Maharashtra Politics News live : महाराष्ट्र पोलिसांचं मोठं यश, 64 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Naxal campaign
Naxal sarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्र पोलिसांचं मोठं यश, 64 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर नक्षलविरोधी कारवायांना वेग आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिस आणि राज्य सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडून नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी कठोर पावलं उचलली आहे.यातच आता शनिवारी (ता.15) सीमारेषेवरील कोठागुडेम जिल्ह्यातील तब्बल 64 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीविरोधात डॉक्टरांची हायकोर्टात धाव

मुंबई ,ठाण्यामधील काही डॉक्टरांनी आगामी काळात होत असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. ही निवडणूक येत्या 3 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात एकाच ठिकाणी मतदान केंद्र आणि कामकाजाच्या दिवशीच ही निवडणूक होत असल्यानं डॉक्टरांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

नांदेडमध्ये जीपची ट्रकला भीषण धडक, 2 जणांचा मृत्यू

नांदेडच्या दिशेनं येत असलेल्या जीपनं दुभाजकाला ओलांडून दुसऱ्या बाजूच्या ट्रकला धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडला. पिंपळगांव महादेव पाटी परिसरात या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 6 प्रवासी जखमी झाले आहेत. जीपमध्ये एकूण 8 प्रवासी होते.

Ladki Bahin Yojana : योजना निकालानंतर सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी ठरली

विधानसभेपूर्वी काढलेली लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली. मात्र, निकालानंतर सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी ठरली असल्याचे बोलले जातंय .या योजनेसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी आणायचं कुठून असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडला आहे. दरम्यान, घराघरात घुसून महिलांचे लाडक्या बहिण योजनेसाठी अर्ज भरण्यात आले. असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. ज्या महिलांचे नावे लाडकी बहीणमधून कमी झाले त्या महिलांसाठी आता जनांदोलन उभे करावे लागणार आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

Shivsena UBT : प्रमुख नेत्यांवर वादग्रस्त टीका प्रकरणाची गंभीर दखल

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील काही पेजच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि पक्षातील प्रमुख नेत्यांवर वादग्रस्त टीका सुरू आहे. आता या प्रकरणाची गंभीर दखल शिवसेना ठाकरे गटाकडून घेण्यात आली आहे. याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे सचिव साईनाथ दुर्गे यांनी सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन, लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. ‘अशी बदनामीकारक, चुकीची माहिती पसरविणाऱ्या या सोशल मिडिया पेजवर बंदी घालून, पेज चालविणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी,’ अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. याबाबत पक्षाच्या वतीनं ट्विट करत माहिती देण्यात आली आहे.

Harshvardhan Patil : निवडणुका लवकरच होतील

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत, पण कोर्टात त्याची तारीख सुरू आहे. ते कधी पूर्ण होणार हे माहीत नाही. पण आज ना, उद्या या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे आपण त्याची तयार केली पाहिजे, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या मेळाव्याप्रसंगी सांगितले.

Rohit Patil: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली सत्ता निश्चित येईल

सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बोलताना आमदार रोहित पाटील यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली सत्ता निश्चित येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आपल्या व मित्र पक्षांचे सदस्य कमी असले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आपली सत्ता निश्चित येईल.

Aurangzeb's tomb controversy : सासवड ते खोलताबादपर्यंत निघणारी रॅली स्थगित

पुण्यातील सासवड ते खोलताबादपर्यंत निघणारी रॅली स्थगित करण्यात आली आहे. औरंगजेबची कबर हटवण्यासाठी आज ही रॅली निघणार होती. मात्र, ही रॅली स्थगित करण्यात आली आहे. त्याबाबतचं पत्रक छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानकडून जारी करण्यात आलं आहे. तर मिलिंद एकबोटे यांना देखील 5 एप्रिलपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्हाबंदी करण्यात आली होती. त्यानंतर आता हा मोठा निर्णय झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Akkalkot News : अक्कलकोटमध्ये औरंगजेबचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हा

औरंगजेबच्या कबरीवरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच अक्कलकोटमध्ये काहीजणांनी औरंगजेबचं स्टेटस ठेवलं होतं. याप्रकरणी आता १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satish Bhosale : खोक्या भोसलेची घटनास्थळी परेड...

ढाकणे पिता-पुत्रांना मारहाण प्रकरणात आता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा कसून तपास सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस खोक्याला थेट मारहाण केली त्या ठिकाणी त्याला घेऊन गेले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबच्या कबरीवरुन वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबच्या कबरीवरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. बजरंग दलाने ही कबर हटवण्याची तर हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी ही कबर नष्ट करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे. कबरीच्या परिसरात आता SRPF ची तुकडी तैनात करण्यात आली आहे. तर मिलिंद एकबोटेंना 5 एप्रिलपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्यास बंदी करण्यात आली आहे.

