पुण्यातील कोथरुड येथे पोलीसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला 'व्हॉट्सॲप'वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहा ऑगस्टपासून दिल्ली दौऱ्यावर असणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा तीन दिवसांचा असणार आहे. दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत देखील उद्धव ठाकरे सहभागी होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वर्धा रोडवरील घर बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी दोणारा व्यक्तीला सिव्हिल लाइन इथून पोलिसांनी अटक केली आहे. ही व्यक्ती मानसिक तणावात होता, असे प्राथमिक चौकशी समोर आलं आहे. पोलिसांनी गडकरी यांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांचा आज मुंबईत साखरपुडा होत आहे. यानिमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब मुंबईत एकत्र आलं आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार आणि पवार सर्व सदस्य उपस्थित आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील साखर घोटाळ्याविरोधात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची 'ईडी'कडे तक्रार केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांनी 100 कोटींचा घोटाळा केला असून त्यावर गुन्हे दाखल झालेत. याची 'ईडी'मार्फत चौकशी करण्यासाठी तक्रार दिली आहे. मंगळवारी मी पुन्हा एक स्मरणपत्र 'ईडी'ला देणार आहे. त्यानंतर कारवाई झाली नाही, तर उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
खासगी क्लासमध्ये बेंचवर बसण्यावरून झालेल्या वादातून एका शाळकरी मुलाची हत्या झाली. नाशिकच्या सातपूर भागात ही धक्कादायक घटना घडली. ज्ञानगंगा क्लासमधील अन् दहावीत शिकणाऱ्या यशराज गांगुर्डे या मुलाची हत्या झाली. या हत्येप्रकरणी 2 विधी संघर्षात बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, गुन्हा दाखल केला आहे.
बनावट अपंग प्रमाणपत्र बनवून संजय गांधी निराधार योजना व अपंगांना मिळणाऱ्या इतर योजनांना लाभ घेऊन सरकारची फसवणूक केल्याचा आरोपावरून राहुरी पोलिसांनी ताज निसार पठाण व रुबिना ताज पठाण या पती-पत्नीला अटक केली. या पती-पत्नीला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागाची जीवनरेखा असणारे भंडारदरा धरण पुढील वर्षी शंभर वर्षांचे होत आहे. या धरणाचा शताब्दी महोत्सव राज्य सरकार साजरा करणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भंडारदरा धरण शताब्दी महोत्सव समिती स्थापन केली आहे. यासाठीचा अध्यादेश 1 ऑगस्ट काढला आहे.
सक्तवसुली संचालनालयाने ओडिशास्थित एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक केली. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहाला दिलेल्या कथित 68 कोटींच्या हमीचाही समावेश आहे. याप्रकरणी 'ईडी'ने केलेली ही पहिली कारवाई आहे. भुवनेश्वरस्थित 'बिस्वाल ट्रेडलिंक' या कंपनीविरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून कारवाई सुरू केली. यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ सारथी बिस्वाल यांनी भुवनेश्वरमधून आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल. सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे. भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते. संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल ! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे...
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 2, 2025
भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते.
चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते.
बसवेश्वरांना मारणारे… pic.twitter.com/ZNuxN4KPF0
वसई विरार शहर महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवारआणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांना सोमवारी ईडीच्या मुंबईतील वरळी ऑफिसमध्ये हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. हे समन्स गेल्या आठवड्यात पवार यांच्या शासकीय निवासस्थानासह त्यांच्या संबंधित एकूण 12 ठिकाणी ईडीने टाकलेल्या छाप्यांनंतर बजावण्यात आले आहेत.
माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे एवढा पैसा येतो तरी कुठून? त्यांची उत्पन्नाची साधनं काय आहेत? जनतेने हे जाणून घ्यायला हवं, ज्यांच्याकडे कोणताही प्रशासनाचा अनुभव नाही, अशा लोकांनी महाराष्ट्र चालवला होता, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
वाल्मिक कराडची दोन मुलं आणि गोट्या गित्तेने महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यापासून गोट्या गित्ते फरार झाला आहे. या प्रकरणी पोलीस गोट्याचा शोध घेत आहेत. मात्र, तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. अशातच आता त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली आहे. व्हिडिओत त्याने म्हटलं आहे की, माझे वाल्मिक कराडसोबत संबध असल्याचं बोललं जात आहे. मी त्यांचा कार्यकर्ता आहे. दुसरा माझा काही संबंध नाही. पण आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनावणे हे आरोप करत आहेत. तसेच अंजली दमानिया यांनी देखील आरोप केलेत. कोणच्याही मुलींना उचलून नेतो. वंजारी असूनसुद्धा मला जितेंद्र आव्हाडची लाज वाटते. फुकट आरोप माझ्यावर करु नका. जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाहीत. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या आरोपींना फाशी भेटलीच पाहिजे. विनाकारण वाल्किम कराड यांच्या मागे हे जोडलं जात आहे. तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे. जितेंद्र आव्हाड तुम्ही धनंजय मुंडेंना टार्गेट करु नका. आमचे दैवत वाल्मिक कराड हे गोरगरीब जनतेची काम करतात. परळीत येऊन कोणालाही विचारा वाल्किम कराड कोण आहे ते. त्यांना सर्वजण दैवत मानत आहेत, असंही गित्ते व्हिडिओत म्हणत आहेत.
नांदणी जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी नादणीकरांनी आता आपला मोर्चा आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर वळवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राजकारण विरहित सर्वपक्षीयांचा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत आहे. यासाठी रविवारी पहाटे पाच वाजता नांदणी येथून हा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला आहे. जवळपास 45 किलोमीटरचा प्रवास करून हा महामोर्चा सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापुरातील जिल्हाधिकार्यालयावर धडकणार आहे. या पदयात्रेत हजारो नागरिक भल्या पहाटे सहभागी झाले आहेत.
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याच प्रकरणाचा तपासासाठी पंकज कुमावत आज बीडमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे.
अकोला शहरातील निमवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी भाषणात बोलताना ते म्हणाले, आपल्या भागातील वसतिगृहासाठी निधीची मागणी करा. वसतिगृहाला पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी लागत असेल तरी तो मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातायं?, असं वक्तव्य त्यांनी केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पनवेलमधील लेडीज बारचा उल्लेख केला होता. शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात डान्स बार असून यामुळे तिथली तरूण पीढी बरबाद होत असल्याचंही त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. राज यांनी पनवेलमधील डान्स बारवर टीका केल्यानंतर स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील नाईट राईड डान्स बारची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.