

देशभरात सध्या NEET परीक्षेचा पेपरफुटीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.लाखो पालक आणि विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी शिवराज मोटेगावकर याच्यासह 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षेची तारीखही जाहीर झाली आहे. अशातच आता आणखी एक मोठी घडामोड समोर येत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांच्यामार्फत सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल करण्यात आल्याचं समोर येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या याचिकेत राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ऐवजी पर्यायी स्वतंत्र यंत्रणेद्वारे NEET परीक्षा घेण्याची मागणी करण्यात केली आहे.
पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ट्विटमध्ये त्या म्हणतात, पुण्यातील कात्रज-नवले पूल मार्गावर राजमाता भुयारी मार्गाच्या परिसरात एका व्यक्तीला कोयत्याने जबर मारहाण करीत वरुन खाली ढकलून दिल्याचा व्हिडिओ पाहिला. अशा घटना राजरोसपणे, दिवसाढवळ्या भररस्त्यात होत आहेत. याचाच अर्थ गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. माझी राज्याच्या गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण या घटनांची नोंद घेऊन गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत.
लातूरमध्ये शिवराज मोटेगावकरची कोट्यावधीची मालमत्ता आहे. अनेक बांधकाम अवैध असल्याचा आरोप मनसेने केलाय. खाजगी क्लासेस परिसरात तब्बल 5 ते 6 मजली टोलेगंज इमारती आहे. खोपेगाव शिवारात, पाच एकरात 5 मजली इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. या ठिकाणी वैद्यकीय कॉलेज उभारणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान ही इमारत अनधिकृतपणे उभारली असल्याचा गंभीर आरोप मनसेने केलाय.
बुलढाण्यात मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झालीये. चिखलीत पेट्रोल पंपावर 2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याय. 166 पैकी मोजकेच पेट्रोल पंप सुरू आहे. डिझेलसाठी ट्रॅक्टर-ट्रक चालकांची रात्रभर प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातवरण आहे.
गरज नसलेल्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी लढा तीव्र करण्यात येणार असून 9 जूनला कोल्हापुरात महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिलीय. संघर्ष करणार, जेलमध्ये जाणार पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा इशाराही सतेज पाटील यांनी दिलीय.
नीट पेपर फुटीसाठी शिवराज मोटेगावकर याने सुनियोजित कट रचल्याचे पुढे आले आहे. सुरुवातीला त्याने त्याच्या क्लासमध्ये काम करणाऱ्या पी. व्ही. कुलकर्णीची एनटीएच्या प्रश्नपत्रिका सेट करण्याच्या पॅनेलवर वर्णी लावून घेतली होती. तसेच, मनिषा मांढरे यांच्या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली असून २५ वर्षे एकाच विषयाचे काम केल्यामुळे तिची स्मरणशक्ती चांगली होती. तिने सर्व प्रश्न तोंडपाठ केले होते.
नीतेश राणे यांनी आमचे कडू बोल गोड मानून घ्यावेत. देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन होऊ शकतं, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशिवाय राज्याला पर्याय आहे का, असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
कोकण विधान परिषद मतदारसंघात आम्ही ३०० चा टप्पा गाठतोय, आमच्यानंतर भारतीय जनता पक्ष आहे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यामुळे कोकणची जागा आम्हाला मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे. पण महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिघे मिळून निर्णय घेतील, असे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी रोहयो मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे इच्छूक आहेत, त्यामुळे रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेची जागा शिवसेनेला सुटावी, यासाठी गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आता हा मतदारसंघ शिवसेनेला सुटणार का हे पाहावे लागणार आहे.
नीट पेपर फुटीप्रकरणी सीबीआयने नागपुरातील नीट परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थिनीच्या घराची झाडाझडती घेतली आहे. दिल्लीचे सीबीआय पथकाने ही कारवाई केली आहे. या दोन्ही विद्यार्थिनींना नीटच्या पेपरच्या आधीच पेपर मिळाला होता, त्यामुळे त्यांची दिल्लीतील सीबीआय पथकाने त्यांची चौकशी केली आहे.