Karnataka Congress Govt : मुस्लीम ठेकेदारांना निविदांमध्ये चार टक्के कोटा : भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने निविदांमध्ये मुस्लीम ठेकेदारांना चार टक्के कोटा देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयावरून भाजपने काँग्रेस कर्नाटकात मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे, असा आरोप केला आहे. काँग्रेस सत्तेवर येताच धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर समाजामध्ये विभाजनाचा प्रयत्न करते, असाही आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

Milind Ekbote : मिलिंद एकबोटे यांना पुढील 20 दिवस संभाजीनगर जिल्हाबंदी

संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणीवरून राज्यभरात वातावरण तापले आहे. या प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना पुढील वीस छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी करण्यात आली आहे. संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश काढले आहेत.

Manikrao Kokate : न्यायालय योग्य तोच निर्णय देईल : माणिकराव कोकाटे

मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात 1995 मध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. त्या प्रकरणी कनिष्ट न्यायालयाने कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयास नाशिक सत्र न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेवर विरोधक विश्वास ठेवत नसतील तर ते दुर्दैवी आहे, पण न्यायालय योग्य तोच निर्णय देईल, असा विश्वास कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला.

Suresh Dhas : होय, आशिष विशाळ माझाच कार्यकर्ता; पण पैसे मागितले असतील तर कारवाई करावी : सुरेश धस

आशिष विशाळ हा माझा सहकारी आहे. पण मी त्याला पत्र दिलेले नाही. त्याने देशमुख कुटुंबीयांना मदत करायची म्हणून पैसे मागितले असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, असे भाजप आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले. आशिष विशाळ हा आमदार धस यांचा स्वीय्य सहाय्यक असल्याचे सांगून धाराशिव शहरात खंडणी मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरला झाला होता, त्यात काही तरुणांनी विशाळ याला रस्त्यात चोप दिल्याचे दिसून येत आहे.

हलाल पद्धतीचेच मटण विकणार; खाटीक समाजाचा नीतेश राणेंना झटका

कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, आम्ही हलाल पद्धतीनेच मटण विकणार, असा निर्धार करत खाटीक समाजाने मंत्री नीतेश राणे यांना झटका दिला आहे.

पुरावे घेऊनच बीडला जाणार, मग अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी - देसाईंची मागणी

बीड पोलिसांनी पुरावे घेऊन चौकशीला बोलावले आहे. सोमवारी 17 मार्च रोजी बीडमध्ये 11.30 वाजता पुरावे घेऊन बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात मी पोहोचणार आहे. तुम्हाला पुरावेच पाहिजे होते तर आता पुरावे घ्या; पण यातले जे पोलीस अधिकारी आहेत ते तात्काळ बीड जिल्ह्याच्या बाहेर हलवा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

या अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन होणे गरजेचे आहे. यामध्ये कोणाचा राजकीय हस्तक्षेप असेल, राजकीय दबाव असेल तर तो आता बाजूला ठेवा. बीडचा गुंडाराज संपवायचा असेल तर या पोलिस अधिकाऱ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर घालवणं गरजेचं आहे, असे मतही देसाई यांनी व्यक्त केले.

अशा प्रवृत्तींना आळा घालणं गरजेचं : कोकाटेंच्या निकालावर दानवेंची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याबाबत न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण चर्चेचा विषय ठरत असतानाच जनतेचे पैसे वाया जाणार नाहीत, ही भूमिका वेगळी असली तरी अशा प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे.

न्यायालयाने दोषी ठरवले नाही, याचा अर्थ हा कायदा चुकीच्या कामांना पाठबळ देण्यासाठी नाही. त्यामुळे योग्य कारवाई होणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडली.

Sanjay Raut : सरकारला शेतकरी आत्महत्येची लाज वाटत नाही का? - संजय राऊत

गेल्या वर्षाभरात दोन हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, आपल्या राज्यातील शेतकरी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करत आहेत. ते देखील असामान्य शेतकरी नाहीत तर ज्यांनी शेतीमध्ये अनेक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकार काहीच करत नाही, त्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. याची सरकारला लाज वाटत नाही का?

सरकारच्या नव्या विधेयकाला सुप्रिया सुळेंचा विरोध

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकारच्या नव्या विधेयकाला विरोध केला आहे. त्या ट्विटमध्ये म्हटल्या आहेत की, महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी नागरीकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्यासाठी नवे विधेयक आणायचे ठरविले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा शासनाच्या विरोधात बोलण्याचा हक्क हिरावून घेतला जाणार आहे. वास्तविक सुदृढ लोकशाहीत विरोधी मतांचा आदर केला जातो. लोकशाहीचे तत्व विरोधी मतांना देखील महत्वाचे मानते.सत्ताधारी बेलगाम होऊ नयेत, त्यांनी जनमताचा आदर करावा याची दक्षता विरोधी आवाज घेत असतो. परंतु सदर ' महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा' विधेयकात 'बेकायदेशीर कृत्य' ही संकल्पना स्पष्ट करताना शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान केल्याचे दिसते.‌या माध्यमातून शासनाला 'पोलीसराज' प्रस्थापित करण्याचे लायसन्स मिळणार असून याचा दुरुपयोग शासनाच्या विरोधात असणाऱ्या परंतु लोकशाही मार्गाने, विधायक विरोध व्यक्त करणाऱ्या व्यक्ती, संस्था अगर संघटनांच्या विरोधात होऊ शकतो.

महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; बस स्टॉपवर सोडतो म्हणून कारमध्ये घेतले

महाविद्यालयात जायला निघाल्या विद्यार्थिनीवर बस स्टॉपवर सोडतो, असे सांगून कारमध्ये घेतले. कार बस स्टॉपवर नेण्याऐवजी शेतात घेऊन जात आरोपीने विद्यार्थिनीवर अत्याचार केला. या कृत्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने 10 दिवसांनंतर कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. पनवेल पोलिसांनी पोस्को अंतर्गत 42 वर्षीय आरोपी अमोल पदरथ याला अटक केली असून त्याला 18 मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

Sharad Pawar : सत्तेता गैरवापर होत असेल तर सरकारने दखल घ्यावी - शरद पवार

राज्यात काही ठिकाणी परिस्थिती बिघडली आहे. काही ठिकाणी धार्मिक धार्मिक घटना घडत आहेत. राज्य सरकारची केवळ बघ्याची भूमिका नको. काही जणांकडून सत्तेचा गैरवावापर करण्याची भूमिका घेतली गेली. सत्तेता गैरवापर होत असेल तर सरकारने दखल घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.

Farmer suicide : वर्षभरात 2,706 शेतकऱ्यांची आत्महत्या

गेल्या वर्षाभरात राज्यात तब्बल दोन हजार 706 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या एका वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यातील 2,706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अमरावती विभागामध्ये 1,069 आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 952 शेतकऱ्यांनी जीवन संपवले

SSC & HSC Result News : दहावी-बारावी परीक्षांचा निकाल 15 मेपूर्वी लागणार?

दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल यंदा नेहमीपेक्षा लवकर लागण्याची शक्यता आहे. यंदा हा निकाल 15 मे पूर्वी लागण्याची शक्यता असून तशी पुष्टी राज्य शिक्षण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यंदा नेहमीपेक्षा 10 दिवस लवकर परीक्षा सुरू झाल्याने निकालही लवकर लागण्याची शक्यता आहे.

Mahiti Aayukta News : राज्याला लवकरच माहिती आयुक्त मिळणार

राज्यात माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त आणि अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय माहिती आयुक्त अशी चार पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी प्राप्त अर्जामधून योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी शोध समिती स्थापन केली आहे. त्यामुळे लवकरच माहिती आयुक्त मिळेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

Dhananjay Munde News : करुणा शर्मा यांची मुंडेंच्या विरोधात तक्रार

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता आमदाराकीवरही टांगती तलवार आहे. यादरम्यान करुणा शर्मा यांनी मुंडेंच्या विरोधात तक्रार दिली आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. याप्रकरणी शनिवारी (ता.15) परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Legislative Council Election News : विधान परिषदेसाठी उमेदवार आज ठरणार? भाजपच्या नेत्यांची बैठक

राज्यातील पाच विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सध्याच्या घडीला महायुतीचे बहुमत पाहता या सर्व जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. भाजप-3, शिवसेना-1आणि राष्ट्रवादी काँग्रेसला -1 जागा गेली आहे. त्याप्रमाणे आज (ता.15) विधान परिषदेसाठी उमेदवार ठरवण्यासंदर्भात भाजपच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे, यांच्यासह कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवार ठरवले जाऊ शकतात.

Maharashtra Politics  News : 'माझं काही खरं नाही' : जयंत पाटील

मध्यंतरी जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करून सत्तेत जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांनी या चर्चांना पूर्ण विराम दिला होता. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्याच वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा सुरू झाल्या आहेत. जयंत पाटील यांनी, 'माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका', अस सूचक वक्तव्य केल्याने या चर्चांना उत आला आहे.

Manikrao Kokate News : 'तर जनतेचा पैसा खर्च झाला असता', कोकाटेंना शिक्षेवर कोर्टाचं निरीक्षण

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील तुकाराम दिघोळे यांच्या मुलीची याचिका नाशिक सत्र न्यायालयानं फेटाळी. तसेच 2 वर्षाच्या शिक्षेला देखील न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे. या दरम्यान न्यायालयाने निरीक्षण नोंदवले असून त्याचीच आता चर्चा रंगली आहे. न्यायालयाने, कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र ठरले असते. यामुळे पोटनिवडणुक घ्यावी लागली असती, आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता, असे म्हटले आहे.

Sanjay Shirsat On Budget : निधी वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिंदेंच्या मंत्र्याचा इशारा, म्हणाला, "तर उद्रेक होईल"

राज्याचे बजेट नुकताच मांडण्यात आला असून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बजेटमध्ये विशेष स्थान देण्यात आले आहे. यानंतर आता निधी वाटपावरून महायुतीत धुसफूस समोर आली आहे. याच गोष्टीवरून शिवसेना नेते तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तर जाहीर पणे नाराजी व्यक्त केली आहे

Satish Bhosale LIVE : दुधाच्या दरातही 2 रुपयांची वाढ

महागाईचा चटका सर्वसामान्यांना सगळीकडे बसत असताना आता दुधाच्या दरातही 2 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. याबाबत दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरी येथे बैठकीत निर्णय झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com