

भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
“आता ठरवलंय घरी बसायचं” असे भावनिक वक्तव्य करत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Sindhudurg News : तळकोकणासह राज्याच्या राजकारणाला हादरे देणारी बातमी समोर आली असून भाजपचे जेष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांनी, आता आपण ठरवलं असून घरीच बसायचं. आपली दोन्ही मुलंही स्थिरावली आहेत. यामुळे त्यांना सांगेन की नांदा सौख्य भरे,असे म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर आताराजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही मुलांच्या कुठे यश तर कुठे अपयश पदरी पडले आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत झालेल्या विसंवादाचा फटका या निवडणुकीत बसल्याचे दिसत आहे.
दरम्यान या निवडणुकीच्या प्रचारातून नारायण राणे अलिप्त होते. त्यांच्या दूर राहण्यावरून देखील प्रश्न उपस्थित केले गेले होते. तर त्यांचे राजकारण संपवलं जातयं असा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला होता. त्याचा रोख भाज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे होता.
पण आज (ता.४) रवींद्र चव्हाण यांच्यासह राणेंच्या विरोधकांना थेट इशारा देण्यासाठी राणे समर्थकांनी जोरदार रॅलीचे आयोजन केले होते. तसेच त्यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रमही ठेवला होता. यानंतर झालेल्या जाहीर सभेतच नारायण राणेंनी आपल्या विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत राणेंना संपवणं सोप्प नाही असा इशारा दिला. याचवेळी त्यांनी राजकारणातील अनुभव सांगताना, राजकारणात कट-कारस्थानं सुरू आहेत. यामुळेच आता घरी बसायचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दोन्ही मुलं चांगलं काम करत असून चांगल्याला जोपासण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
यावेळी नारायण राणे यांनी, कधी तरी थांबायला हवं, असं कुठं आहे की सतत काम करतं राहावं. शेवटी शरीर आहे. माणसाला वाटतं आता थांबावं. आता आपलं वय वाढत चाललं असून शरीरही थकत आहे. आपली दोन्ही मुलं निलेश आणि नितेश राणेही राजकारणात स्थिरावली आहेत. तेच आता यापुढे विकासात्मक राजकारणाची धुरा सांभाळतील. त्यामुळे कोणीतरी व्यवसायही पाहायला हवा. तर आपल्यानंतर कोकणाच्या विकासाचं राजकारण निलेश आणि नितेश करतील. त्यांनी फक्त हाक दिल्यावर कार्यकर्त्यांनो तुम्ही ‘ओ’ द्या, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी महायुतीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना, एकत्र रहा, पैशासाठी राजकारण करू नका, असे पैसे पचत नाहीत. मला बोलायला कोणाचीही भीती नाही, असे म्हणत द्वेषाच्या राजकारणाला थारा देऊ नकोसा सल्लाही त्यांनी महायुतीतील कार्यकर्त्यांना दिला आहे.
तसेच नारायण राणे यांनी पुढे बोलताना, पक्ष सांभाळा, स्वार्थ करू नका. या जिल्ह्यात माझ्याआधी आणि माझ्यानंतर माझ्यासारखं काम कुणी केलं असेल तर दाखवा असेही विरोधकांना आव्हाण केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यांमुळेच ते आता राजकारणातून बाजूला होतील. निवृत्ती घेतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात असून त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना उधान आले आहे.
Q1. नारायण राणे यांनी काय संकेत दिले आहेत?
➡️ त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
Q2. राणेंनी हे वक्तव्य कुठे केलं?
➡️ कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक भाषणात त्यांनी हे विधान केलं.
Q3. त्यांनी नेमकं काय म्हटलं?
➡️ “आता ठरवलंय घरी बसायचं… नांदा सौख्य भरे,” असं त्यांनी सांगितलं.
Q4. राणेंच्या निवृत्तीनंतर कोण पुढे येणार?
➡️ त्यांच्या दोन्ही मुलांकडे राजकीय जबाबदारी सोपवण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
Q5. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
➡️ भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्व रचनेवर याचा परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.