विधान परिषद निवडणुकीची आचारसंहितेचे कारण सांगून सरकारने कर्जमाफी करण्यास टाळाटाळ केल्यास आम्ही गप्प बसणार नाही. शेतकरी या निवडणुकीतील मतदार नाहीत, त्यामुळे त्यांना प्रलोभन दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. आचारसंहितेचे कारण सांगून कर्जमाफीची ३० जून ही तारीख पुढे ढकलली तर राज्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
हिंगोलीत इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी धोरणांविरोधात उग्र आंदोलन करत थेट पुतळा जाळला आहे. पोलिसांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
नमाज पठण करायचे असेल, तर तुम्ही त्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये नमाज अदा करा. प्रेमाने सांगून तर ऐकलं नाही, तर मग दुसरा मार्ग अवलंबा, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन डिएगो शहरातून एक मोठी घटना समोर आली आहे. इथल्या एका मशिदीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन अल्पवयीन संशयित हल्लेखोरांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या क्रूर घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासानंतर स्थानिक पोलिसांनी हा 'हेट क्राईम' असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
बनावट जीएसटी बिले तयार करून सुमारे 40 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई जीएसटी विभागाकडून अमित उपाध्याय याला अटक करण्यात आली आहे. अमित उपाध्याय हा 8 पेक्षा अधिक कंपन्यांचा संचालक असून, बनावट कागदपत्रे आणि खोट्या व्यवहारांच्या आधारे सुमारे 40 कोटी रुपयांचा जीएसटी रिटर्न मिळवल्याचा आरोप आहे.
लातूरमधील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’ संचालक शिवराज मोटेगावकर याला पेपरफुटी प्रकरणी CBIने अटक केली. नीट पेपरफुटी देशभरात संतपाची लाट आहे, आज अकोल्यात मोटेगावकर याच्या क्लाससमोर संभाजी ब्रिगेडने आंदोलन करत RCC बॅनरवर शेण फेकत निषेध व्यक्त केला. अकोला शहरातील RCC मोटेगावकर कोचिंग क्लाससमोर काल मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत क्लासच्या बोर्डाला काळे फासले होते.
पालघर -धानिवरी इथल्या अपघातातील मयतांच्या मृतदेहांवर आज बापूगाव इथं एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे. 12 मृतदेहांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कारावेळी मयताच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे अंत्यसंस्काराला उपस्थितीत राहणार आहेत. सरकारने अपघातातील मयतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. या अपघातात अनेक कुटुंबाचे प्रमुख गेल्याने सरकारकडून दहा लाखांवर मदत करावी, अशी मागणी आमदार विनोद निकोले यांनी केली आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असणाऱ्या प्रा. शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या RCC कोचिंग क्लासवर मनसेच्यावतीने अंडे फेकत निषेध करण्यात आला. या वेळी आंदोलन करते आणि पोलिसांमध्ये धरपकडे देखील झाली, आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत, कडक कारवाईची मागणी केली आहे. आंदोलनकांना पोलिसांनी या वेळी ताब्यात घेतले.
बीडच्या अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा आज सकाळी काळवीट साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
महागाईच्या वाढत्या प्रश्नावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुका संपताच सरकारने सर्वसामान्यांवर आर्थिक भार टाकल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जनतेला महागाईच्या संकटात सोडून पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेल्याचा घणाघातही राऊत यांनी केला.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकांसाठी मोठी तयारी सुरू केली आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर लवकरच पक्षासाठी सल्लागार म्हणून काम पाहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासोबत त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका झाल्या असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 जूनपासून नवीन रणनीतीवर काम सुरू होण्याची शक्यता आहे.
पुण्यात NEET पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून एस. पी. कॉलेजसमोर तिरडी आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
देशभर चर्चेत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला अटक झाल्यानंतर पुण्यातील डेक्कन परिसरातील मोटेगावकर क्लासेस बंद करण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या क्लासेसमध्ये सध्या कोणतीही हालचाल दिसत नाही. ठिकाणी विद्यार्थी किंवा कर्मचारी नसल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात इंधन संकट अधिक गंभीर बनले आहे. अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. वाहनधारकांच्या लांब रांगांमुळे वाहतुकीवर परिणाम होत असून रोजच्या कामकाजातही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
देशभरातील औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट संघटना आता ऑनलाइन औषध विक्रीविरोधात उघडपणे आक्रमक झाल्या आहेत. उद्या या औषधविक्रेत्यांनी एकदिवसीय राष्ट्रव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे. लाखो मेडिकल दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलनात्मक बंद आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील सुमारे 12 लाख 50 औषध दुकानदार या संपात सहभागी होऊ शकतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील स्थानिक केमिस्ट संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. काही राज्यांमध्ये सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.