अलिबाग : उसर येथे 52 एकर जागेत जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारत आहे. यासाठी राज्य शासनाने 406 कोटी निधीही मंजूर करण्यात आला आहे. आज उसर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांना टोला लगावाला.
या कार्यक्रमाला उपमुख्य मंत्री अजित पवार हे ऑनलाईन तर, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सुनील तटकरे, अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे याच्या कामाचे कौतुक केले. हाच धागा पकडत बाळासाहेब थोरात यांनीही त्यांच्या कामाचे आणि पाठपुराव्या विषयी मत व्यक्त केले. आपण काम करताना आमची फौज आहे तुमच्यासोबत त्यांनापण बरोबर घ्या, अशी कोपरखळी थोरात यांनी मारली. यावेळी कार्यक्रमात एकच हशा पिकला. वेळेला आमच्या कार्यकर्त्यांचीही काळजी घ्या, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित कामाला लागलेत तर काही अवघड नाही. तुमची धडपड आहे त्याला शासनाची साथ आहे. त्यामुळे एकत्रित कामे करून 2024 च्या आता आम्हाला पुन्हा उद्घाटनाला बोलवा, असेही थोरात म्हणाले.
रायगड जिल्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत. आज झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकेर आणि शरद पवार उपस्थित असताना सुद्धा सेनेच्या तीनही आमदारांनी कार्यक्रमावर बहिष्कार घतला. त्यामुळेच बाळासाहेब थोरात यांनी आमच्याही कार्यकर्त्यांना सोबत घ्या, असा टोला तटकरे यांना लगावला असल्याची चर्चा रंगली.
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, महाडचे आमदार भरत गोगावले, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन विद्यमान आमदार आहेत. काही दिवसापांसून शिवसेनेने पालकमंत्री हटाव भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष सुरू आहे. आजच्या भूमिपूजन कार्यक्रम पत्रिकेत जिल्ह्यातील सर्वच आमदार यांची नावे टाकली असून आमंत्रणही देण्यात आली होती. मात्र, महेंद्र दळवी, भरत गोगावले, महेंद्र थोरवे या तिघांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. कोकणासाठी हे महाविद्यालय महत्वाचे ठरणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. पाचशे खाटांचे हे रुग्णालय असणार आहे. कोकणातील विद्यार्थी मुंबईत जाऊन स्थिरावतात. या वैद्यकीय रुग्णालयामुळे मुंबईत स्थिरावण्याचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.