मंजुरी दिली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे मागील आठ दिवसांपासून नाशिक येथील इगतपुरीच्या विपश्यनाकेंद्रामध्ये दाखल झालेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनाम्यानंतर त्यांच्या आमदारकीचा देखील राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. शिवाय त्यांच्यावर पत्नी करूणा शर्मा यांनी देखील गंभीर आरोप केले होते. त्यामुळे सतत चर्चेत होते. त्यानंतर आता अखेर मन:शांतीसाठी मुंडे आता थेट विपश्यना करण्यासाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात दाखल झाल्याची माहिती आहे.
ग्रामपंचायत ते विधानसभा शत प्रतिशत भाजप हे उद्दिष्ट समोर ठेवून त्यानुसार सशक्त भारत निर्माण करायचा आहे. भाजप हीच काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रत्येकाने पावले उचलायला हवीत, असं आवाहन भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कराड येथील महिला मेळाव्यात बोलताना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.