Maharashtra Politics Live Update : रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये उद्या बंद

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबई, पुणे, कोकणासह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान विभागाकडून 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा, यासह आज दिनांक 5 जुलै रोजीच्या राज्यातील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

​रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेला 'ऑरेंज अलर्ट' लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, सोमवार दिनांक ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

भारतीय हवामान खात्याने सोमवारी मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेकडून खबरदारी म्हणून आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये उद्या बंद

रायगड जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालये उद्या बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तसेच अंगणवाड्याना उद्या ६ जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा हाय अलर्ट दिला आहे. या काळात जिल्ह्यात अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना 6 जुलै रोजी सुट्टी जाहीर

भारतीय हवामान विभागाने ६ जुलै २०२६ रोजी पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर सध्या जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यासह वसई विरार शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना 6 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेनेचे सात नगरसेवक राष्ट्रवादी प्रवेशाच्या उंबरठ्यावर

माजी आमदार किशोर दराडे आणि कुणाल दराडे यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेल्या शिवसेनेच्या ७ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेतली. भविष्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात काम करण्याचे सूतोवाच या नगरसेवकांनी केले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत पराभव पत्काराव्या लागलेल्या दराडे यांना हा धक्का मानला जात आहे.

पैशासाठी मला इकडं तिकडं जाण्यात रस नाही : आमदार धीरज लिंगाडे

अमरावती पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी खासदार संजय राऊत यांच्या विधानाचा इन्कार केला आहे. मला शिंदेसेनेकडून २० कोटी रुपयांची ऑफर आली, हे चुकीचे स्टेटमेंट राऊत यांनी केले आहे. मला अशी कोणतीही ऑफर आलेली नाही. पैशासाठी किंवा इतर कारणांसाठी मी कुठंही इकडं तिकडं जाणार नाही. मला अमरावती विभागातील पदवीधरांनी निवडून दिले आहे, त्यांच्या दृष्टीने सध्या काम सुरू आहे, त्यामुळे मी माझ्या कामावर समाधानी आहे. पैशासाठी मला इकडं तिकडं जाण्यात रस नाही, असे लिंगाडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘रामरक्षा’वरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला; आमची एवढीच अपेक्षा होती की त्यांना राम आठवले पाहिजेत

उद्धव ठाकरे यांना राम आठवले, याचा मला आनंद आहे. आमची एवढीच अपेक्षा होती की, त्यांना राम आठवले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या रामरक्षा कार्यक्रमावर दिली.

महाविकास आघाडीतील अनेक लोकं आमच्या संपर्कात : उदय सामंत

महाविकास आघाडीतील अनेक लोकं आमच्या संपर्कात आहेत. त्याच्यामध्ये सर्व पक्ष आले, असे सूचक विधान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

न्यायालयीन कामात ‘एआय’ वापरा, पण त्याचे गुलाम बनू नका : भूषण गवई

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सामान्य लोक न्यायापासून वंचित राहू नयेत; म्हणून न्याय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सुरू झाला. मात्र, न्यायाधीश व वकिलांनी ‘एआय’वर पूर्णपणे विसंबून राहू नये. त्याचे गुलाम न बनता, त्याला आपले गुलाम बनवा. ‘एआय’मुळे कोणाच्या गोपनीयतेचा अधिकार भंग होणार नाही, याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन भारताचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

सुरक्षेच्या कारणास्तव रायगड जिल्ह्यातील तीन पर्यटनस्थळं पर्यटकांसाठी बंद

सुरक्षेच्या कारणास्तव रायगड जिल्ह्यातील देवकुंड, ताम्हिणी घाट आणि सिक्रेट पॉईंट ही पर्यटनस्थळं पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. पावसाळी हंगामात या ठिकाणी होणारी गर्दी आणि धोका लक्षात घेऊन माणगाव उपविभागीय प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

MP Sanjay Jadhav news : शेतकरी संवाद मेळावा तात्पुरता स्थगित 

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेला शेतकरी संवाद मेळावा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील दोन दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिल्याने दिनांक ७ जुलै रोजी परभणी येथे आयोजित शेतकरी संवाद मेळावा तात्पुरता स्थगित करण्यात आला असल्याची माहिती जाधव यांनी दिली.

Uddhav Thackeray : रामरक्षा आंदोलन ही पावसात पेटलेली ठिणगी

रामरक्षा आंदोलन ही पावसात पेटलेली ठिणगी आहे. कष्टाच्या पैशाचं दान तुम्ही गायब करता, लाज वाटली पाहिजे. आम्ही हिंदू भोळे आहोत पण मूर्ख नाही, असे उद्धव ठाकरे दादरमधील रामरक्षा आंदोलनवेळी म्हणाले. शिवसेनेला संपविण्याचा अफजलखानी विडा त्यांनी उचलला आहे. आमचा बाण चोरला असला तरी लंका जाळलेली मशाल आमच्याकडे आहे. नको ती लोकं सत्ता भोगत आहेत, अशी टीकाही ठाकरेंनी केले.

