

Navi Mumbai job fraud : परदेशात आकर्षक पगाराची नोकरी आणि दोन वर्षांचे वर्क परमिट मिळवून देण्याचे आमिष दाखवून सहा बेरोजगार तरुणांची तब्बल 10 लाख 6 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील उलवे परिसरात समोर आला आहे. आरोपींनी या तरुणांना टुरिस्ट व्हिसावर कझाकिस्तानमार्गे उझबेकिस्तानला पाठवून कंपनीत नोकरी देण्याऐवजी बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी उलवे पोलिसांनी संजीतकुमार सिंह, विजय सिंह, लालचंद राजू आणि एजंट रामसजन यादव ऊर्फ बबलू यादव यांच्यासह संबंधितांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडे (Police) दाखल तक्रारीनुसार, आरोपींनी सुमारे वर्षभरापूर्वी उलवे येथील खारकोपर रेल्वे स्थानकाजवळील एका सोसायटीत एस. एम. प्लेसमेंट एलएलपी आणि महाकाल मरीन रिक्वायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कार्यालय सुरू केले होते. या कार्यालयामार्फत परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याच्या जाहिराती करण्यात आल्या. या जाहिरातींना तसेच एजंटच्या माध्यमातून उत्तर प्रदेशासह इतर भागातील अनेक बेरोजगार तरुणांनी प्रतिसाद दिला.
आरोपींनी तरुणांना दरमहा 550 डॉलर पगार आणि दोन वर्षांचे वर्क परमिट देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. या आमिषापोटी प्रत्येक तरुणाकडून सुमारे 1 लाख 20 हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर 16 डिसेंबर 2025 रोजी सहा तरुणांना कझाकिस्तानमार्गे उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे पाठवण्यात आले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्यांना आश्वासन दिलेल्या कंपनीत नोकरी (JOB) देता एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी नेण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ताश्कंदमध्ये या तरुणांकडून सुमारे दोन महिने मजुरीचे काम करून घेण्यात आले. या काळात त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मिळालेली 6,600 डॉलरची रक्कम विजय सिंहने परस्पर घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. परदेशात अडकलेल्या तरुणांनी भारतात परत जाण्याची विनंती केली. मात्र, त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर परतीच्या विमानाचे तिकीट काढण्यासाठी त्यांना आणखी सलग 15 दिवस मजुरीचे काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
या परिस्थितीत पाच तरुण कसेबसे भारतात परतले. मात्र, स्वपन सरकार हा तरुण अद्याप उझबेकिस्तानमध्ये अडकून पडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्याचा व्हिसा संपल्याने त्याच्यावर खाण्या-पिण्याचीही बिकट परिस्थिती ओढवल्याचा दावा करण्यात आला आहे.
भारतामध्ये परतल्यानंतर पीडित तरुणांनी उलवे येथील आरोपींच्या कार्यालयात जाऊन पैसे आणि नोकरीबाबत जाब विचारला. त्यावेळी आरोपींनी शिवीगाळ करून त्यांना कार्यालयातून हाकलून दिल्याचा आरोप आहे. अखेर पीडित तरुणांनी उलवे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.