

Raigad News : कोकणातील रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना पक्षातील वाद काही केल्या थांबताना दिसत नाहीत. नुकताच येथे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपूत्र अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर आता येथे पालकमंत्रीपदावरून पुन्हा एकदा रस्सी खेच सुरू झाली असून मंत्री भरत गोगावले यांनाच पालकमंत्री करावे यासाठी शिंदेंचे आमदार आणि मंत्री थेट बोलताना दिसत आहे. मध्यंतरी यावरून मंत्री भरत गोगावलेंसह उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं असून आमदार महेंद्र दळवींनी तर आपला तटकरेंवर भरोसाच नसल्याचे म्हटले होते.
यादरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी मात्र मौन बाळगले होते. यावरून अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर या मागे त्यांची तटकरेंशी झालेली गट्टी असल्याचे कारण सांगितले होते. पण आता त्यांनी यावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून वात पेटल्याचे दिसत आहे.
कोकण विधानपरिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्यानंतर कोकणाच्या राजकारणात पुन्हा एकदा पालकमंत्रिपदाच्या वादाने डोकं वर काढलं आहे. दररोज या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात खटके उडताना दिसत आहे. मंत्री भरत गोगावले यांनी आपणच पालकमंत्री होणार असा दावा करत आहेत. तर तटकरे याचा संपूर्ण निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि ते बसून घेतील असे म्हणत हा दावा फेटाळला होता.
ज्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील पालकमंत्रिपदाच्या वादात उडी घेत तटकरेंना सुनावलं होतं. ज्यानंतर तटकरेंनी पत्रकार परिषदेतच सामंत यांना फटकारत पुन्हा एकदा याचा निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि ते बसून लवकरच घेऊ असे सांगत हा विषय संपल्याचे सांगितले होते. यानंतर हा वादाचा प्रश्न मागे पडला होता. पण आमदार महेंद्र दळवींनी मात्र या मुद्दा कसा ताजा राहील याकडे लक्ष देत तटकरेंवर तोफ डागणे सुरूच ठेवले होते.
दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून याबाबत कोणताच मुद्दा किंवा भाष्य केलं जात नव्हतं. तर त्यांनी तटकरेंशी केलेल्या दिलजमाईवरून देखील त्यांना लक्ष केलं जात होतं. ज्या माणसाने तटकरेंवर खालच्या पातळीवर जावून टीका केली. तो फक्त एका अब्रुनुकसानीच्या दाव्यामुळे शांत झाला. तटकरेंना जाऊन मिळला अशी टीका त्यांच्यावर होताना दिसली. तसेच आमदार दळवींनी देखील आपल्या मुलीला माघार फक्त पालकमंत्रिपदाच्या सेटमेंटसाठी घ्यायला लावली अशी टीका केली. पण त्यांनी काहीही झालं तरी पालकमंत्रिपदावर शिवसेनेचाच दावा सांगितला.
यानंनंतर आता आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. विधान परिषद निवडणुकीत वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय अंतिम मानून आम्ही पाठिंबा दिला. त्यावरून माझ्यावर टीका झाली असली तरी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे हे शिवसैनिक म्हणून आमचे कर्तव्य असल्याचे थोरवे यांनी स्पष्ट केले.
तसेच भरतशेठ यांच्या पालकमंत्रीपदाबाबत शिंदे साहेबांनीच दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर भरतशेठ यांना पालक मंत्री घोषित करतील यात आम्हाला शंका नाही, असेही थोरवे भाष्य केलं आहे. यामुळे १५ ऑगस्टच्या आधी मंत्री भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा रायगडचे पालकमंत्री म्हणून होणार असल्याची जिल्ह्यात सध्या चर्चा सुरू झाली आहे. आता ही फक्त चर्चा आहे की खरेच पालकमंत्रीपदाबाबत शिंदेंनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. हे आता भरतशेठ यांच्या नावाची घोषणा पालकमंत्रीपदाबाबत झाल्यानंतरच समोर येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.