

वरंध घाट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने रद्द केला आहे.
रस्त्याचे काम सुरू ठेवत पर्यायी मार्ग उपलब्ध करून वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे.
स्थानिक नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
Raigad News : पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या 'वरंध घाट' रस्त्याबाबात जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला होता. सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सव्वा महिन्यासाठी हा घाट बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तर हिर्डोशी ते वरंधा दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामासाठी हा निर्णय घेतला होता. पण आता पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी हा आदेश रद्द करत स्थानिक नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता घाट पूर्णतः बंद न करता पर्यायी मार्ग उपलब्ध ठेवूनच कामकाज करण्याचे आदेश दिले आहेत. 'वरंध घाट' सुरक्षेच्या कारणास्तव २५ मार्च २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत हा मार्ग बंद राहणार होता.
पावसाळ्यापूर्वी घाटातील कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी भोर उपविभागीय अधिकारी यांनी हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनासमोर ठेवला होता. ज्यात राष्ट्रीय महामार्ग (क्र.९६५) हिर्डोशी ते वरंधा घाट रस्त्याबाबात रुंदीकरण कामामुळे घाट पूर्णतः बंद करण्यात यावा असे म्हटले होते.
तसेच एका बाजूस निरा देवघर धरणाचे पाणी तर दुसऱ्या बाजूस उंच डोंगररांग असल्याने वाहतूक वळविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. हा घाट भाग दरडप्रवण असून रस्ता अत्यंत अरुंद व वळणावळणाचा असल्यामुळे २५ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत रस्ता पूर्णतः बंद करण्याची मागणी केली होती.
यामुळे धामणदेव, कारुंगण, हिंडोशी, सोमजाई माळ, टाक्या माळ, वारवंड, शिरगाव, अशिंपी, उंबर्डेवाडी, उंबर्डेगाव व शिळीम या गावांच्या वाहतुकीचा प्रश्न तयार झाला होता. तसेच या गावांना पर्यायी मार्ग नसल्याचेही प्रशासनाला अहवालातून स्पष्ट झाले होते. तर स्थानिक नागरिकांना, अत्यावश्यक सेवेसह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार होता.
या अडचणी लक्षात घेता घाट पूर्णतः बंद न करता पर्यायी मार्ग उपलब्ध ठेवूनच कामकाज करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच दिले आहेत. या आदेशानुसार, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू ठेवताना स्थानिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहतूकीसाठी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान बाहेरील वाहनांसाठी प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन केले असून पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे तर कोल्हापूरकडे जाण्यासाठी पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सातारा-कराड किंवा खेड-चिपळून-पाटण-कराड-कोल्हापूर असा पर्याय प्रशासनाने सुचवला आहे.
1. वरंध घाट बंद होणार होता का?
हो, 25 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय होता.
2. आता काय बदल झाला आहे?
पूर्ण बंदीचा आदेश रद्द करून पर्यायी मार्गासह वाहतूक सुरू ठेवली जाईल.
3. हा निर्णय कोणी घेतला?
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी हा निर्णय घेतला.
4. रस्त्याचे काम सुरू राहणार का?
हो, रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरूच राहणार आहे.
5. प्रवाशांना काय फायदा होईल?
पूर्ण बंदी टळल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.