
सरकारच्याविरोधात बोलणाऱ्याला ईडीच्या नोटीस येतात. आमच्यासारखे राजकारणी बोलले तरी ईडीची घरी नोटीस येते. आता पुढच्या इलेक्शनच्या आधी मला आधीच ईडीच्या नोटीस येऊन गेल्या आहेत. म्हणजे माझ्या घरात फक्त लहान मुलं सुटली आहेत. बाकी मला माझ्या वडिलांना, बहिणीला माझ्या अख्खा खानदानाला ईडीच्या नोटिसा आल्या आहेत, असं सांगत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीच्या Sharad Pawar गटाच्या चिपळूण येथे आयोजित जिल्हा महिला मेळाव्यात रोहिणी खडसे बोलत होत्या.
सत्ताधारी पक्षातल्या एकातरी व्यक्तीला नोटीस आली आहे का? असं मला एक तरी उदाहरण सांगा, असे थेट आव्हान त्यांनी दिले. ते सगळे धुतल्या तांदळासारखे. भाजपकडे अशी वॉशिंग मशीन आहे, अशीही टीका रोहिणी खडसे यांनी केली. इकडून तिकडे गेले की झाले स्वच्छ. आपल्याकडे कोणी आलं की ईडीची नोटीस येईल, असे त्या म्हणाल्या.
व्यासपीठावर असलेल्या चिपळूण येथील माजी आमदार रमेशभाई कदम यांना उद्देशून त्या बोलल्या. रमेशभाई तुम्ही तिकीट मागितलं. तुम्हालाही उभं राहायचं असेल ना तर, ईडीच्या चौकशीची तयारी करून ठेवा. तुम्ही काही केलं असेल अथवा नसेल. पण ईडीची नोटीस येणार, अशी उपहासात्मक टीका रोहिणी खडसे यांनी भाजपवर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि दोन दिवसात आपले सगळे तिकडे गेले. छोडूंगा नही, 75 हजार रुपये का घोटाला. तुमको जवाब देना पडेगा... असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी स्टाईल केली. पंतप्रधान मोदी यांनी आजवर किती घोषणा केल्या. काळा पैसाही परत आला नाही आणि भ्रष्टाचारमुक्त भारत झाला नाही, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
येत्या निवडणुकीत हे भ्रष्ट जुमला पार्टीचे सरकार आपल्याला घालवायचा आहे. आता कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा नाही तर, कपडे धुण्यासाठी आता धोपटण्याचा वापर करा, असाही सल्ला त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात दिला. आतापासून हा निर्धार करा की निवडणुकीत आपल्याला यांना घरी पाठवायचे आहे. शरद पवारसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे आहे, असे आवाहन रोहिणी खडसे यांनी यावेळी केले.
केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या सत्ताकाळात देशातील महिलांचा अवमान होत असून, महिलांची असुरक्षितता वाढली आहे. देशभरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात साजरा झाला. पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सोहळ्यात समावेश केला नाही. यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. पक्षस्थापनेपासून आजपर्यंत विविध वरिष्ठ पदे व मंत्रिपदे भोगली. तेच लोक आता ईडीच्या भीतीपोटी भाजपमध्ये गेले. अशांना या निवडणुकीत योग्य जागा दाखवा, असाही टोला त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला लगावला आहे.
माजी आमदार कदम म्हणाले, 'देशात भाजपकडून रामाच्या नावावर राजकारण सुरू आहे. हिंदू, मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचे काम सत्ताधारी भाजपकडून केले जात आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून (1999) पक्ष अनेक कठीण प्रसंग व अडचणीतून वाटचाल करीत असल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.