Maharashtra Political Live : राज्यात 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा इशारा

Sarkarnama Headlines Updates : 27 सप्टेंबर 2025 रोजीच्या देशासह राज्यातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्यातील पूरपरिस्थिती, हवामान खात्याने दिलेला अलर्ट आणि राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काय काय मदत देण्यात आली आहे. याबबतच्या ताज्या अपडेट्स जाणून घेऊया.
rain .jpg
rain .jpgSarkarnama
Published on
Updated on

राज्यात 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मराठवाडा,विदर्भ यांच्यातही जोरदार पावसामुळे धोका असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं दिली आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

मोठी बातमी: तामिळनाडूचे अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी; 33 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती

तामिळनाडूचे अभिनेता आणि राजकारणात सक्रीय झालेल्या विजय थलपती यांच्या करूर येथील रॅलीमध्ये चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 20 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. आता तामिळनाडूमध्ये राजकीय पडसाद उमटत आहेत.

'2029 नंतर केंद्रात राहुल गांधींचे सरकार सत्तेवर येणार...',संंजय राऊतांचा दावा 

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी 2029 नंतर केंद्रात राहुल गांधींचे सरकार सत्तेवर येईल असा दावा केला आहे.तसेच त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता म्हणून कार्य करावे लागेल. सध्याच्या मोदी सरकारला पूर्ण बहुमत नसल्याचा दावाही राऊत यांनी केला, तसेच 2029 पर्यंत त्यांचे सरकार टिकण्याची शक्यता कमी असल्याचे भाकीतही राऊत यांनी व्यक्त केले आहे.

रेल्वेचा दिवाळी आणि छट पूजेसाठी मोठा निर्णय, प्रवाशांना दिलासा

मध्य रेल्वेकडून दिवाळी आणि छट पूजेनिमित्त महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे विभागानं दिवाळी आणि छठ उत्सव 2025 साठी 60 अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रवाशांना मोठा दिलासा मानला जात आहे.

Navi Mumbai Politic's : संभाजीराजेंच्या साथीदाराचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज पक्षाचे नवी मुंबईतील नेते अंकुश कदम यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. कदम यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे बडे नेते उपस्थित होते. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

Naresh Mhaske :  आमच्या नादाला लागलं तर त्याला सोडत नाही : नवी मुंबईत नरेश म्हस्केंचा इशारा

आम्ही उगीचच कुठं आमचं तोंड उघडत नाही. पण आमच्या नादाला कोण लागलं तर त्याला सोडतही नाही, असा इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात दिला.

Uday Samant : कुणी कितीही शहाणपणा केला तरी नवी मुंबई एकनाथ शिंदेंचीच राहणार आहे : उदय सामंत

नवी मुंबईत होत असलेला पक्षप्रवेश आणि त्यातील भाषणांकडे काही लोकांचे डोळे लागले आहेत. पण आजची गर्दी बघितल्यानंतर ही नवी मुंबई एकनाथ शिंदे यांची होती. शिंदे यांची आहे आणि कुणी कितीही शहाणपणा केला तरी ही नवी मुंबई एकनाथ शिंदे साहेबांचीच राहणार आहे, हा सांगणारा आजचा मेळावा आहे, असा हल्लाबोल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.

Rahul Gandhi : राहुल गांधी मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार : काँग्रेस नेत्याचे संकेत

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. ज्यांच्यावर नैसर्गिक आघात झाला आहे, जे दुःखात आहेत, त्यांच्या भेटीसाठी गांधी येणार आहेत, असेही नितीन राऊत यांनी सांगितले

Nitin Raut : ज्यांना संविधानाच मान्य नाही; त्या संघाच्या कार्यक्रमाला जाण्याचा विचारही माझ्या मनात नाही : नितीन राऊत

ज्यांना संविधानच मान्य नाही, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही. ज्या मनुस्मृतीने या समाजात जाती उभारल्या, जाती निर्माण केल्या. आमच्या लोकांना अस्पृश्य ठरवलं, त्या मनुस्मृतीला मानणाऱ्या लोकांच्या सोहळ्याला जाण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. मला संघाकडून अनेकदा निमंत्रण आलेले आहे. मात्र ही विचारांची लढाई आहे. नागपूर ही संघाची भूमी असली तर ती दीक्षाभूमीही आहे, हे विसरता कामा नये. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता असल्याने संघाच्या कार्यक्रमाला जाण्याचा प्रश्नच येणार नाही, असे काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी सांगितले.

