उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी शुक्रवारी(ता.28 )शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मोठं भाष्य केलं. ते म्हणाले, होणार की नाही? याबाबत मोठं भाष्य केलं आहे.ते म्हणाले,मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितलं होतं की, सगळी सोंगं करता येतात,पण पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही.आज तारीख आहे 28 मार्च, मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो.31 मार्चच्या आत आपआपले पीक कर्जाचे पैसे भरण्याचं आवाहनही केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात दीक्षाभूमीसह रेशीमबागच्या स्मृतिमंदिर येथील डॉ. हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे ते दर्शन घेणार आहेत. संघाच्या शतकपूर्ती महोत्सवाच्या निमित्तानं 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये असणार आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सात उपायुक्तांसह बारा सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हे बदल्यांचे आदेश काढले आहेत.
आमचे सरकार आल्यापासून विकासाला वेग मिळाला आहे. मागील दहा वर्षात देशाचा जीडीपी दुप्पट झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत जो मागील 70 वर्षात जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून 11 व्या स्थानी होती. ती आमच्या काळात पहिल्या पाचमध्ये आली.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात (डीए) २% वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी (२८ मार्च) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये सरकारने त्यात ३% वाढ केली होती.
या वाढीमुळे, आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी महागाई भत्ता ५३% वरून ५५% पर्यंत वाढेल. याचा फायदा सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होईल.
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव मानत नव्हते, असे संभाजी भिडे म्हणाले होते. त्यावरून आंब्याचा सिझन आल्याने संभाजी भिडे बरळतोय, अशी टीका अमोल मिटकरींनी केली आहे. बहुजन समाजातील पोरांना हाताशी धरून इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. भिडे शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर व विकृत इतिहास लिहिणाऱ्यांवर का बोलत नाही, असा सवाल देखील मिटकरी यांनी केला.
कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर त्याने मुंबई पोलिसांसमोर चौकशीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. तो ३१ मार्च रोजी मुंबई पोलिसांसमोर येणार आहे. त्याला मद्रास हायकोर्टाने आजच अंतरिम जामीन मंजूर करत ७ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मद्रास हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्याला ७ एप्रिलपर्यंत अटक करू नये, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. कोर्टाने कामराला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बदलीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. कॉलेजियमने सरकारकडे याची शिफारस केली होती. त्यानुसार वर्मा यांना आता अलाहाबाद कोर्टात पदभार स्वीकारावा लागेल. ते यापूर्वी अलाहाबाद कोर्टातच कार्यरत होते. वर्मा यांच्या दिल्लीतील शासकीय घरात नोटांचे ढीग आढळून आले होते.
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर 'सौगात-ए-सत्ता', अशी टीका केल्यावर भाजप मंत्री नीतेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला हिंदुत्वाचं प्रमाणपत्र उद्धव ठाकरेंनी द्यायची गरज नाही. उद्धव ठाकरेंचा राजकीय धर्मांतर झालं आहे. आम्ही 'अजान'च्या स्पर्धा घेतल्या नाही. आम्ही आलो कि, 'अल्ला हू अकबर'च्या घोषणा दिल्या जातं नाहीत, तर 'जय श्रीराम', अशा घोषणा दिल्या जातात.
राज्यातील 560 गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे 25 कोटी 44 लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. जानेवारी , फेब्रुवारी व मार्च असे 3 महिन्याचे अनुदान आहे. गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रती दिन प्रती गाय 50 अनुदान दिले जाते. महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत लाभार्थी गोशाळांना अनुदान वितरीत करण्यात आले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर हल्ल्यावरून आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. आमदार रोहित पवार यांनी पडळकर यांना खोचक असं प्रत्युत्तर देत, महाराष्ट्रातील एखाद्या महत्त्वाचा व्यक्ती बोलला असता, तर मी उत्तर दिलं असतं. त्यांच्याकडे 'ईडी', 'सीबीआय', सर्वच तपास यंत्रणा आहे, त्यांनी तपास करावा, असं आव्हान रोहित पवार यांनी पडळकरांना दिलं आहे.
जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचे दर 88 हजारावर असताना आज हाच दर पंधराशे रुपये वाढला असून 89 हजार 300 रूपयांवर सोनं पोचलं आहे. गेल्या हेच दर जीएसटीसह 92 हजारपर्यंत गेल्याने जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांचा काहीसा कमी प्रतिसाद दिसून येत आहे. सुवर्णनगरीमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत आहे. दोन एप्रिल रोजी ट्रारिफ रेट लागू होणार असल्याने सोन्याच्या दरात वाढ झाल्याची प्रतिक्रिया सुवर्ण व्यवसायिक यांनी दिली.
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास 17 महिन्यांनंतरही पूर्ण झालेला नाही. या प्रकरणाचा तपास आता कमलेश मीना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये परळी येथे झालेल्या पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास आता अतिरिक्त पोलिस अधीक्षक तथा केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी कमलेश मीना यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कमलेश मीना हे या प्रकरणातले आठवे तपास अधिकारी आहेत.
