
Sindhudurg News : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला होता. तर या कामात गैर व्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यानंतर पुन्हा येथे नव्याने पुतळा उभारण्यात आला आहे. पण पावसाळ्याच्या सुरूवातीलाच पुतळ्याजवळील भाग खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे याही कामाच्या दर्जाबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यात आला आहे. पण पुतळ्याच्या शेजारी सुरू असणाऱ्या जांभा चिऱ्यांचा काही भाग खचला आहे. हा धक्कादायक प्रकार घडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याचे फोटो आणि व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यामुळे स्थानिकांसह शिवप्रेमींच्या संतप्त भावना समोर येताना दिसत आहेत.
मालवण शहराला ऐतिहासिक महत्त्व असून येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या महिन्यातच उभारण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करून 11 मे रोजी याचे लोकार्पन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते नारायण राणे यांच्यासह प्रमुख मंत्री आणि नेते उपस्थित होते. पण आता पावसाळ्याच्या सुरूवातीलाच पुतळ्याच्या शेजारी सुरू असणाऱ्या कामाचा काही भाग खचल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत.
दरम्यान या धक्कादायक प्रकारानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने एक निवेदन प्रसिद्ध करून याची माहिती दिली आहे. या निवेदनात विभागाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कोणतेही नुकसान झालेले नसून चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्याची दुरुस्ती सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
याआधी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये केले होते. पण गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात 26 तारखेला मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे तो कोसळला होता. यानंतर राज्यभरातून सरकारवर जोरदार टीका झाली होती. यानंतर लगेच नव्याने पुतळ्याच्या उभारणीचे हाती घेण्यात आले होते. जे मे महिन्यात पूर्ण झाले होते. तर त्याचे लोकार्पणही करण्यात आले होते.
महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला असणारे जमीन खचली असून लावण्यात आलेले जांभा चिरे उखडले आहेत. याची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने घेतली आहे. सध्या काम सुरू असून खचलेला जमिनीचा भाग पूर्ववत केला जातोय. येथे जांभा चिरा बसवण्याचं काम हाती घेण्यात आले आहे. तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येथे कामावर लक्ष देवून आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.