Dhanagar Reservation : धनगर आरक्षणासाठी उपोषण करणारे दीपक बोऱ्हाडेंची सरकारी शिष्टमंडळाने भेट घेतली

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा, यासाठी जालन्यात दीपक बोऱ्हाडे बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस होता. दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, अर्जून खोतकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ जालन्यात आले होते. त्यांनी बोऱ्हाडेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणं करून दिलं आहे.

धुळे पोलिसांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ लाखांचा निधी

राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओल्या दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जातेय. अशावेळी धुळे जिल्ह्यातील 50 पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पगारातून दोन लाख रुपये गोळा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत दिली आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हा चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे.

महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार, आयएमडीकडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट

महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागनं राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे  पुन्हा एकदा चिंतेत भर पडली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) कडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देताना मुंबईसह कोकणामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यात धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड, तसेच विदर्भात बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आमदार रवी राणा यांची मागणी

राज्यामध्ये सध्या पावसाची संततधार सुरू असून चांदा ते बांदा पावसाने शेतकऱ्याचे आतोनात नुकसान केलं आहे. यादरम्यान आमदार रवी राणा यांनी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी केली आहे. आपण शेतकऱ्यांच्या व्याथा मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केल्यानंतर बोलत होते.

लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणारे पोलिसांच्या ताब्यात

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नगर - दौडं महामार्गवर लक्ष्मण हाके नाष्टासाठी थांबले असता त्यांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी केला होता हल्ला. त्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते. ज्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून तिघांना ताब्यात घेतल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माहिती दिली आहे.

पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी लढा उभा करावा लागणार : सुजात आंबेडकर

राज्य सरकार हे पूरग्रस्तांना कधीही मदत करत नाहीत हा इतिहास आहे. नांदेड जिल्ह्यात 2024 मध्ये झालेल्या पुरातील पूरग्रस्तांना मदत मिळाली नव्हती ती मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं होते. 2024 मधील पूरग्रस्तांचेही अद्याप पैसे राज्य सरकार ने दिलेले नाहीत त्यामुळे आत्ता झालेल्या पूरग्रस्तांना देखील मदत मिळवून देण्यासाठी लढा उभा करावा लागणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितले आहे. स्वतःचे ब्रॅण्डिंग करायला राज्य सरकार कडे पैसे आहेत मग पूरग्रस्तांना देण्यासाठी पैसे का नाहीत असाही सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

फडणवीसांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि नुकसान झालेल्या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी, पीएम केअर फंडातून महाराष्ट्रासाठी किमान 50 हजार कोटी रुपये फडणवीस यांनी आणावेत, यासह शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असे म्हटले आहे. तसेच ठाकरे यांनी फडणवीस यांनी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ मदत जाहीर करून कालबद्ध पद्धतीने वाटप करण्याची विनंती देखील केली आहे.

Nashik : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन 

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय नूतन आधुनिक इमारतीचे उद्घाटन व वाहनतळाचे भुमीपूजन आज (दि. २७) सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे त्यांनी कौतुक केले.

Maharashtra Flood : सीना नदीला मोठा पूर, माढा तालुक्यातील 13 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर

माढा तालुक्यातील सीना नदीला मोठा पूर आला असून तालुक्यातील 16 गावे बाधित झाली आहेत. या गावातील सुमारे 13 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

OBC Melava Beed : मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील बीड मधील महाएल्गार मेळावा रद्द

बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचा महा एल्गार मेळाव्याचा आयोजन 28 सप्टेंबर रोजी करण्यात आलं होतं. मात्र पावसामुळे आणि शेतकऱ्यांच्या प्रचंड अडचणींमुळे मेळावा रद्द झाल्याची माहिती मंत्री भुजबळांनी दिली आहे.

