AIMIM News : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काल छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील थोर महापुरुषांच्या अवमानावरून दणाणून गेले. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील खडाजंगी आणि त्यानंतर 'औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता' असे विधान करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईने याचा शेवट झाला.
दोन दिवस सभागृहात या विषयावरून प्रचंड गदारोळ, आरोप- प्रत्यारोप सुरू होते. अखेर काल आझमी यांच्यावर संपूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी अबू आझमी यांच्या 'औरंगजेब' विषयी केलेल्या वक्तव्याबद्दल तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र निलंबनाच्या कारवाईनंतर ही चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचे म्हणत आपल्याला मान्य नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी मात्र इम्तियाज जलील यांनी अबू आझमी (Abu Azmi) यांच्या 'औरंगजेब उत्तम प्रशासक होता' या विधानाचा समाचार घेताना विरोधक सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात असताना औरंगजेब चा मुद्दा उकरून काढत आझमी यांनी आपले मित्र देवेंद्र फडणवीस यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्रात भाजपला सत्तेवर आणण्याची सुपारी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी घेतली होती.
आता त्यांनी औरंगजेब चा मुद्दा उकरून काढत आपल्या या मित्रपक्ष भाजप आणि त्यांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक प्रकारे मदतच केली आहे. हे विधान करण्यामागे आझमी यांचा एवढाच हेतू होता हे स्पष्ट होते. भाजपाच्या सांगण्यावरूनच हा वादाचा मुद्दा त्यांनी उकरून काढला. खोडसाळ पद्धतीने हा मुद्दा उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना मदत करण्यापेक्षा आझमी यांनी विरोधकाची भूमिका बजावत सरकारवर तुटून पडायला हवे होते.
रमजानसारख्या पवित्र महिन्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे विधान करून अबू आझमी यांनी आपण कोणाच्या बाजूने आहोत? हे दाखवून दिले आहे, असा आरोप करत इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला होता. औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अफजलखान आणि छावा चित्रपटाचा उल्लेख करत विधानसभेत काल सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी प्रचंड गोंधळ घातला गेला.
या संपूर्ण विषयाला कारणीभूत ठरणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाच्या मागणीनंतर सरकारकडून या अधिवेशन काळापुरते त्यांना निलंबित करण्यात आले. या कारवाईवर इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्यात आणि अबू आझमीमध्ये कितीही मतभेद असले तरी, महाराष्ट्र विधानसभेतून त्यांची निलंबनाची कारवाई मला मान्य नाही. ही पूर्णपणे अलोकतांत्रिक आणि सरकारने केलेली बेकायदेशीर कारवाई आहे. या निर्णयात विरोधी पक्षही सहभागी होता. आता मला समजले आहे की असीम, ज्याला तुम्ही खुर्चीवर बसवले होते त्यानेच तुम्हाला हाकलून लावले, अशा शब्दात सुनावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.