पावसाळी अधिवेशनात अनेक आमदारांकडून प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामकाचा ढिगाळ आणि गलथानपणा समोर आणून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई शिक्षण विभागाच्या उपसंचालकांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर, आता आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर थेट विधिमंडळातून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विधानपरिषद सभागृहात आज नागपूरचे आमदार संदीप जोशी यांनी नागपूरच्या गुलशननगर येथील दि मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद शाळेबाबत लक्षवेधी उपस्थित केली. त्यावरुन, दिव्यांग आयुक्त प्रविण पुरी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, विधानसभा सभापती राम शिंदे यांनी तात्काळ निलंबनाचे आदेश देत आयुक्त प्रवीण पुरी यांच्यावर कारवाई केली .
मुंबई (Mumbai) महापालिकेने निविदा प्रसिद्ध करून महापालिकेच्या सफाई खात्यातील कामकाजाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याविरोधामध्ये निषेध करण्यासाठी आझाद मैदानावर उद्या सफाई कामगार मोर्चा काढणार आहेत. मुंबई महापालिकेतील 25 हजारापेक्षा अधिक सफाई कामगार आहेत. खासगीकरणामुळे त्यांना सरकारी सवलतींचा फायदा होणार नाही, असं मत कामगारांकडून व्यक्त केले जात आहे.
आषाढीवारीत राज्यभरातून आलेल्या भाविकांनी विठुरायाच्या चरणी तब्बल 10 कोटी 84 लाख रुपयांचे दान अर्पण केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीच्या उत्पन्नात 2 कोटी 35 लाख 49 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी धुळ्यात शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेने जलसमाधी घेण्याचा इशारा दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये केलेल्या वक्तव्याचे नांदेडमध्ये पडसाद उमटले. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर आंबेडकरवादी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीने आमदार पाटील यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले. या आंदोलनात आंबेडकरवादी संघटना तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आमदार हेमंत पाटील यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी आंबेडकरवादी संघटनांनी दिला.
राज्यात नवीन मद्य विक्री परवाने वितरणावरून विरोधक भाजप महायुती (Mahayuti) सरकारवर तुटून पडत असतानाच आता सामाजिक कार्यकर्तेही पुढे सरसावले आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारवर हल्ला चढवलाय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देताय त्याचं स्वागत आहे. पण त्यासाठी नवीन दारू विक्री परवाने देण्याची गरज नाही. एखाद्या महिन्यात पैसे नाही दिलेत, तरी बहिणी रागावणार नाहीत. पण त्यांचे संसार उद्धवस्त करू नका, अशी विनंती त्यांनी केली आहे.
चार महिन्यापूर्वी देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील तरुण शेतकरी (Farmers) कैलास नागरे यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील 14 गावांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळावं, या मागणीसाठी आत्महत्या केली होती. राज्यात गाजलेल्या या मुद्यावर नागरे यांच्या कुटुंबाच पालकत्व स्वीकारण्याची तयारी सरकारने दाखवली होती. पण चार महिने उलटूनही नागरे यांच्या कुटुंबाचे पालकत्व किंवा मुलांच शैक्षणिक पालकत्व सरकारने स्वीकारलं नाही. आज कैलास यांच्या पत्नी स्वाती आणि कुटुंबियांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह सरकारने आमच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारलं नाही, तर आम्ही बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला.
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्धव ठाकरेंना थेट खुली ऑफर दिली. 2029 पर्यंत विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही, त्यामुळे तुम्हीच आमच्याकडे या अशी ऑफर फडणवीस यांनी ठाकरेंना दिली. दरम्यान, कामकाजानंतर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली.
विधानभवनातील कामकाजानंतर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते.
शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे शिंदे गटाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. हेमंत गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याचं देखील बोललं जात होतं. शिवसेनेकडून दोन वेळा लोकसभेची उमेदवारी मिळून देखील गोडसे नाराज असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. अखेर हेमंत गोडसे यांनी स्वत: पुढे येत आपण नाराज असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच शिंदे गटात पक्षांतर्गत शिस्त नसल्याचंही म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ आज संपु्ष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत बुधवारी अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडत आहे. अंबादास दानवे ऑगस्ट 2019 मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या जागेवर अंबादास दानवे विजयी झाले होते. शिवसेनेत झालेल्या पक्ष फुटीनंतर ऑगस्ट 2022 मध्ये अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा पक्षाने दिली होती. ऑगस्ट 2025 मध्ये अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या आठवड्यात शुक्रवारी अधिवेशन पूर्ण होत असताना आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आहे.
