

Mumabai News : राज्यातील राज्यसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर आता लवकरच विधानपरिषदेच्या नऊ जागेसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या नऊ जागेंची मुदत 13 मे 2026 ला संपणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यासाठी महायुतीमधील तीनही पक्षात जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता नऊपैकी भाजपच्या वाट्याला पाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच आतापासूनच एकनाथ शिंदेंच्या (Eknath shinde) शिवसेनेत दोन जागांसाठी जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मुदत संपत असल्याने त्यांच्यासह 'ही' पाच नावे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे राज्यसभेप्रमाणे पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला जाणार का? याची उत्सुकता लागली आहे.
विधानपरिषदेतून रिक्त होत असलेल्या जागेसाठी विधानसभेतील आमदारातून निवडून द्यावयाचे आहेत. त्यामुळे येत्या काळात या नऊ जागेसाठी महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे. कार्यकाळ संपत असलेल्या नऊ आमदारांमध्ये भाजपचे चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर काँग्रेसचा एक सदस्य निवृत्त होणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena) उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे डॉ. नीलम गोऱ्हे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे अमोल मिटकरी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर हे सदस्य निवृत्त होत आहेत. या नऊ पैकी सहा सदस्यांनी जवळपास सहा वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. तर भाजपच्या तीन सदस्यांना साधारण दीडच वर्ष या पदावर काम करता आले आहे.
विधानसभेतील संख्याबळ पाहता एक आमदार निवडून येण्यासाठी २८ आमदारांची गरज आहे. त्यानुसार भाजपचे पाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर महाविकास आघाडीचा एक सदस्य निवडून येऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एप्रिल महिन्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजपमधील माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, प्रवक्ते केशव उपाध्ये, माधवी वैद्य यांच्या नावाची चर्चा आहे. ही चार नावे चर्चेत आहेत.
शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. त्यानुसार विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मुदत संपत आहे. त्यामुळे गोऱ्हे यांच्यासोबत मुंबईतील शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे, शायना एनसी, माजी खासदार आनंद अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक अशी पाच जणांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये एक महिलेला संधी दिली जाऊ शकते.
पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब
दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीवेळी कोणाच्या ध्यानीमनी नसलेल्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना अचानक खासदारकीची संधी देत पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला होता. त्याच प्रमाणे विधानपरिषद निवडणुकीसाठी पुन्हा एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला तर अचानक एखादे नवे नाव समोर येऊ शकते.