
Ratnagiri News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात महायुतीतील तिनही राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने उतरले आहेत. येथे भाजप संघटनात्मक बळकटीकडे लक्ष देताना सदस्य नोंदणीचे काम गाव पातळीपर्यंत नेत आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संघटनात्मक सदस्य नोंदणीवर भर देताना दिसत आहे. पण याच विषयावरून पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देताना थेट झापलं आहे. तसेच दिलेल्या लक्षाप्रमाणे सदस्य नोंदणी न केल्यास निधी मागायला येऊ नका असा दमच भरला आहे. सध्या याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
मध्यंतरी कोकणात भाजपचे नेते सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करा अन्यथा निधी मिळणार नाही असे म्हणत खळबळ उडवून दिली होती. यानंतर अनेकांचे पक्ष प्रवेश देखील झाले होते. यावरून राज्यभर जोरदार टीका झाली होती. तर जिल्ह्यात संघटनात्मक सदस्य नोंदणीही मोठ्या प्रमाणात झाली होती. यानंतर आता निधी मिळणार असे वक्तव्य उदय सामंत यांनी केल्याने ते देखील नितेश राणेंच्या पावलांवर पाऊल टाकत आहेत की काय अशी चर्चा रंगली आहे.
येथील जयेश मंगल कार्यालयात आयोजित शिवसेना जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्य नोंदणी मेळाव्यात उदय सामंत यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण, राजेंद्र महाडीक, विलास चाळके, शिल्पा सुर्वे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उदय सामंत यांनी, अब्जावधीची विकासकामे करून देखील शिवसेना बालेकिल्ल्यातच सदस्य नोंदणीत मागे आहे. बालेकिल्ल्यात झालेली सदस्य नोंदणी चौथ्या क्रमांकाची असून ही दुर्दैवी गोष्ट असल्याचेही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच आता कमी होणाऱ्या सदस्य नोंदणीवरून पदाधिकाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज असून येत्या पंधरा दिवसांमध्ये सर्वांनी रस्त्याची कामे बाजूला ठेवा आणि संघटनात्मक सदस्य नोंदणीचे काम करा, असे आदेशच आता उदय सामंत यांनी दिले आहेत. राज्यात जिल्हा पहिल्या तीनमध्ये येईल, असे काम दाखवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यात 4 हजार 189 एवढी नोंदणी झाली असून ती पहिल्या क्रमांकाची आहे. त्या खालोखाल 3 हजार 979 सदस्य नोंदणी करून दापोली, खेड, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे; परंतु रत्नागिरी, चिपळूण, गुहागर हे तालुके चौथ्या क्रमांकावर आहेत. जी दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे याचे आत्मपरिक्षण करून येत्या पंधरा दिवसांमध्ये रत्नागिरी तालुका पहिल्या क्रमांकावर कसा येईल, याचे नियोजन करा.
निधीसाठी पालकमंत्र्यांना वेठीस धरून रस्ते करून घेतले. मग त्या रस्त्याने जाणाऱ्यांना सदस्य करून घेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. सदस्य नोंदणीसाठी घरोघरी फिरा. शासनाने केलेली कामे सांगा. पक्षाचे काम सांगा. रस्त्यावरच्या चर्चा बंद करा. कोण जुना, कोण नवा. कोण आता आला कोण आधीपासून होता, हे सर्व आता गौण असून संघटना म्हणून एकदिलाने काम करा असेही आदेश सामंत यांनी दिले आहेत.
दरम्यान राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती म्हणूनच समोरं जायचं आहे. पण युती झालीच नाही तर स्वबळाचीही तयारी ठेवा. समोरचा अंगावर आला तर त्याला शिंगावार घ्या. एकदिलाने काम करून शिवसेना संघटना मजबूत करा, अशाही सूचना उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.