
मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले.
खेडेकरांनी पत्रकार परिषदेत भावूक होत आपल्या तीन दशकांच्या संघर्षाची आठवण करून खंत व्यक्त केली.
कोकणातील मनसेसाठी केलेल्या कार्याची अशी पोचपावती मिळावी का, असा सवाल खेडेकरांनी उपस्थित केला.
Ratnagiri News : तळ कोकणातील एकमेव नेते राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं पक्षातून बडतर्फ करत मोठी कारवाई केली. त्यांच्यावर पक्षांच्या विचारांशी तडजोड करत काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तर त्यांच्यावर भाजपच्या संपर्कात असल्यानेच कारवाई करण्यात आल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. या कारवाईमुळे तळ कोकणातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. अशातच त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळूी त्यांनी अश्रू नयनांनी, खंत व्यक्त करताना सुमारे तीन दशकांहून अधिक काळ घालवत पक्षासाठी संघर्ष करताना पोलिसांच्या लाठ्या खात, आंदोलने करून कार्यकर्त्यांच्या प्रश्नासाठी तुरुंगवास भोगून कोकणात पक्षाची पायाभरणी मी केली. हीच का माझ्या निष्ठेची पोचपावती, असा प्रश्न खेडेकरांनी भावूक होत केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे नियम व धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे खेडेकर (खेड, रत्नागिरी), अविनाश सौंदळकर (राजापूर, रत्नागिरी), संतोष नलावडे (चिपळूण, रत्नागिरी) आणि सुबोध जाधव (माणगाव, रायगड) यांच्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले होते.
यानंतर आता खेडेकर यांनी खेड येथे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी खेडेकर म्हणाले, ‘‘मी पक्षासाठी पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस धडपड केली. नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत ते युवा मनसेच्या झेंड्याखाली लढलो, पण फक्त गैरसमज आणि मला एकदाही न विचारता बडतर्फ केले. सोशल मीडियावर बडतर्फीचे पत्र वाचले तेव्हा मन सुन्न झाले. हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे प्रमाणपत्र आहे.
मात्र आता गणेशोत्सवानंतर प्रमुख मनसे कार्यकर्त्यांना भेटून सर्वांशी चर्चा करून लवकरच भूमिका ठरवणार असून माझा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील प्रवास येथेच संपल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच गेली 15 वर्षे मी खेड पालिका मनसेच्या ताब्यात ठेवली. मी पहिल्यांदाच थेट नगराध्यक्ष झालो. कोकणात पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. तरी देखील फक्त संशयाच्या आधारावर माझ्यासह तिघांना बडतर्फ केले गेले.
का तर भाजपच्या काही नेत्यांना भेटलो म्हणून. पण मी पक्षप्रवेश करणार नव्हतो. कार्यकर्त्यांविरुद्धची तडिपारीची कारवाई थांबवण्यासाठी नीतेश राणेंना भेटलो होतो. विकासासाठी सत्ताधाऱ्यांना भेटणे गरजेचे होते. मात्र, माझ्याबद्दल संशय निर्माण करण्यात आला असाही दावा खेडेकर यांनी यावेळी केला आहे.
माझ्याबाबत सुरू असणारे राजकारणावरून मी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून तसे प्रयत्न झाले होते. पण त्यात यश आले नाही. हेच माझे दुर्दैव म्हणावे लागेत. साहेबांनी माझं ऐकणू घेवून बडतर्फीचे पत्र स्वतः दिले असते. तर मी तो त्यांचा आदेश मानून बाहेर पडलो असतो. पण मी पक्षाची शिस्त कधीही बिघडवली नाही असाही खुलासा खेडेकर यांनी केला आहे.
प्रश्न 1: वैभव खेडेकर यांना मनसेतून का बडतर्फ करण्यात आले?
उत्तर: पक्षातील अंतर्गत कारणास्तव त्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती आहे, मात्र अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही.
प्रश्न 2: खेडेकर किती वर्षे मनसेशी जोडलेले होते?
उत्तर: ते भारतीय विद्यार्थी सेना आणि नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मिळून तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत होते.
प्रश्न 3: खेडेकरांची प्रतिक्रिया काय होती?
उत्तर: त्यांनी पत्रकार परिषदेत भावूक होत खंत व्यक्त केली आणि पक्षनिष्ठेला अशी पोचपावती का मिळाली असा सवाल केला.
प्रश्न 4: खेडेकरांनी पक्षासाठी काय योगदान दिले?
उत्तर: त्यांनी कोकणात मनसेची पायाभरणी केली, आंदोलने केली, तुरुंगवास भोगला आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला.
प्रश्न 5: या निर्णयाचा कोकणातील मनसेवर काय परिणाम होईल?
उत्तर: कार्यकर्त्यांत नाराजी वाढू शकते आणि पक्षाच्या संघटनात्मक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.