Mumbai news : भरपावसात SIR चे काम सुरूच, अश्विनी भिडेही मैदानात

मुंबईत भरपावसात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(SIR) – २०२६ साठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मरीन लाईन आणि चिराबाजार परिसरातील मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन भेट दिली. यावेळी त्यांनी मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण तसेच बीएलओंच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच, मतदारांशी देखील संवाद साधला.

मुंबईमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू

मुंबईमध्ये झाड कोसळून आता आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरे कॉलनीत झाड कोसळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. झाड कोसळल्यामुळे मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे.

उद्धव ठाकरेंना राम आठवले याचा आनंद - फडणवीस

 राम मंदिरातील चोरीच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून 'रामरक्षा आंदोलन' करण्यात आलं. उद्धव ठाकरेंच्या या आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धवजींना राम आठवले याचा मला आनंद आहे. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहिजे. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. राम मार्गाने चालले तर त्यांचे भलं होईल. केवळ आजच्या पुरतेच नाही तर त्यांनी रोज रामरक्षा म्हणावी," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

Amravati News : अमरावतीत खळबळ; बाबासाहेब आंबेडकर स्मारक जागेसाठी शेषनाग गजभिये यांचं 'जिवंत समाधी' आंदोलन...

अमरावतीच्या इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील स्मारकाच्या जागेसाठी शेषनाग गजभिये यांनी 'जिवंत समाधी' आंदोलन सुरू केले आहे. गजभिये यांनी संपूर्ण शरीर जमिनीच्या आतमध्ये गाडून घेतलं आहे. या आंदोलनामुळे इर्विन चौक परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई या देखील स्वतः घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. घटनास्थळी पोलीस प्रशासनाकडून आंदोलन मागे घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

पालखी सोहळ्यातील वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत श्री. तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात देहू, आळंदी ते पंढरपूर दरम्यान दोन्ही पालखी मार्गावर प्रवासी, जड वाहने मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या वाहनांतील तांत्रिक दोषांमुळे अपघात होऊ नयेत, रस्त्यात बंद पडून ती वाहतूकीस अडथळा होऊ नये, याकरिता सर्व वाहनांची तपासणी प्रादेशिक परिवहन, पुणे कार्यालयाच्या आळंदी रोड चाचणी मैदान व दिवे येथील टेस्ट ट्रॅक येथील कार्यालयात वाहनांची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे.

वरंध घाटात दरड कोसळले

भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. उंबर्डे गावच्या फाटा ते वाघजाई देवी मंदीर दरम्यान ही दरड कोसळली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Election : छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी बँकेवर महायुतीचा विजयाचा झेंडा; काँग्रेसचे काळे अन् शिवसेना ठाकरे पक्षाचे दानवेंचाही विजय

'छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक' निवडणुकीत महायुतीने विरोधकांना धूळ चारत ऐतिहासिक विजयाचा झेंडा फडकवला आहे. बँकेच्या एकूण जागांपैकी बहुतांश जागांवर महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंद शिवसेना आणि आणि भाजपच्या 8 उमेदवारांना बिनविरोध निवडून आणले होते. त्यानंतर उर्वरित 12 जागांसाठी मतदान झाले. या 12 पैकी तब्बल 11 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांपैकी केवळ काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या व्यतिरिक्त एकाही उमेदवाराला विजय मिळवता आलेला नाही. शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विजय मिळवला आहे.

Gadchiroli News : गडचिरोलीत बनावट भरती जाहिरातीनंतर आता थेट बनावट नियुक्ती आदेशाचा धक्कादायक प्रकार उघड

गडचिरोली जिल्ह्यात बनावट कागदपत्रांचे रॅकेट दिवसेंदिवस अधिक सक्रिय होत असल्याचे चित्र समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळांमधील शिपाई पदभरतीची बनावट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता त्याच प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासा झाला असून, एका उमेदवाराला जिल्हा परिषदेच्या नावाने बनावट नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे उघड झाले आहे. या बनावट आदेशामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी, शिक्के आणि अधिकृत कार्यालयीन नमुन्याची हुबेहूब नक्कल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून संबंधितांविरोधात गडचिरोली पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Sachin Ahir : सुषमा अंधारे यांच्यासारख्या नेत्यांचे शिवसेना ठाकरे पक्षात  राजकीय भविष्य काय? सचिन आहेर म्हणाले.....

