Maharashtra Live Update : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मांजरीत येणार

Marathi Breaking Live Headlines Updates : NIA कडून देशभरात छापेमारी सुरू करण्यात आली आहे. सायबर दहशतवाद प्रकरणात NIA ने 5 राज्यांत छापे मारले आहेत, यासह आज दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

 राहुल गांधी मांजरीत येणार

काँग्रेस नेते राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. आज संध्याकाळपर्यंत राहुल गांधीचा दौरा ठरू शकतो. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष (आदीवासी विभाग) विक्रांत भुरिया यांनी ही माहिती दिली. राहुल गांधी यांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या होत्या.

सेवानिवृत्तीनंतर पुढील महिन्यापासून निवृत्ती वेतन सुरु करणे शक्य होणार

‘महा eHRMS’ प्रणालीद्वारे सेवा विषयक संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पुढील महिन्यापासून निवृत्ती वेतन सुरु करणे शक्य होणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव प्रशांत बडगिरी यांनी सांगितले.

आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

मांजरी येथे आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यानंतर आता विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत.

आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतली आमदार, खासदारांची बैठक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आणल्यानंतर आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी आदिवासी भागातील आमदार, खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा झाली.

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सोलापूर प्रशासन ॲक्शन मोडवर

  • साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सोलापुरात पुरवठा विभागाकडून तपासणी पथकाची नियुक्ती

  • हे पथक सुपर शॉपी, मार्केट यार्डातील मोठे व्यापारी, नोंदणीकृत रिटेलर्स यांच्याकडील साखर साठ्याची करणार तपासणी

  • जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशाने 3 सदस्य असलेले एकूण 15 पथकं स्थापन

  • देशभरात वाढलेल्या साखरेच्या किमतीनंतर सोलापूर जिल्हा पुरवठा विभागाकडून उपाययोजना

  • व्यापाऱ्यांनी शासनाच्या वेबसाईटवर नोंदवलेला साठा आणि प्रत्यक्ष साठा याची तपासणी हे पथक करणार

  • शहर आणि जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांच्या आदेशाने पथकांची नियुक्ती

आदिवासी विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण सुरूच; 13 दिवस उलटूनही सरकारचं दुर्लक्ष?

मांजरी इथल्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. सरकारनं 2011 मध्ये घेतलेला शासन निर्णय लागू करण्यासह विविध 40 मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येतंय. सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप विद्यार्थी करतायत.

Sambhajinagar Rada संभाजीनगर महापालिका सभेत पुन्हा गोंधळ! MIM नगरसेवक आक्रमक 

संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज पुन्हा गोंधळ झाला. ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा होत नसल्याचा आरोप MIM नगरसेवकांनी केला. नगरसेवकांचे विषय चर्चेला घेतले जात नाहीत आणि दर महिन्याला सभा होत नसल्याचेही त्यांनी म्हटले. MIM नगरसेवक डायससमोर येऊन आरडाओरड करू लागले. सत्ताधारी नगरसेवकांनीही हातवारे केल्याने गोंधळ वाढला. शाळकरी मुले सभा पाहण्यासाठी आली असल्याने महापौरांनी शांत राहण्याचे आवाहन केले.

शिक्षण घेतलं, पण नोकरी मिळतेय फक्त 8.25% तरुणांना; नीती आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव

नीती आयोगाच्या ‘रीइमेजिनिंग स्किलिंग फॉर विकसित भारत’ अहवालातून देशातील शिक्षण व्यवस्थेतील मोठी दरी समोर आली आहे. दरवर्षी पदवी घेणाऱ्या तरुणांपैकी केवळ 8.25 टक्के जणांनाच त्यांच्या शिक्षणाशी संबंधित नोकरी मिळते. शिक्षण आणि उद्योगांच्या गरजांमध्ये तफावत असल्याने रोजगाराच्या संधी कमी होत असून सरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धा वाढत आहे.

राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर; त्र्यंबकेश्वर दर्शनाची शक्यता

काँग्रेस नेते राहुल गांधी 2 सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. काँग्रेसच्या राज्यस्तरीय संघटन सृजन अभियानाच्या समारोपासाठी त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राहुल गांधी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून विशेष नियोजन आणि तयारी सुरू करण्यात आली आहे.

Mahayuti Mahamandal : महायुतीचे पुढील 15 दिवसांत सर्व महामंडळांचे वाटप पूर्ण होणार

राज्यभरातील राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेल्या महायुतीच्या महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील 15 दिवसांत सर्व महामंडळांचे वाटप पूर्ण होणार आहे. महामंडळ वाटपाचा अंतिम आराखडा तयार झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Ahilyanagar Big News : अहिल्यानगर-मनमाड रस्त्याच्या कामासाठी "चला नागडे" आंदोलन; सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या आंदोलनाची चर्चा

अहिल्यानगर-मनमाड महामार्गाची झालेली दुरावस्था आणि रखडलेल्या कामाबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी लक्षवेधी आंदोलन सुरू केले आहे. सावळीविहीर फाटा ते अहिल्यानगर असा 110 किलोमीटरचा अर्धनग्न पायी प्रवास करत, काळे शासनाला साकडे घालणार आहेत. संजय काळे यांनी रस्त्यासाठी सुरू केलेलं "चला नागडे" आंदोलन लक्षवेधी ठरत आहे. विविध संघटनांसह आता सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन सुरू केल्याने अहिल्यानगर-मनमाड महामार्ग पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

जळगावात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात आज संध्याकाळी विचित्र अपघात झाला. विरुद्ध दिशेने अचानक बोलेरो वाहन आल्याने घाबरलेल्या दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचे नियंत्रण सुटून ते टँकरखाली आलेत. यात वरुण विजय सुरवाडे याचा मृत्यू झाला, तर पवन अनिल अडकमोल हा गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

महापौर अन् शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये खडाजंगी

मुंबई महापालिकेतील भाजपमधील अंतर्गत वाद आता उफाळून आला आहे. नगरसेवकांमधील मतभेद आणि गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या बैठकीतच महापौर रितू तावडे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांचा महाजन यांच्यावर गंभीर आरोप

कुंभमेळ्याच्या कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. या कामांमध्ये टोकाचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे सिंहासत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस नेते सपकाळ यांनी केले. कुंभमेळ्याच्या कामांवर आता न्यायालयानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे कुंभमेळा मंत्री महाजन यांनी या प्रश्नावर प्रायश्चित्त घेतले पाहिजे. दुसरा पर्यायच नाही असे सपकाळ म्हणाले.

समृद्धी महामार्गावर भरधाव वाहनासमोर उडी घेत तरुणाची आत्महत्या

वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळ समृद्धी महामार्गावर एका ३० वर्षीय तरुणाने भरधाव वाहनासमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उमेश काकडे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्रासह 5 राज्यात NIA कडून छापेमारी

NIA कडून देशभरात छापेमारी सुरू करण्यात आली आहे. सायबर दहशतवाद प्रकरणात NIA ने 5 राज्यांत छापे मारले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, बिहार आणि दिल्लीचा समावेश आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान केंद्र सरकारच्या 54 वेबसाइट्सवर DDOS हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com