कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : नगरपालिका निवडणुकांना दोन ते तीन महिन्यांचा अवकाश आहे. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोचून त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. एवढेच नव्हे तर त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक बूथपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोचण्यासाठी मेहनत घ्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केले. (Shiv Sena MLA Vaibhav Naik attends NCP state president Jayant Patil's reception)
कणकवली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी कार्यालयाचा उपयोग हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झाला पाहिजे. इथे रिकामटेकडे बसवू नका, अन्यथा समस्या घेऊन आलेले नागरिक बाजूला पडतील आणि रिकामटेकड्यांची गर्दी वाढेल. या कार्यालयाच्या माध्यमातून कणकवली तालुक्याच्या जनतेचे प्रश्न ऐकणे, सोडवणे व त्याचा पाठपुरावा करणे या दृष्टीने काम लवकरच सुरू झाले पाहिजे. पुढील काळात नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्याची तयारी करण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा वेळ आपल्याकडे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथपर्यंत पोचावे आणि पक्ष संघटना बळकट करावी.”
त्यांच्यासोबत आमदार शेखर निकम, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्ष सुक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, तालुका निरीक्षक काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक, जिल्हा बँक संचालक आर टी मर्गज, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, मालवण तालुकाध्यक्ष विश्वास साठे, निखिल गोवेकर,युवक शहराध्यक्ष संदेश मयेकर, युवक विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, विनोद मर्गज, प्रफुल्ल सुद्रीक, विलास गावकर, अभिनंदन मालडकर, राजेश पताडे, श्रीकृष्ण ढेकणे, सुधा कर्ले, वैभव सावंत, आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कुडाळ-मालवणचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सदिच्छा भेट घेत स्वागत केले. राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांच्या घरी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली. या भेटीप्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी अबीद नाईक यांच्या निवासस्थानी जयंत पाटील यांची भेट घेतली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, कणकवलीत आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे शहरातील पटवर्धन चौकात ढोलताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.