सुषमा अंधारे यांच्या कामाचा गौरव आणि त्यांच्या उपेक्षेवर बोलताना सचिन अहिर म्हणाले, "2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार जात असताना, दुसऱ्याच दिवशी सुषमा ताईंचा फोन आला होता. तिसऱ्या दिवशी मी त्यांना 'मातोश्री'वर घेऊन गेलो. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, 'मला काही नको, पण अशा कठीण प्रसंगी मी पक्षासोबत उभी राहीन.' गेल्या चार वर्षांत त्यांनी पक्षासाठी काय केले नाही? लोकसभेपासून ते विधानसभेच्या 100 पेक्षा जास्त सभा घेतल्या . एक डॅशिंग प्रवक्त्या म्हणून त्यांनी भ्रष्टाचाराचे असे अनेक विषय सभागृहाबाहेर लावून धरले, ज्यावर कोणीही बोलायला तयार नव्हते. पण आज जेव्हा विधान परिषदेची वेळ आली, तेव्हा पक्ष त्यांच्या नावाचा विचारच करत नाही."

Mumbai Crime : ओरोस येथे दीड कोटींच्या गोवा बनावटीच्या दारूसह ट्रक जप्त; एलसीबीची मध्यरात्री धडक कारवाई

मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथे एलसीबीने मध्यरात्री धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूसह तब्बल सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत राजस्थानातील ट्रक चालक विरेंद्र गोविंद पटेल (उदयपूर, राजस्थान) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबी पथकाने ओरोस येथे यापूर्वी 30 लाख रूपयांचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर आज एक कोटी 50 लाख 30 हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदेंचा रुग्णालयातील मुक्काम वाढला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, त्यांना आणखी दोन दिवस रुग्णालयात थांबवे लागण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस

आज सकाळ पासूनच पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 05 मंडळांमध्ये 65 मिमी पेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली असून त्यामध्ये मुळशी तालुक्यात 01 व मावळ तालुक्यात 04 मंडळांचा समावेश आहे.

वडगाव मावळ – 172.5 मिमी

* लोणावळा – 219.5 मिमी

* शिवणे – 152.0 मिमी

* टाकवे खुर्द – 122.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

नितेश राणेंच्या विरोधात अजामीनपात्र वाॅरंट

मंत्री नितेश राणे यांना 2013 च्या टोलनाका तोडफोड प्रकरणात गोव्यातील न्यायावयाने अजामीनपात्र वाॅरंट बजावले आहे. शनिवारी झालेल्या सुनावनीला ते हजर नव्हते. त्यानंतर न्यायालयाने वाॅरंट जारी करण्याचे आदेश दिले होते.

जिल्हा बँक निवडणूक निकाल खासदार कल्याण काळे विजयी

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक 2026 मतमोजणी सुरूआहे, या निवडणुकीत गंगापूर सोसायटी मतदार संघातून छत्रपती संभाजीनगर सोसायटी मतदारसंघातून खासदार डॉ. कल्याण काळे २२ मतांनी विजयी झाले आहेत.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक 2026 मतमोजणी सुरू

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक 2026 मतमोजणी सुरू झाली आहे. गंगापूर सोसायटी मतदार संघातून शेषराव जाधव ६ मतांनी विजयी झाले आहेत. तर कन्नड सोसायटी मतदारसंघातून आमदार संजना जाधव ९८ पैकी ९८ मतं घेऊन विजयी झाले आहेत.

एकनाथ शिंदे  डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणखी एक दिवस आराम करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्याचा दिवसही हॉस्पिटलमध्ये राहण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, महापालिकेचं आवाहन

मुंबईसह ठाणे पालघर आणि कोकणातही जोरदार पाऊस पडत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान खात्यानं बृहन्मुंबई क्षेत्रात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.

मुलाच्या हत्येनंतर विशाल अग्रवाल यांना पितृशोक, लोहगड प्रकरणातील केतनच्या आजोबांचं निधन

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर Miss You Dad अशी पोस्ट शेअर करत आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे.

वरळी कोणाला आपला सातबारा आहे असं वाटत असेल तर आता तसं काही नाही - अहिर

भंडारी स्ट्रीट रेल्वे पादचारी पूल बंद; प्रवाशांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था

मध्य रेल्वेवरील मशीद रेल्वे स्थानकादरम्यानचा भंडारी स्ट्रीट आणि संत तुकाराम मार्ग यांना जोडणारा भंडारी पालिका रेल्वे पादचारी पूल धोकादायक बनल्यामुळे तातडीने प्रवाशांसाठी बंद करण्यात आला.

लोहगड किल्ला प्रकरणात मृत्यू झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांचे निधन

लोहगड किल्ला प्रकरणात मृत्यू झालेल्या केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद किसनलाल अग्रवाल यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे.नातवाच्या हत्येच्या धक्क्यातून ते सावरले नव्हते. त्यामुळे त्याच्या विरहातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान विभागाचा 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच हवामान खात्याने आजपासून पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गरज असेल तरच नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा दिला आहे. यामध्ये सातारा आणि पुण्याचाही समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com