
प्रकाश महाजन यांच्यावरील कोणत्याही प्रश्नाला मला उत्तर द्यायचे नाही. मी त्यांना महत्व देत नाही. मी त्यांना अनेक वर्षे ओळखतो. राजकारणात पडद्याआड गेलेल्या माणसाला माझ्यावर टीका करून त्यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती संधी मला त्यांना द्यायची नाही. संपलेल्या माणसाला मला नवसंजीवनी द्यायची नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार नाही. त्यांची इच्छा आहे ना. तुम्ही येऊ नका, ते जिथं असतील त्या ठिकाणी मी पोचेन. काय त्यांच्यात दम आहे ना, हे मी पाहीन, असे उत्तर नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. पक्षात फूट पडावी, असं आपल्याला कधी वाटत नव्हतं. पण पक्षात फूट पडली. काही मूलभूत विचारांमध्ये अंतर झालं, त्यामुळे ही पक्षातील ही फूट वाढली. त्याबाबत मी भाष्य करू इच्छित नाही. जे राहिले ते विचारांनी राहिले. उद्या जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा वेगळं चित्र पाहायला मिळेल, असा दावा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे.
आजही पहिला वर्धापन दिन आठवतो. अनेकांनी पक्षाला योगदान दिलं. आरआर आबांची, मधुकर पिचड यांची आठवण येते.. काही लोक सोडून गेले. एका ताटात जेवलो ते ते विसरले असतील. पण मी विसरले नाही, हे माझे संस्कार आहेत. एका साताऱ्याच्या फोटोने २०१९ मध्ये निवडणूक फिरवली होती. पक्षांची विचारधारा विसरता कामा नये. मंत्र्यांपेक्षा आमच्या खासदारांचे भाषण लोकसभेत भारी ठरते. देशात मोठा निर्णय घेतला जातो, तेव्हा राष्ट्रवादीचं मत घेतलं जातं. राजकारणात काम करताना पॉलिसी लेव्हलला काम केलं पाहिजे. पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे. हगवणे कुटुंबाच्या सुनेने हुंड्यामुळे आत्महत्या केली आहे. महाराष्ट्रात काय चाललंय. राजा जर विमानाने चालत असेल, तर त्याला प्रजाचं दुःख काय कळणार? असा सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्ह्यातील पाटणचे नेते विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या वेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार अतुल भोसले उपस्थित होते. पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाची गेली अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. ती आज अखेर प्रत्यक्षात उतरली आहे. पाटणकर यांचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.
आयुष्यात माणसं जोडण्याचं काम शरद पवार यांनी केले आहे. पवारांनी आता फक्त मार्गदर्शन करावे. फिल्डवर आता आपण लढू. नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची आहे. सर्वधर्म समभाव असा विचार पुढे घेऊन जायचा आहे. ‘ऑपरेश शिंदूर’नंतर जगात याबद्दल सांगण्यासाठी परदेशात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्यमंडळानं सर्वांत चांगलं काम केलं आहे. चर्चा अनेक होत आहेत. मात्र, संभ्रमात राहू नका. लढूया विजयश्री आपलीच आहे, असा दावा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा आग्रह केला आहे. त्यांना खासदार नीलेश लंके यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. ते म्हणाले, ‘जरा धीर धरा..काहींना लय घाई झालीय...थांबांना जरा आपला नेता आहे. आपलं वय नाही, तेवढं या नेत्याचं राजकीय वय आहे. आपल्या नेत्याला राजकारणातील सगळे फायदे-तोटे, सगळी गणितं माहिती आहेत आणि आपण त्यांना सल्ला द्यायला चाललो आहोत. आपण अंड्यात आहोत, जेव्हा आपण हाफ चड्डीत होतो, तेव्हा ते देशाच्या राजकारणात होते, असा टोलाही त्यांनी अजित पवारांसोबत चला म्हणणाऱ्या नेत्यांना लगावला.
सांगली जिल्ह्यातील विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव वैभव पाटील यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. चव्हाण यांनी वैभव पाटील यांचे स्वागत केले. वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला आहे, मी प्रकाश महाजन आहे. असे म्हणत त्यांनी राणेंच्या विरोधात पुन्हा शड्डू ठोकला. कुठं येऊ सांगा. तुम्हा काय धमक्या देता. कार्यकर्त्यांना सांगून फोनवरून मला धमक्या देताय. सांगा मी कणवलीत येतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यासमोर येतो. मला नारायण राणेंनी धमकी दिली, त्यांच्या विरोधात मी शड्डू ठोकतोय. मी राज ठाकरेंचा सैनिक आहे. मी भीणारा नाही, असे चॅलेंज प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांना दिले.
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे जयंत पाटील यांनी दिले संकेत
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले. जयंत पाटील यांनी नव्यांना संधी द्या, असं म्हणताच पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरामध्ये एकच गोंधळ उडाला. जयंत पाटील यांचे कार्यकर्ते नाही नाही म्हणत उठले. शेवटी पक्ष हा शरद पवारांचा आहे, त्यांनी मला खूप संधी दिली आहे, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे म्हणत जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होण्याचे संकेत दिले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.