परळीमधील महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज (16 जुलै) कुटुंबासमावेत पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडील दोन पेट्रोलच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ज्ञानेश्वरी मुंडे आणि पोलीस यांच्यात झटापट देखील झाली.बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येला तब्बल 18 महिने उलटले. मात्र अद्याप आरोपी अजूनही मोकाटच आहेत.
उच्च न्यायालयाचे कोल्हापूरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. याबाबतची महत्वाची बैठक आज मुंबईत होत आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी हे सर्किट बेंच उपयुक्त ठरणार आहे. यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ४० वर्षाच्या लढ्याला यश मिळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात लावण्यात आलेल्या एका फलकाने सगळ्याचे लक्ष वेधून घेतलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख विकणे आहे, असे त्यावर लिहिलं आहे. उबाठा ही अक्षरे उलटी करून छापण्यात आली असून, संपर्क राऊत यांच्याशी साधावा, असं लिहिलं आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात आमदारांच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे.
माझ्या स्वागतासाठी आलेल्या व्यक्तींमध्ये आरोपी लपले होते. मला मारण्याचा भाजपचा कट होता, असा आरोप संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपच्या पीआर एजन्सीने व्हिडिओ व्हायरल केला, असे गायकवाड म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेट बैठकीला सुरवात झाली आहे. दिल्लीत होत असलेल्या बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशनाचं नियोजन तसेच इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये केलेल्या मारहाणीच्या विरोधात आज विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. आपल्या पोशाखावर बनियन, चड्डी परिधान करुन जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, अंबादास दानवे यांनी गायकवाड यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
नाशिकच्या इगपूरमध्ये मनसेच्या सुरू असलेल्या शिबिराचा समारोप करण्यात आला. मनसेच्या प्रमुख नेत्यांसह सर्व पदाधिकारी परतीच्या मार्गावर आहेत. शिबिरात मनसेच्या सर्वच प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी आग्रह करण्यात आला आहे. तर, मात्र राज ठाकरेंकडून नेते, पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिलाय. युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेणार, राज यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना युती तसेच शिबिरात काय झालं यासंदर्भात माध्यमांशी न बोलण्याचे देखील राज ठाकरेंचे सर्व पदाधिकारांना आदेश दिले आहेत.
१४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं, असे राज ठाकरे यांनी सोशल मीडियातून सांगितले आहे. निवडणुकीच्या आधी युती करण्याबाबत आपण कुठलेही भाष्य न करता काही माध्यमांनी आपल्या तोंडी ते भाष्य घातल्याचे ठाकरे ते म्हणाले.
महानगरपालिकांवर सध्या प्रशासकांचे राज्य असले तरी अहिल्यानगर सारख्या पालिकेत रस्त्याच्या कामात 350 ते 400 कोटींचा भ्रष्टाचार लोकप्रतिनिधी,अधिकारी ठेकेदार मिळून केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. पालिक लुटून खात आहेत,त्यामुळे रस्ते आरोग्य या सारख्या सुविधा देखील जनतेला मिळत नाहीत, असे ट्विट करत मुख्यमंत्र्यांना कारवाईसाठी पत्र लिहिले असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.
शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर पालिकेच्या स्थापनेमुळे जुन्या शिरोळ मतदारसंघाची पुनर्रचना करून नवीन यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील मतदारसंघांची संख्या कायम असूनही, मतदारसंघाच्या तोडफोडीमुळे अनेक गावे इतर मतदारसंघांमध्ये समाविष्ट झाली आहेत. तालुक्यातील मतदारसंघात आरक्षण हा निर्णायक घटक ठरणार आहे. शिवसेना व भाजप यांच्यात निवडणुकीची लढत होण्याची शक्यता आहे.
कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत आज कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात झाली. तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे तर तीन ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे . अकरा ग्रामपंचायतींचे सरपंच पद मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे तर उर्वरित 24 ग्रामपंचायतीचे सरपंच पदे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे . मागास प्रवर्गासाठी असलेल्या 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांमधील पाच पद ही मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहेत. तर 24 खुला प्रवर्गापैकी बारा पद ही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत.
केसरीचे विश्वस्त संपादक व लोकमान्याचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी 8 ते 11 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार दुपारी बारानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शिवधर्म संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दीपक काटे गुन्हा दाखल झाला आहे. शाईफेकच्या निषेधार्थ सोमवारी (ता.21) सकल मराठा समाजाकडून अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.