Chandrapur Update : शेतकऱ्याने तहसील कार्यालयातच घेतले विष; चंद्रपूरमधील घटनेने खळबळ

तहसीलदार फेरफार करण्यास टाळाटाळ करत असल्याने एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयातील ही धक्कादायक घटना असून परमेश्वर मेश्राम (वय 55) असे शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Eknath Shinde Shivsena : नवी मुंबईत एकनाथ शिंदे मेळावा घेणार; गणेश नाईकांच्या विरोधात मोर्चेबांधणी

शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी नगरसेवक अन् पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठका घेत आहेत. नवी मुंबई महापालिकेत निवडणूक सत्ता यावी, यादृष्टीने एकनाथ शिंदे यांची मोर्चे बांधणी करत आहेत. नवी मुंबई शहरामध्ये शिवसेनेचा मेळावा होणार आहे. मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहेत. गणेश नाईक यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांची नवी मुंबई शहरात मोर्चे बांधणी होताना दिसत आहे.

Dhangar Reservation Andolan : धनगर आंदोलनाची सरकारकडून दखल; शिष्टमंडळ उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेणार

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली असून जालना इथले उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषण आंदोलनाला भेटण्यासाठी आज सरकारकडून उच्चस्तरीय शिष्टमंडळ जाणार आहे. या शिष्टमंडळामध्ये मंत्री पंकजा मुंडे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे आणि आमदार अर्जुन खोतकर यांचा समावेश असणा आहे.

Devendra Fadnavis Dhule : मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविणार; धुळ्यातील महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौऱ्यावर आहे. परंतु त्यांचा ताफा अडविण्याचा इशारा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी यांना पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच ताब्यात घेतलं आहे. धुळे शहरातील खड्डेमय रस्त्यांबाबत सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. प्रभादेवी परदेशी यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून निषेध आंदोलनाचा इशारा दिला होता. सोनगीर पोलिसांनी प्रभा देवी परदेशी यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Sanjay Raut on Devendra Fadnavis : खासदार राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; कोविडमध्ये गंगेत तंरगणाऱ्या बेवारस प्रेतांची आठवण करून दिली

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडातील पैसे वापरावे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झोंबल्याने तिखट प्रत्युत्तर दिले. आता फडणवीस यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला. हे भाजपवाल्यांचं मूर्खासारखं बोलणं आहे. कोविडमध्ये काय झालं हा प्रश्न आता कोणी विचारला आहे का? कोविडमध्ये महाराष्ट्राइतकी सुव्यवस्था, सुरक्षा कुठल्याच राज्यात नव्हती. तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. हे आत्ताच्या पोपटांना कळले पाहिजे. ज्या गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही कुंभमेळा केला, ती गंगा कोविडमध्ये बेवारस प्रेतांनी कशी वाहत होती हे जगाने पाहिलेले आहे, असा टोला खासदार राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

Laxman Hake Attack : लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला, पाथर्डीत युवकांनी काठ्यांनी वाहन फोडलं

Laxman Hake Attack
Laxman Hake AttackSarkarnama

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची खळबळजनक प्रकार घडला. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील बाह्यवळण रस्त्या लगत घडली. सकाळी लक्ष्मण हाके दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) इथं आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले. नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच काही अज्ञात युवकांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला.

Maharashtra floods : नाना पाटेकर अन् मकरंद अनासपुरेंकडून बळीराजासाठी मदतीचं आवाहन

Maharashtra floods
Maharashtra floodsSarkarnama

राज्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाने थैमान घातल्यामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे. अभिनेता नाना पाटेकर अन् मकरंद अनासपुरे यांनी मदतीचं आवाहन केलं आहे. तसंच 'नाम' फाउंडेशनच्या माध्यमातून जेवढी आम्हाला मदत करता येईल, तेवढी करणार असल्याचे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. मराठवाड्यात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे, शेतीचे नुकसान झालं आहे, अस्मानी संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे. राज्यातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन, सर्वांनी मिळून बळीराजाबरोबरच, सर्वसामान्य माणसाला उभारणीसाठी मदत करण्याचे आवाहन अनासपुरे यांनी केलं आहे.

