
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या नावाची आज अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. भाजपच्या महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशनामध्ये चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांनी हा पदभार स्वीकारला. चव्हाण हे भाजपचे १२ वे प्रदेशाध्यक्ष ठरले.
जलसंधारण विभागात लवकरच ८,७६७ पदांची भरती होणार आहे. या पदांना हाय पॉवर कमिटीने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत जलदारित्या राबविली जाईल, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत दिली. विभागाची स्वतंत्र निर्मिती झाली त्यावेळी १६,४९९ पदांचा आकृतीबंध मंजूर झाला होता. त्यातील ९,९६७ पदे कृषी विभागाकडून आणि ६,५१२ पदे जलसंपदा व ग्रामविकास विभागाकडून वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, कृषी विभागाकडून केवळ २,१८१ पदांचीच मंजुरी मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुण्यात दिवसाढवळ्या दरोड्याची घटना घडली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक मध्ये गजानन ज्वेलर्सवर हा दरोडा पडला. चार दरोडेखोर दुकानात घुसले आणि दुकानातील लोकांवर कोयत्याने वार केले. या घटनेत दुकान मालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. दिवसाढवळ्या हा दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना काँग्रेसने निलंबित केले होते. रामटेक विधानसभा मतदारसंघात त्यांनी बंडखोरी केली होती. आता त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. आज मुळक यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते.
शिरूरचे आमदार माऊली कटके यांनी मंगळवारी पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात मांडला. विधानसभेत बोलताना ते म्हणाले, पुणे महापालिकेत ३४ गावे समाविष्ट झाली असली तरी अद्याप या गावातील घरे बेकायदेशीर आहेत. त्यांचा टॅक्स आपण घेतो. तेथील नागरिकांची बांधकामे अधिकृत करावी, अशी विनंती कटके यांनी राज्य सरकारला केली.
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिवसभरासाठी निलंबित केले आहे. त्यावर आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून म्हटले आहे की, शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या बबन लोणीकरांनी माफी मागावी म्हणून विधानसभेत आवाज उठवणाऱ्या नानाभाऊ पटोले यांनाच निलंबित करण्याचा निर्णय म्हणजे चोर सोडून संन्याशाला शिक्षा देण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल. सरकारची ही हुकुमशाही महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.