बीडच्या केज पोलिस ठाण्याबाहेर एका ऊसतोड कामगाराने पत्नीसोबत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पुष्पा ढाकणे आणि त्यांचे पती मोहन, असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे दोघे ऊसतोड कामगार आहेत. बाजीराव ढाकणे याने एक लाख 40 हजारांची फसवणूक केली आहे. या तक्रारीची दखल घेण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. याचा अंतिम रिपोर्ट येऊ द्या. त्यांच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये कंप्लेंट केली आहे. जोपर्यंत पोलिस अंतिम निर्णयावर येत नाही, तोपर्यंत माझ्यासारख्या लोकांनी बोलणं योग्य नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये 9 एप्रिल 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकर याच्यावर वकिलाने हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर न्यायालयात हा प्रकार झाला. प्रशांत कोरटकर याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला आज न्यायालयात आणण्यात आले होते. वकील अमित भोसले यांनी हा हल्ला केला असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शेतकऱ्यांसाठी निवडणुकीपूर्वी सुरु केलेली मुख्यमंत्री बळीराजा योजना सुरुच राहणार आहे. महावितरणला या योजनेसाठी निधी राज्य सरकारने वर्ग केला आहे.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणात आरोपी प्रशांत कोरटकरला आणखी पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी वकिलांनी कोरटकर पळाला असताना त्याच्यासोबत कोण होते, त्याने कोणती गाडी वापरली होती? त्याला आर्थिक मदत कोणी केली का? याचा तपास बाकी असल्याचे सांगितले आहे.
शिवेसना आमदार आमदार कृपाल तुमाने यांची रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच हा मतदारसंघ आपल्याकडेच राहील याचीही खबरदारी सेनेने घेतली असल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी (30 मार्च ) धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुढीपाडव्याच्यामुहूर्तावर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन फडणवीस घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे भाजपाकडून नियोजन सुरु आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी, तुळजाभवानी मंदीर शिखर, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास यासह अन्य मुद्यावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
वर्धा : वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय बॅाम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. त्यामुळे वर्धाचे पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत. जिल्हाधिकारी वर्धा यांना हा धमकीचा ईमेल आला आहे. यात कुठली इमारत उठवणार याची माहिती देण्यात आलेली नाही. सायबर पोलिस तपास करीत आहेत.
महाडमध्ये बिहार स्पेशल टास्क फोर्सने कारवाई केली असून एका नक्षलवाद्याला अटक केली आहे. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली असून या नक्षलवाद्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. तर तो बिहारमधील मोस्ट वाँटेड आरोपी आहे.
पुणे जिल्हा परिषदच्या तीन अधिकाऱ्यांवर लाज घेतल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बाबुराव पवार, उपअभियंता दत्तात्रय पठारे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लाज घेतल्याप्रकरणी ही निलंबन करावी करण्यात आली असून तसा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता. या प्रस्तावानंतर आता निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. याआधी कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांच्यावर कारवाई झाली आहे.
जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात गुरुवारी (ता.27) चकमक उडाली. ज्यात तीन पोलीस जवान शहीद झालेत. तर सात जण जखमी झाले आहेत. या चकमकीत सुरक्षा दलांना तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज आत्महत्या केलेले शेतकरी कैलास नांगरे यांच्या मूळ गावी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेटीवर होते. या शेतकऱ्याने आत्महत्या करून दोन आठवडे झाले. मात्र अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांनी या परिवाराची सांत्वन पर भेट घेतली नाही. त्यामुळे अंबादास दानवे संताप्त झाले. सरकारला काही देणंघेणं नाही. कोणी मरो कुणी जगो, जिल्हाधिकारी त्यांच्या मस्तीत मश्गूल आहेत. त्यांची मस्ती जनता जिरवल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती असून सकाळी आठ वाजल्यापासून ते तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देणार आहेत. माळेगाव येथे शेतकरी मेळावा होणार असून या मेळाव्यात ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांची बदली करण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, या मागणीवर विचार करण्याचे आश्वासन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी विविध बार असोसिएशनच्या प्रतिनिधींना दिले आहे. वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीत जळालेल्या नोटा सापडल्याचा आरोप झाला होता.
जे विद्यार्थी नियमित वर्गामध्ये जाणार नाहीत, त्यांना येथून पुढे वी 12 वी बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. याबाबत उपनियमांत बदल करण्यावर विचार केला जात असून अशा विद्यार्थ्यांना एनआयओएसची परीक्षा द्यावी लागणार आहे.
शिवरायांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणमधून सोमवारी ताब्यात घेतले होते. त्यावेळी न्यायालयाने कोरटकरची तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ही पोलिस कोठडी आज संपणार असून मोठ्या पोलिस बंदोबस्तात त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यामुळे पुन्हा त्याच्याबाबत न्यायालय कोणता निर्णय घेतं याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.
प्रसिद्ध स्टँडप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष विडंबन गीत म्हटलं होतं. त्यामुळे तो अडचणीत आला आहे. त्याला दोन समन्स बजावण्यात आले आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये कुणाल कामराला सरकारविरोधात कंटेटचा प्रचार करण्याकरता टेरर फंडिंग झाल्याचा आरोप केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.