

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत भाजपने सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथे विजय मिळवला.
मात्र कणकवलीत निसटता पराभव झाल्याने पालकमंत्री नितेश राणेंना राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
या निकालाचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो, अशी चर्चा सिंधुदुर्गात सुरू आहे.
Sindhudurg News : शिवप्रसाद देसाई
नुकताच झालेल्या नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपला सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथे विजय मिळाला. मात्र कणकवली येथील होम पीचवर निसटता पराभव पत्कारावा लागला. यामुळे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री, तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना धक्का लागल्याचे बोलले जात आहे. तर भावानेच भावाला पाणी पाजल्याचे बोलले जात आहे. तर हा धक्का आगामी विधानसभा निवडणुकीवर देखील परिणाम करणारा ठरेल अशीही आता येथे चर्चा रंगली आहे.
कोकोणाताली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असतानाच निकालात कणकवलीत धक्कादायक निकाल आला. येथे निवडणुकीच्या रणधुणाळीत झालेले आरोप-प्रत्यारोप, स्टिंग ऑपरेशन, पैशांचा पाऊस या गोष्टींनी अख्ख्या राज्याचे लक्ष कणकवलीतील भाजप विरुद्ध सर्वपक्षीय लढतीसह दोन्ही भावांतील राजकीय संघर्षाकडे लागले होते. जसे जसे दिवस पुढे ढकलतं गेले तसी उत्सुकता वाढत गेली. आणि निकालात शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकरांसह शहर विकास आघाडीने भाजपचा धुव्वा उडवला. येथे संदेश पारकर नगराध्यक्ष झाले.
यानंतर विकासाभीमूख भूमिका घेणारे नितेश राणे यांना कणकवली येथील होम पीचवर निसटता पराभव झाल्यामुळे नाराज झाल्याचे दिसत आहे. या निकालानंतर जनतेने दिलेला कौल आपण स्वीकारत आहोत, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली होती. मात्र एक पोस्ट करत अप्रत्यक्षरीत्या त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. तसेच आता बोलावं लागेल असेही त्यांनी म्हटलं आहे. यामुळे ते आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याचा संबंध आगामी विधानसभा निवडणुकीशी लावला जात असून त्यावर परिणाम काय होणार अशीच येथे चर्चा सुरू झाली आहे.
कणकवलीत पालकमंत्री राणे यांच्या विरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र येत शहरविकास आघाडी स्थापन केली होती. विशेष म्हणजे, दोन्ही शिवसेना येथे भाजपच्या विरोधात एकवटल्या होत्या. आमदार नीलेश राणे हेही शहरविकास आघाडीच्या बाजूने प्रचारात होते. येथे भाजपने 9 जागांसह सत्ता मिळविली. शहर विकासला 8 नगरसेवकपदे मिळाली. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत शहर विकासचे संदेश पारकर हे 145 मतांनी विजयी झाले. पालकमंत्री राणे यांच्यासाठी त्यांच्याच बालेकिल्ल्यात बसलेला हा धक्का म्हणावा लागेल.
अर्थात पालकमंत्री राणे यांचा कणकवली हा दीर्घकाळ बालेकिल्ला राहिला आहे. असे असले तरी कणकवली शहराचे राजकारण कायमच थोडेफार बदल समोर आणणारे असते. शहरात पारकर यांचाही प्रभाव आहे. अगदी नगरपंचायतीच्या स्थापने आधीपासून ते शहराचे नेतृत्व करत आले आहेत. गेल्या लोकसभेत शहरातून भाजपच्या नारायण राणे यांना मोठे मताधिक्क्य मिळाले होते; मात्र विधानसभेत पारकर विरुध्द नितेश राणे या सामन्यात भाजपचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले. यावरून पारकरांचा प्रभाव लक्षात येत होता.
भाजप विरोधकांनी याचाच फायदा घेत रणनीती आखली. यात माजी आमदार राजन तेली यांची भूमिका महत्त्वाची होती. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची किमया शहर विकास आघाडीच्या माध्यमातून साकारली गेली. या शहरावर नारायण राणे यांचा मोठा प्रभाव आहे. शहर विकास आघाडीच्या प्रचारात आमदार नीलेश राणे हेही उतरले.
या आघाडीचे नेतृत्त्व त्यांच्याकडे असल्याचे चित्र समोर आणले गेले. त्याचाही प्रभाव निवडणूक निकालावर बर्यापैकी दिसला. अर्थात पालकमंत्री राणे यांनीही कणकवली राखण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी केली होती. ते स्वतः प्रचारात उतरले होते. त्यामुळे नगरसेवक पदांचे संख्याबळ राखण्यात त्यांना यश आले. नगराध्यक्ष पद मात्र त्यांच्या हातून निसटले.
सन 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीपासून मंत्री नितेश राणे प्रत्येक निवडणूक जिंकत आले आहेत. सन 2017 सालची कणकवली नगरपंचायत निवडणूक त्यांनी संयमाने लढवून आपले पॅनेल विजयी केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आणि पहिल्या टप्प्यातच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
गेले वर्षभरात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसायमंत्री म्हणून प्रभावीपणे काम केले. पण आताच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने शतप्रतिशत भाजपच असे उद्दिष्ठ ठेवून स्वबळावर जिल्ह्यात निवडणूक लढवली. ज्यात सावंतवाडी, वेंगुर्ले या दोन नगरपालिकांमध्ये भाजपला मोठे यश मिळवले. पण नितेश राणेंना होमपिचवरच मोठा पराभव पत्कारावा लागला आहे. यामुळे आता त्यांना आतापासूनच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आखणी करावी लागणार आहे.
1. भाजपला सिंधुदुर्गात कुठे विजय मिळाला?
सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथे भाजपने विजय मिळवला.
2. भाजपचा पराभव कुठे झाला?
कणकवली नगरपंचायतीत भाजपला निसटता पराभव पत्करावा लागला.
3. हा पराभव कोणासाठी धक्का मानला जात आहे?
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
4. ‘भावानेच भावाला पाणी पाजले’ अशी चर्चा का आहे?
कणकवलीतील राजकीय संघर्षामुळे राणे बंधूंमधील स्पर्धेची चर्चा रंगली आहे.
5. या निकालाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल का?
होय, कणकवलीतील निकाल विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.