Shivsena live: राज ठाकरे हे उपस्थित राहणार का?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. दसरा मेळाव्याचा दुसरा टिझर प्रसिद्ध केला आहे. राज ठाकरे हे या मेळाव्यास उपस्थित राहणार का? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

Maharashtra live: कृषीमंत्र्यांचा माढा दौरा रद्द?

माढा तालुक्यातील उंदरगाव येथे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर ग्रामस्थ संतप्त झाल्यानंतर आता विद्यमान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उंदरगाव मधला पाणी दौरा केला रद्द केल्याचे समजते.

Maharashtra Rain Alert:नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

मध्यरात्रीपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेश काढले. नांदेड शहरातील जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूल परिसरात तळ्याचे स्वरूप आले आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

Pune-Bengluru Highway: खंबाटकी घाटात वाहतूक विस्कळीत

सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अवजड मालट्रक बंद पडल्याने पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद करण्यात आला आहे. येथील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Solapur Flood : भाजप किसान मोर्चाकडून शंभर टन चारा व कडबा कुट्टीची मदत

सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी भाजप किसान मोर्चाकडून शंभर टन चारा व कडबा कुट्टीची मदत पाठवण्यात आली आहे. यासाठी सांगलीतून शंभर टन कडबा कुट्टी चाऱ्याचा पहिला ट्रक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला आहे.

बिहारामधील योजना म्हणजे 'मतदार लाच योजना', ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.26) बिहारमधील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी 'बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजने'ची सुरुवात करण्यात आली. या योजने अंतर्गत बिहारमधील तब्बल 75 लाख महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा करण्यात आले. तर मोदी सरकारची ही योजना बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महिलांची मते मिळवण्याठीचा डाव असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. महिलांच्या खात्यात पैस जमा करून भाजप निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यावर निवडणूक आयोग गप्प का? बिहारातील ही योजना दुसरे तिसरे काही नसून 'मतदार लाच योजना'च आहे. भारतीय निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यांना झापडे बांधल्याचा परिणाम भारताला भोगावा लागत आहे. मतदार लाच योजनेचा प्रत्येक भारतीयाने धिक्कार करायला हवा, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारच्या या योजनेवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

Marathwada Rains : मराठवाड्यात पुन्हा पावसाचं थैमान, तर नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

काल रात्रीपासून मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी, गोंदिया, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत पावसाने हाहाकार घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह मराठवाड्यातील सामान्य नागरिकांसमोर पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे. नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Laxman Hake : OBC महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवरून लक्ष्मण हाकेंचा फोटो वगळला

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे मागील काही दिवसांपासून सतत वादात सापडत आहे. आधी त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्यानंतर त्यांच्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ज्यामध्ये ते पैशाच्या व्यवहारा संबंधित बोलत होते. अशातच आता बीडमध्ये होणाऱ्या महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवरून लक्ष्मण हाकेंना वगळण्यात आलं आहे. बीडमध्ये हे बॅनर लागल्यानंतर हाके यांनी आपल्या सोशल हँडलवर भावनिक पोस्ट देखील केली. 28 तारखेला बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाएल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं. मात्र, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना बॅनरवर स्थान न दिल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

RSS : 'आरएसएस'ची शतकपूर्ती, संघाकडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज 27 सप्टेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी नागपूर येथे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली होती. संघाच्या याच शतकपूर्ती वर्षानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. नागपूरमध्ये देखील आज विशेष पथसंचालन केलं जाणार आहे.

राज्याचा प्रस्ताव आल्यानंतर भरीव आर्थिक मदत करण्याचं PM मोदींंचं आश्वासन, CM फडणवीसांची माहिती

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाने हाहाकार घातला आहे. मराठवाड्यात तर महापूर आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत राज्याचा प्रस्ताव आल्यानंतर भरीव आर्थिक मदत देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं आहे. अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

Maharashtra Rain Alert : राज्यावर पावसाचं संकट कायम! हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यात तर या पावसामामुळे नद्यांना महापूर आले आहेत. अशातच आता या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून आजपासून म्हणजे 27 ते 29 सप्टेंबरपर्यंत राज्यात ऑरेज आणि रेड अर्लट दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पावसामुळे संभाव्य पूर परिस्थिती निमार्ण होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com