

Narmada water issue resolved in Maharashtra: नर्मदा नदीच्या पाणी वाटपाबाबत गेल्या दोन दशकांपासून रखडलेला महत्त्वाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्राला नर्मदा प्रकल्पातून 10 TMC पाणी देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तसेच केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील उपस्थित होते. बैठकीत नर्मदा प्रकल्पाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली आणि अनेक मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला आतापर्यंत प्रामुख्याने वीजेचा लाभ मिळाला होता. मात्र, राज्याच्या वाट्याचे 10 TMC पाणी अनेक वर्षांपासून मिळाले नव्हते. आता या प्रश्नावर तोडगा निघाल्याने राज्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्राने आपल्या वाट्यातील 10 TMC पाण्यापैकी 5 TMC पाणी नर्मदा-तापी डायव्हर्जन योजनेतून आणि उर्वरित 5 TMC पाणी उकाई धरणातून मिळावे, अशी मागणी केली होती. या मागणीबाबतही बैठकीत अनुकूल भूमिका घेण्यात आली. विशेषतः पावसाळ्याच्या काळात उकाई धरणात पुरेसे पाणी उपलब्ध असताना महाराष्ट्राला पाणी उचलण्यास गुजरातने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या प्रस्तावाला केंद्र सरकारचीही मान्यता मिळाली आहे.
याशिवाय नर्मदा प्रकल्पाशी संबंधित आर्थिक देयकांच्या मुद्द्यावरही निर्णय झाला. महाराष्ट्रावर असलेली बहुतांश देय रक्कम रद्द करण्यात आली असून आता केवळ 27 कोटी इतकीच रक्कम देणे बाकी राहणार आहे.
दरम्यान, अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या आढावा बैठकीत पीएम कुसुम योजनेअंतर्गत महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक म्हणजे 51 टक्के निधी मिळाल्याची माहिती देण्यात आली. भविष्यातही या योजनेसह प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत राज्याला अधिक सहकार्य मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.