
Nagpur News: यवतमाळ जिल्ह्यातील तीन बड्या राजकीय नेत्यांच्या घराणेशाहीला कंटाळून काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहे. यात आता प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस आणि बंजारा समाजाचे नेते देवानंद पवार यांची भर पडली आहे. याशिवाय बाजार समिती व स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले प्रवीण देशमुख यांनी हातावर घड्याळ बांधणार असल्याचे जाहीर केले आहे. जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेस पक्षासाठी मोठा झटका मानला जातो.
यवतमाळ जिल्ह्यात जेव्हा निवडणुका जाहीर होतात त्यावेळी सर्वप्रथम काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि माजी मंत्री वसंतराव पुरके यांचीच नावे पुढे येतात. त्यांच्याशिवाय दुसऱ्यांचा विचारच केला जात नाही. मला तिकीट द्या नाही तर मुलाला हीच मागणी त्यांची असते. मी आणि माझे कुटुंब एवढ्यापुरता या नेत्यांनी आपला पक्ष मर्यादित केला असल्याचा आरोप दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे आणि पुरके पराभूत झाले. शिवाजीराव मोघे यांच्या पुत्र जितेंद्र मोघे हेसुद्धा पराभूत झाले आहेत. संधीच मिळत नसल्याने अस्वस्थ असलेल्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. यापूर्वी उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे हेसुद्धा पक्ष सोडून गेले आहेत.
नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना देवानंद पवार यांच्यावर त्यांनी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी सोपवली होती. सर्व महत्त्वाचे निर्णय आणि पक्षाचे आदेश त्यांच्याच स्वाक्षरीने काढले जात होते. एकेकाही शिवाजीराम मोघे यांच्या कट्टर समर्थक म्हणूनही त्यांना ओळखले जात होते. मात्र मोघे कुटुंबीयांनी त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून ते काँग्रेसपासून दुरावले होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
शनिवारी (ता.२३) पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात कुणबी आणि बंजारा या समाजाचे प्राबल्य आहे. बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड हे शिवसेनेत आहेत. नाईक घराणे आता विखुरले आहेत. राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस तर माजी आमदार नीलय नाईक भाजपात आहे. मात्र भाजपकडे बंजारा समाजाची मान्यता असलेला लोकनेता नव्हता. देवानंद पवार यांच्या रूपाने तो आता गवसला आहे.
सहकार क्षेत्रातील प्रवीण देशमुख हे अनेक वर्षांपासून काँग्रेसचे धडाडीचे नेते म्हणून काम करीत होते. मात्र वरिष्ठांच्या घराणेशाही कंटाळून त्यांनी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी देशमुखांनी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या विरोधात केल्याची तक्रार केली होती. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष चंदू चौधरी यांच्यासह महापालिकेच्या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेले १० इच्छुक उमेदवारही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.